August 2017 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

17 August 2017

देवाचा पयोद

'पयोद', पयोद म्हणजे पाणी घेऊन आलेला एक ढग. कदाचीत शहरी माणसाला या शब्दाशी एवढं जुळता येणार नाही पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासाठी पयोद म्हणजे आयुष्यच असते जणू. सध्या उन्हाची काहिली वाढलीय. त्यामुळे पाण्याचं मूल्य आपल्या प्रत्येकाला जाणवत असेलच. त्या पयोदवर त्याच्या पुढच्या भविष्याची वाटचाल, त्याच्या मुलांचं शिक्षण, आईवडलांच्या आजारावर उपचार, सणासुदीचा खर्च सारं काही अवलंबून असतं. हाच पयोद शब्द त्याने आपली नवीन कंपनी सुरु करताना निवडला आणि आठ वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक महिलांच्या घरी हा पयोद सुख-समृद्धी आणि विकासाच्या रुपाने बरसत आहे. हा पयोद बरसविणारे आहेत पयोद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष देवानंद लोंढे.
कवठे महांकाळ या सांगलीतल्या एका खेडेगावात देवानंदचा जन्म झाला. कवठे महांकाळ तसा दुष्काळी भाग. त्यामुळे शेती पेक्षा शेतमजूरी करणे हा तेथील प्रमुख उदरनिर्वाहाचा व्यवसाय. देवानंदचे आई वडील देखील शेतमजूरीचे काम करीत असत. देवानंदने स्वत: शेतात राबून आपलं शिक्षण पूर्ण केलं. कोल्हापूर विद्यापीठातून तो सिव्हील इंजिनियर झाला. पाणी आणि पाणी व्यवस्थापन हे त्याचे स्पेशलायझेशनचे विषय होते. याच विषयाच्या अनुषंगाने तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार बनला. त्याला युनिसेफ बरोबर काम करण्याची संधी देखील मिळाली. ८० देशांमध्ये कामानिमित्ताने संचार करता आला. पण नोकरी किती दिवस करायची हा प्रश्न त्याने स्वत:लाच विचारला. लहानपणापासून त्याने आपल्या आई बाबांना शेतात राबताना पाहिले होते. जर ही गुलामगिरी झुगारायची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही हे मनाशी पक्कं झालं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरी सोडून दयानंद लोंढेंनी व्यवसायात उडी घेतली.

मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी व्यवसाय कोणता करावा याचे काही ठोकताळे मनाशी त्यांनी मांडले होते. आंतरराष्ट्रीय स्तरातून आल्याने आंतरराष्ट्रीय चलनातच व्यापार करायचा हे मनाशी पक्कं होतं. असं उत्पादन असावं जे भारतात खूप कमी उद्योजक तयार करत असतील आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे या उत्पादनातून सामाजिक संदेश गेला पाहिजे. हे सर्व विचारचक्र आणि संशोधन दोन वर्षे चालू होते. संशोधनातून एक उत्पादन समोर आले ते म्हणजे हातमोजे तयार करणे. एकतर भारतात हातमोजे तयार करणारे खूपच कमी उद्योजक आहेत. हातमोजे तयार करुन ते निर्यात करायचे त्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय चलन मिळणार होतं. आणि हातमोजे घालून सुरक्षितता बाळगा हा संदेश आपसूकच समाजात जाणारा होता. त्यामुळे हाच व्यवसाय करण्याचा निर्णय झाला.
पण खरी परिक्षा तर पुढेच होती. उद्योग करण्यासाठी भांडवल लागतं. हे भांडवल बॅंका देतात. भांडवल मिळावे यासाठी देवानंद यांनी वित्तीय संस्थांना प्रकल्प सादर केले. आणि वित्तीय संस्थांनी कर्ज नाकारलं. कर्ज नाकारण्याचं कारण होतं दलित समाजातील एक तरुण, उद्योग पण उभारु शकतो यावर नसलेला विश्वास. आंतरराष्ट्रीय स्तरावरची नोकरी, मानमरातब, उच्च शिक्षण सामाजिक व्यवस्थेने तयार केलेल्या दलित या घटकासमोर निष्प्रभ झाले होते. अजूनही जात व्यवस्था आपल्या भारतीय मानसिकतेत कशी दबा भरुन बसली आहे याचं हे मूर्तीमंत्त उदाहरण आहे. मात्र जर व्यवस्था आपल्या नाकारत असेल तर आपण आपली व्यवस्था प्रस्थापित करायची हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या जगाला दिलेलं बाळकडू दयानंद लोंढेंनी वापरलं आणि स्वत:च उद्योगासाठी लागणारा पैसा उभारला. यासाठी आपलं राहतं घर, जमीन, बायकोचे दागिने त्यांना गहाण ठेवावं लागलं. आणि त्यातून उभी राहिली पयोद इंडस्ट्रीज प्रा. लि.

आज पयोद कडे ८५० हून अधिक महिला कर्मचारी कार्यरत आहेत. जपान आणि काही युरोपियन देशांत पयोदचे हातमोजे निर्यात होतात. ओबेरॉय, ऑर्किड, ताज ही भारतातील पंचतारांकित हॉटेल्स, वाहने तयार करणाऱ्या कंपन्या हे पयोदचे भारतातील प्रमुख ग्राहक आहेत. व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी पयोद जपते. हातमोजे सारखी वस्तू निर्जंतूक आणि स्वच्छ असावी यासाठी धूळ आणि धूर नसलेल्या ठिकाणीच पयोद हातमोजे तयार करायला देते. पण ग्रामीण भागात हे दोन्ही घटक अविभाज्य आहेत. जर कोणती महिला पयोदकडे रोजगारासाठी आली तर मशीन देताना पयोद दोन गोष्टी करते. धूराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पयोद संबंधित महिलेला गॅस कनेक्शन मिळवून देते आणि धूळ टाळण्यासाठी तिला फरशी टाकण्यासाठी संबंधित कंपनीशी भेट घालून देते वा कार्पेट मिळवून देते. हे सगळं करण्यासाठी जर कोणाकडे पैसे नसतील तर पयोद कच्चं कर्ज देखील देते ते देखील नाममात्र मासिक हफ्ता घेऊन. ग्रामीण भागामध्ये आजदेखील न्हाणीघर बाहेर असतं ते देखील व्यवस्थित झाकलेलं नसतं. परिणामी लज्जास्तव पहाटेच्या अंधारात कित्येक महिला स्नानादी आटोपून घेतात. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामीण भागामध्ये शौचालयासोबत न्हाणीघर देखील व्यवस्थित असावं यासाठी पयोद मदत करते.
त्याचबरोबर २५ गावांत पसरलेला पयोदचा पसारा पाहण्यासाठी दूर दूरचे लोक येतात. त्यांना पूर्ण माहिती देण्यासाठी पूर्ण वेळ कर्मचारी न ठेवता पयोद दोन मुलांना मार्गदर्शन करण्याचा रोजगार देणार आहे. यातून उद्योजकीय सहल ही संकल्पना पयोद राबविणार आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशन अंतर्गत ते कच्चा माल देखील हिंगणगावातच तयार करणार आहेत. नद्या स्वच्छ करण्याचा प्रकल्प टाटा समूह राबवत आहे. महाराष्ट्रात पयोद या प्रकल्पात टाटाचे सहाय्यक आहेत. तरुणांना रोजगार आणि लोकांना प्यायला स्वच्छ पाणी देणे हाच यामागे हेतू आहे.

एकेकाळी देवानंद लोंढेंना वित्तीय संस्था कर्ज द्यायला नकार देत होती. आज व्हेंचर कॅपिटल कंपनी पयोदमध्ये ७.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला तयार आहे. स्वत:च्या हिंमतीवर लढा देत चाळीशीच्या आतच या तरुणाचा व्यवसाय वर्षाला ७ ते ८ कोटी रुपयांची उलाढाल करतो. निव्वळ दलित असल्यामुळे व्यवस्थेने नाकारलेल्या या तरुणाने स्वत:चीच व्यवस्था तयार केली. असे अनेक देवानंद लोंढे उद्योजक म्हणून उभे राहून समृद्धीचे पयोद महाराष्ट्रावर बरसावेत ही सदीच्छा.

- लक्ष्यवेधी प्रमोद सावंत
www.yuktimedia.com

03 August 2017

२० रुपये खिशात नसणार्‍या कोट्याधिशाची कहाणी

त्याच्या वडिलांचा आगप्रतिबंधक उपकरण तयार करण्याचा कारखाना होता. वयाच्या आठव्या वर्षांपासून तो वडिलांसोबत कारखान्यात जाई. त्याला कारखान्याविषयी चांगली माहिती होती. कामगार, उत्पादन, ग्राहक यांच्याबरोबर त्याचं एक वेगळंच नातं तयार झालं होतं. शाळेत असताना शाळा आणि कॉलेजच्या सुट्ट्यांदरम्यान कारखान्यात जाण्याचं त्याने वेळापत्रकंच तयार केलं होतं. मात्र लहान भाऊ असल्यामुळे कारखान्याची जबाबदारी वंशपरंपरागत पद्धतीने मोठ्या भावाकडे आली. काहीसा मनात खट्टू झालेल्या त्याने स्वत:ची वेगळी कंपनी सुरु करण्याचे ठरविले. त्यावेळेस खिशात २० रुपये सुद्धा नव्हते. पण स्वप्न मात्र मोठं होतं. एका मित्राकडून ५०० रुपये कर्ज घेऊन त्याने आपल्या व्यवसायास सुरुवात केली. १९८४ मधली ही घटना आहे. अवघ्या ३० वर्षांत त्याची कंपनी १ हजार कोटी रुपयांची उलाढाल करु लागली. ही रोमांचक कथा आहे नितीन फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नितीन शाह यांची.

कोणत्याही एकत्र कुटुंबपद्धतीत जी वंशपरंपरागत पद्धत असते त्यालाच अनुसरुन नितीनच्या वडिलांनी आपली कंपनी झेनिथ फायर सर्व्हिसेसची सूत्रे मोठ्या मुलाकडे सोपविली. आता आपण आपलं स्वत:चं काहीतरी अस्तित्व निर्माण करुन दाखवूया असं नितीनला वाटू लागलं. पण करणार काय हा यक्षप्रश्न होताच. पण त्यापेक्षा सुद्धा महत्वाचा प्रश्न होता तो पैशाचा. एखादा व्यवसाय सुरु करायचा म्हटला तर पैसा लागणारंच. आपल्या खिशात २० रुपयेसुद्धा नाही. कोण का म्हणून आपल्याला पैसे देईल असे त्याला वाटू लागले. मात्र जिथे पैसा काम करत नाही तिथे जोडलेली नाती काम करतात. नितीनच्या एका मित्राने जानेवारी १९८४ मध्ये ५०० रुपये कर्जाऊ दिले. नितीन मित्राच्या गॅरेज मध्ये काम करु लागला. त्यानंतर त्याने मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा डिप्लोमा मिळविला.
नितीन वडिलांसोबत व्यवसाय सांभाळत असताना त्याने काही चांगले संबंध तयार केले होते. यापैकी एक अणुऊर्जा विभागात जेष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मदतीने नितीनला अणुऊर्जा विभागातील आगीशी संबंधित असणार्‍या उपकरणांची निगा राखण्याचे कंत्राट मिळाले. आगप्रतिबंधक सिलेंडरच्या दुरुस्ती आणि निगा राखण्याचं हे कंत्राट होतं. अणुऊर्जा विभाग हे सिलेंडर्स नितीन काम करत असलेल्या गॅरेज मध्ये पाठवत. नितीनने ३ कर्मचार्‍यांना नियुक्त केले होते. त्या तिघांच्या सहाय्याने नितीन सिलेंडर्स दुरुस्त करायचा. अणुऊर्जा विभाग ते दुरुस्त झालेले सिलेंडर्स परत घेऊन जात. काम सुरु केलं त्यावेळेस ट्रॉली, पुली, कन्व्हेयर सारखी उपकरणं नितीनकडे नव्हती. किंबहुना ती घेण्यासाठी पैसे नव्हते. पण हातात उपलब्ध असलेल्या साहित्याच्या जोरावर तो काम करत राहिला. रोलिंग मशीनसाठी तो जुन्या गाडीचा भाग वापरायचा. याचा खर्च होता अवघा हजार रुपये. नवीन मशिन किंमत होती सुमारे ४५ हजार रुपये. अशाप्रकारे विविध क्लृप्ता काढून नितीन कमी खर्चात कंपनी चालवित होता.

साधारण ६-७ महिन्यांनी घाटकोपर मध्ये २० लाख रुपये बाजार मूल्य असलेली १२०० चौरस फूटाची एक जागा खरेदी केली. जमविलेले सारे पैसे या जागेत गुंतविले. अणुऊर्जा विभागाचं काम करत असतानाचं ओळखीने ओएनजीसीचं काम देखील मिळालं. हळूहळू कामाचा वेग वाढला. १९८६ मध्ये नितीनच्या कंपनीने ७ कोटींचा टप्पा गाठला. ही तर सुरुवात होती. अवघ्या २ वर्षांच्या अथक मेहनतीचं हे फळ होतं. १९८७ मध्ये कंपनी विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १ कोटी रुपये खर्चून गुजरातला ५० हजार चौरस फूटाची जागा खरेदी करुन आगप्रतिबंधक उपकरण निर्मितीचा कारखाना तिथे सुरु केला. दरम्यान आगीशी संबंधित सर्व घटक एकाच छताखाली देण्याचा निर्णय नितीनने घेतला. आगप्रतिबंधक उपकरणांचं डिझाईन, निर्मिती, निगा राखणे हे सर्व कंपनी पुरवू लागली. १९८८ मध्ये गोवा आणि मुंबईच्या अग्निशमन दलाचे कंत्राट कंपनीला मिळाले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासोबतच मुळात ही आग शोधून काढणारं यंत्र बनविणार्‍या इंग्लंडमधील अपोलो फायर डिटेक्टर कंपनीसोबत नितीनच्या कंपनीने हातमिळवणी केली. त्यांची उत्पादने नितीनची कंपनी भारतात विकू लागली. उत्पादन निर्मिती ते उत्पादन विपणन व विक्री असा नवीन प्रवास सुरु झाला. २०१० मध्ये नितीन शाह यांनी संयुक्त अरब अमिरातीतील न्यू एज कंपनी ४० कोटी रुपयांना विकत घेतली. न्यू एज कंपनीचे अबुधाबी, दुबई, शारजाह येथे कार्यालये आहेत. युरोपियन बाजारपेठेसाठी फायरटेक सिस्टम नावाची कंपनी सुरु केली आहे. नितीन शाह यांची जगातील एकमेव अशी कंपनी आहे जी आगप्रतिबंधक उत्पादनांसोबतच जड वायू, रासायनिक वायू आणि पाण्याची निर्मिती करते. ओझोन फ्रेंडली फायर प्रोटेक्शन सिस्टम हे तंत्र भारतात वापरणारी ही पहिली कंपनी होय. कंपनीचा सध्याचा एकत्रित महसूल १००० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

२० रुपये सुद्धा खिशात नसताना नितीन शाह यांनी विजिगीषु वृत्ती कायम ठेवत १००० कोटी रुपयांची कंपनी उभारली. जिथे पैसा नसतो तिथे तुमचे ‘रिलेशन्स’ कामाला येतात. म्हणूनच तुमचे रिलेशन्स जपा. तुमच्यात देखील नितीन शाह दडलाय. त्याला ओळखा. स्वत:चं औद्योगिक साम्राज्य उभारा.
- प्रमोद सावंत
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites