September 2012 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

24 September 2012

ध्येयनिश्चिती

गौरी खेर, सोमवार, १० सप्टेंबर २०१२ (Loksatta)
एखादी व्यक्ती किंवा कंपनी यांनी ठरवलेला त्यांच्या कामातील वा योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचे ध्येय किंवा उद्दिष्ट होय! विकासाच्या दृष्टिकोनातून कंपनीने किंवा व्यक्तीने साध्य केलेला त्यांच्या कामातील तो परमोच्च बिंदू असतो. विशिष्ट कालमर्यादा ठरवून घेऊन अनेक व्यक्ती ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करत करतात. 
ध्येयाचे महत्त्व
ध्येय हे एक प्रकारचं उद्दिष्ट असतं. ज्याच्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही एका विशिष्ट दिशेने प्रयत्न करत असता. असं ध्येय तुमच्यापुढे नसेल, तर स्वत:चा विकास करून घेताना तुमची पुढे जाण्याची दिशाच भरकटत जाऊ शकते. या साऱ्यात तुमचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाया जातं. काम फक्त चांगलं करून चालत नाही, तर ते ढोबळमानानं, अंदाजानं करत राहण्यापेक्षा एका ठरलेल्या पद्धतीनंच करणं महत्त्वाचं आहे. तुमच्या कामातून, तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय मिळवायचं आहे आणि ते तुम्हाला का हवं आहे, याचं स्पष्ट चित्र तुमच्या डोळ्यापुढे तुम्ही ठेवायला हवं. तुमचं ध्येय तुमच्यात एक सखोल असा विश्वास निर्माण करतं, की तुम्ही तुमचं काम नेटानं करत राहिलात तर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडू शकतात.

योजना तसेच आराखडय़ाचे महत्त्व:
एखादे ध्येय तुम्ही एकदा मनाशी ठरवलेत की, तिथपर्यंत पोचण्यासाठी त्याचा व्यवस्थित आराखडा तयार करणे फारसे कठीण नसते. त्याकरिता एखाद्या कागदावर खालील बाबी लिहून काढणे उत्तम ठरेल.
* तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तयारी करण्याच्या दृष्टीने कशी योजना आखणार आहात?
* तुम्ही काय केले आहे आणि सध्या तुम्ही काय करत आहात? 
* ध्येयाच्या दिशेने वाटचाल विविध टप्प्यांवर तुमच्या मनातील योजना नेमक्या काय आहेत?
हे विविध मुद्दे लिहून काढलेत की, तुमचे ध्येय आणि त्यासाठीच्या तुमच्या योजना, यांचा पक्का विचार तुमच्या मनात पक्का आहे, असे समजायला हरकत नाही.  
तुम्ही जे ध्येय ठरवले असेल, त्याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याच्या दृष्टीने जी योजना तुम्ही आखणार आहात 
त्याचा तपशील टप्प्याटप्प्याने तयार करा. अनेक वेळा तुमच्या ध्येयपूर्णता होत नाही याचे एक महत्त्वाचे कारण हे आहे की, नेमके काय करण्याची गरज आहे, तेच समजून घेतले जात नाही. तुमच्या कामाची योजना आखा आणि ती योजना अमलात आणा. या बाबतीत अतिशयोक्तीही व्हायला नको. एकाच वेळी बरीचशी ध्येये ठरवू नका. एकाच वेळी अनेक ध्येयांमध्ये तुम्ही स्वत:ला झोकून दिलेत, तर अशी परिस्थिती निर्माण होईल (उद्भवेल) की, तुम्ही कोणत्याच ध्येयावर पुरेसे लक्ष केंद्रित करू शकणार नाही (कोणत्याच ध्येयाला तुम्ही पुरेसा वेळ देऊ शकणार नाही.).

ध्येययोजना आखण्याचे वेळापत्रक
ध्येय, विशेषत: व्यक्तिगत विकास आणि करिअरच्या संदर्भातील ध्येयांना ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने नेहमीच एकाहून अधिक बाजू असतात. ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने ती आवाक्यातली तर हवीतच, पण ती आव्हानात्मक, विशिष्ट प्रकारची, भक्कम अशी असावीत. ती लिहून काढायला हवीत आणि कमीत कमी कालमर्यादेत जास्तीत जास्त यश मिळवून देणारी हवीत. 

ध्येयनिश्चिती करणे का आवश्यक ठरते?
*    वेळेचे अधिक उत्तमरीत्या व्यवस्थापन करता येते.
*    जबाबदारी निश्चित होते.  
*    सांघिकरीत्या केल्या जाणाऱ्या प्रत्येकाची भूमिका स्पष्ट होते.
*    कामातील तुमची भूमिका आणि सहभाग वरिष्ठ समजून घेऊन त्या कामाचे विश्लेषण करू शकतात.


ध्येयनिश्चित करण्याचे लाभ

*    साध्य करावयाच्या कामगिरीसाठी सुरुवातीलाच योजना आखणे सोपं जाते.
*    आपली कामगिरी कशी होते आहे, ते समजते.
*    विकास वा प्रगती साधण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यांच्याविषयी माहिती मिळवता येते.

ध्येय असे असावे-
* आपल्यासमोरील ध्येय हे पुरेसे स्पष्ट असावे. त्याचे उद्दिष्टय़, साध्य करण्याचे मार्ग याबाबतही स्पष्टता असावी. तसे नसेल तर गोंधळ उडण्याची शक्यता अधिक असते.

* साध्य करता येण्याजोगे असावे - ध्येय निश्चित करताना अतिरंजकतेला थारा नसावा. बुद्धी आणि मेहनतीच्या जोरावर वास्तवात येऊ शकेल असे अर्थपूर्ण आणि आव्हानात्मक ध्येय बाळगावे.


08 September 2012

भविष्यावर अवलंबून राहू नका, तुम्हीच तुमचे भविष्य निवडा! - दिपक घैसास


‘भविष्यावर अवलंबून राहू नका, तुम्हीच तुमचे भविष्य निवडा! आजच्या तरूणाईने निव्वळ सुशिक्षित न होता ई-शिक्षित पण व्हावे कारण काळाची ती गरज आहे’, असे प्रतिपादन प्रसिध्द उद्योजक दिपक घैसास यांनी केले. वीर सावरकर सभागृह, दादर येथे बॉर्न टू विनच्या बाराव्या ‘लक्ष्यसिद्धी सोहळा : वेध भविष्याचा’ या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका मंगलताई शहा आणि बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी आणि अमेय आमरे आदी मान्यवर उपस्थित होते.


भविष्याचा वेध घेत दिपक घैसास यांनी यावेळी आईनस्टाईनच्या सूत्राचा आधार घेत यशस्वी होण्याचे नवीन सूत्र मांडले ते म्हणजे G = MC2. G = Growth (वाढ), MC2 म्हणजेच Ability to manage the change (बदल घडविण्याची क्षमता) असेल तर वाढ निश्चितच होते. बदल हा नेहमी सकारात्मक असावा. कोणत्याही उद्योग-धंद्यात परिस्थितीचे आकलन होणे गरजेचे असते. याकरिता कमी बोलून जास्त ऐकण्याचा कानमंत्र त्यांनी दिला. कोणतेही सॉफ्टवेअर तयार करताना निव्वळ इंजिनिअर असून फायद्याचे नसते तर त्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती असणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. माहिती मिळेल तेवढी जमवत रहा, परंतू ती कधी वापरायची हे माहित असणे देखील तेवढेच आवश्यक आहे. भविष्यामध्ये पारंपारिक उद्योग-धंद्यापेक्षा माहिती तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान, व्हर्चुअल बॅंकिंग, इंटरनेट टिव्ही, ऍनिमेशन यावर आधारीत उद्योगधंदयांची प्रगती जास्त असेल शिवाय सांघिक प्रयत्नांच्या आधारावर हे लवकर साध्य होईल अशी भविष्यवाणी त्यांनी केली.

भविष्याचा वेध घेऊनच आपण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राकडून जैविक तंत्रज्ञानाकडे वळलो आणि जेनकोव्हल स्ट्रॅटजिक सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या  स्कंधकोशिका (Stem Cell) संवर्धन करणाऱ्या कंपनीची स्थापना केली.  बॉर्न टू विन नवीन उद्योजकांना घडविते हे नक्कीच कौतुकास्पद आहे, त्याबद्दल अतुल राजोळी यांचे अभिनंदन. भविष्यात संपूर्ण जगभरात बॉर्न टू विनचा झालेला शाखाविस्तार पाहायला आपणांस आवडेल, असे गौरवोद्गार दिपक घैसास यांनी काढले.


 या सोहळ्यादरम्यान पंढरपूर येथील प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका मंगलताई शहा यांचा त्यांच्या समाजकार्याकरिता बॉर्न टू विनतर्फे सत्कार करण्यात आला. मंगलताई शहा या पालवीच्या माध्यमातून ५२ एचआयव्ही बाधित लहानग्यांचा सांभाळ करतात. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या की ‘नितीमत्ता, नैतिकता, सचोटी नसल्याने समाजात वाईट प्रवृत्ती बोकाळल्या आहेत. नियतीचे भोग वाट्यास आलेल्या या मुलांना आपल्या मायेची गरज आहे. येथे रामाचे मंदीर बांधण्याची लोकांना इच्छा आहे परंतू खरा राम कोठे आहे’, असा खडा सवाल मंगलताईंनी यावेळी केला. पंढरपूरास कधी गेलो तर पांडूरंगाचे दर्शन घेण्याअगोदर मी पालवीचे दर्शन घेईन, असे भावोत्कट उद्गार दिपक घैसास यांनी काढले. बॉर्न टू विनतर्फे संकलित केलेले सव्वादोन लाख रुपये ‘पालवी’करीता मंगलताई शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच पालवी संस्थेतील एका मुलाचे पालकत्व बॉर्न टू विनने यावेळी घेतले.


 ‘उद्योग-धंदा करताना अडचणी, परिस्थिती, आर्थिक मंदी, बाजारपेठेतील अनिश्चितता अशी शंभर कारणे आम्हाला उद्योजक सांगतात. मात्र प्रशिक्षणानंतर त्यांच्याकडे यावर दोनशे उत्तरे तयार असतात. मराठी तरूणांना मराठी उद्योगविश्वातील दिग्गजांचे अनुभव त्यांच्या तोंडून ऐकता यावे, त्यांचे मार्गदर्शन लाभावे याकरिता प्रत्येक लक्ष्यसिद्धी सोहळ्यास उद्योगविश्वातील असामान्य व्यक्तिमत्त्वांना निमंत्रित केले जाते. आतापर्यंत निर्माण ग्रुपचे अजित मराठे, राजेंद्र सावंत, कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार, राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर, एल ऍण्ड टीचे वाय.एम देवस्थळी, दास ऑफशोअरचे अशोक खाडे आदी मान्यवरांनी लक्ष्यसिद्धी सोहळ्यास वलयांकित केले’, असे बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांनी सांगितले.

या लक्ष्यसिद्धी सोहळ्यादरम्यान बॉर्न टू विनच्या यशस्वी प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षकांना दिपक घैसास यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites