January 2012 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

31 January 2012

सोशल नेटवर्कींग - एक आगळी वेगळी क्रांती

जगातील ५०% पेक्षा अधिक लोकांचे सरासरी वय तीस वर्षांहुन कमी आहे आणि त्यापैकी ९६% लोकांनी एकातरी सोशल नेटवर्कवर नोंदणी केली आहे.

युनायटेड स्टेट्स मध्ये दर आठवड्याच्या ऑनलाईन ट्रॅफीकचा अभ्यास केल्यावर असे लक्शात येते की गुगल वापरणार्‍यांपेक्षा फेसबुक वापरणार्‍या नेटीझन्सची संख्या जास्त आहे.

पुर्वी इंटरनेटचा सर्वाधिक वापर सेक्सविषयक वेबसाईट्स (Porn) पाहण्यासाठी केला जात असे मात्र सोशल नेटवर्कींगने त्यावरही मात केली आहे.

i-phone साठी बनविलेल्या अप्लिकेशन्सची संख्या केवळ नऊ महिन्यांच्या कालावधितच १ अब्ज इतकी झाली आहे.

गेल्या वर्षी फेसबुक वापरणार्‍यांच्या संख्येत २०० दशलक्ष वापरकर्त्यांची भर पडली. फेसबुक हा जर एक देश असता आणि फेसबुक वापरकर्ते हे त्या देशाचे नागरीक आहेत असे गृहीत धरले तर फेसबुक हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश झाला असता. म्हणजे फक्त भारत आणि चीन पेक्षा मागे आणि युनायटेड स्टेट्सच्याही पुढे.

जगभरातील ८०% कंपन्या भरतीसाठी (Recruitment) सोशल मिडियाचा वापर करतात आणि त्यापैकी ९५% कंपन्या यासाठी linkedIn या सर्वात मोठ्या प्रोफेशनल सोशल नेटवर्कचा वापर करतात.

मोबाईल द्वारे इंटरनेट वापरापैकी (Mobile internet traffic) ५०% वापर फेसबुक अपडेट्स करण्यासाठी केला जातो. लोक कधीही व कोठुनही फेसबुक अपडेट्स करतात. जर ग्राहकाला एखाद्या उत्पादनाचा किंवा सर्वीसचा वाईट अनुभव आला तर लगेचच फेसबुक किंवा ट्वीटरवर सांगितला जातो. विचार करा कंपन्यांसाठी किती मोठे नुकसान किंवा धोका आहे.

email वापरणे हा प्रकार आता जुनाट मानला जाउ लागला आहे. नव्या पिढीला twitter, Buzz, google wave, BBM हे प्रकार जवळचे वाटतात.

गुगलच्या पाठोपाठ सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन कोणते आहे माहित आहे का? ऐकुन कदाचित आश्चर्य वाटेल तुम्हाला ! युट्युब हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्च इंजिन आहे. तुम्ही हा लेख वाचत आहात तोपर्यंत युट्युबवर १०० तासांहुन अधिक कालावधीचे व्हीडीओज अपलोड झालेले असतील.

सुमारे २००,०००,००० ब्लॉग्ज आतापर्यंत नेटीझन्सने बनविले आहेत.

विकीपेडीया या जगातील सर्वात मोठ्या मोफत ज्ञानकोषामध्ये १५ दशलक्ष लेख आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी ७८% लेख इंग्रजेतर भाषेतील आहेत. विकीपेडीयावर प्रकाशित झालेल्या प्रत्येक लेखासाठी जर १ डॉलर तुम्हाला दिला तर एका तासात तुम्ही १५६.२३ डॉलर्स कमवाल.



जगातील २० सर्वोत्तम ब्रँड्स बद्दल सर्च केल्यानंतर मिळणार्‍या माहितीपैकी २५% माहिती वाचकांनी लिहिलेली (User generated content) असते. म्हणजेच ब्रँड्सबद्दल वाचकांची सोशल मिडीयामधील मते ही त्या ब्रँडचे यशापयश ठरवण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडतात.

३४% ब्लॉगर्स त्यांनी वापरलेल्या उत्पादनांबद्दल आणि सेवांबद्दल आपली मते आपल्या ब्लॉग्जमध्ये प्रकट करतात. ७८% ग्राहक एखादे उत्पादन व सेवा विकत घेण्याआधी सोशल नेटवर्क्स्मधील त्यांच्या मित्रांचा सल्ला घेणे पसंत करतात. जाहिराती पाहुन खरेदी करणार्‍यांची संख्या केवळ १४% इतकी आहे.

जगातील २५ मोठ्या वर्तमानपत्रांपैकी २४ वर्तमानपत्रांचा खप गेल्या काही वर्षांपासुन कमी होत चालला आहे. कारण बातम्यांचा मुख्य स्त्रोत म्हणुन इंटरनेटचाच वापर केला जात आहे.

पुर्वी एखादी खरेदी करावयाची असल्यास आपण त्याबद्दल माहिती शोधायचो आता मात्र उत्पादक स्वतःच आपल्याला शोधतात. आपण कोणत्या गोष्टींबद्दल सर्च करतो, इंटरनेटवर काय वाचतो आणि किती वेळ वाचतो, कशाबद्दल चर्चा करतो, कोणत्या जाहिरातींवर क्लिक करतो, सोशल मिडीयामध्ये कशाबद्दल बोलतो या सार्‍यांचा बारकाईने अभ्यास केला जात असतो. आपल्याला दिसणार्‍या जाहिराती, ईमेल्सद्वारे येणारी जाहिरातींची पत्रके हे सारे अशाच अभ्यासाचे फलित आहे.

मित्रांनो, वरील सर्व माहिती वाचुन अचंबीत झालात ना ! मी पण असाच अचंबीत झालो होतो. मात्र इथे ही माहिती देण्याचा उद्देश फक्त काही आश्चर्यचकीत करणारी आकडेवारी देण्याचा नाही आहे. इथे मला सांगायचं आहे की इंटरनेट आता Mature झाला आहे. आणि माहिती मिळवण्याच्या, संवाद साधण्याच्या जुन्या पद्धतींमध्ये एक अमुलाग्र बदल इंटरनेट मुळे होत आहे. सोशल मिडीयाकडे केवळ एक फॅड म्हणुन जर तुम्ही पाहत असाल तर ती घोडचुक आहे हे मला सांगायचं आहे.

इमेल चेक करणे, ePaper वाचणे, सकाळी ऑनलाईन राशीभविष्य वाचणे, झालंच तर ऑनलाईन कथा, कविता किंवा साहित्य वाचणे एवढाच इंटरनेटचा उपयोग जर तुम्ही करत असाल तर तुम्ही एका मोठ्या देणगीला मुकत आहात हे लक्षात असुद्यात. अर्थात आताशा इंटरनेटचा वापर इतक्या मर्यादित स्वरुपात करणार्‍या वाचकांची संख्या जास्त नाही आहे (अशी मला आशा आहे). सोशल नेटवर्कींग, ऑर्कुट, बझ्झ, वेव्ह, ट्वीटर, फेसबुक, linkedin, Hi5 वापरणार्‍यांची संख्या वाढते आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र मला माझ्या सर्व वाचकमित्रांना सांगावेसे वाटते की एक ग्राहक आणि एक विपणक (Marketing) या दृष्टीकोनातुन सोशल नेटवर्क्सकडे पहायला सुरुवात करा. एक वेगळेच जग या सोशल नेटवर्कींगच्या आड लपलेले आहे हे तुम्हाला दिसू लागेल. आणि हे जग अधिक interesting आहे हे देखिल तुमच्या लक्षात येईल.

ब्लॉग म्हणजे एक जबरद्स्त मार्केटींग टूल आहे, ट्वीटर, ऑर्कुट, फेसबुक या सर्वांचा मार्केटींगसाठी कसा उपयोग केला जातोय?, कंपन्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल नेटवर्क्सचा कसा वापर करत आहेत हे नीट अभ्यासायला सुरुवात करा. युरोपातील औद्योगीक क्रांतीनंतर जग बदलले होतं आता या सोशल नेटवर्कींग क्रांतीमध्येही जग बदलवण्याची ताकद आहे हे लक्षात घ्या. आणि जग बदलताना पाहण्यापेक्षा या बदलाचा भाग बना.

ब्लॉग्जमध्ये विविध उत्पादनांचे paid reviews लिहिले जातात, कंपनीसाठी ट्वीटींग, ब्लॉगींग करणार्‍या Social media experts ना नोकर्‍या दिल्या जात आहेत. डेल कंपनीने केवळ ट्वीटरच्या माध्यमातुन करोडो रुपयांची उलाढाल केली आहे. ट्वीटर, फेसबुक, ऑर्कुटमधील आपल्या प्रोफाईलवरील जागा जाहिरातींसाठी विकली जात आहे. आनंद महिंद्रांसारखे प्रथितयश उद्योजक ट्वीटरद्वारे आपल्या ग्राहकांशी थेट संवाद साधत आहेत. बघा आपल्या आजुबाजुची ऑनलाईन दुनिया कशी व्यवसायात रमली आहे. आपण मात्र सोशल नेटवर्कींग एक फॅड किंवा थोडा विरंगुळा म्हणून वापरत आहोत.

मुद्दा हा की इंटरनेट म्हणजे बिझनेस, इंटरनेट म्हणजे पैसा कमावण्याचे एक प्रमुख साधन ही इंटरनेटची नविन व्याख्या आपण लवकरात लवकर आत्मसात केली पाहिजे. इंटरनेटवर चहुबाजुला व्यवसायाच्या अमर्याद संधी आहेत, डोळसपणे त्यांच्याकडे पहायला सुरुवात केली पाहिजे.

जर हा लेख तुम्ही स्वतःच्या घरामधील संगणकावर वाचत असाल तर (म्हणजे तुमच्याकडे घरी संगणक आणि इंटरनेट आहे ) आपण योग्य वेळी योग्य जागी आहोत याबद्दल देवाचे आभार माना. कोणत्याही मोठ्या भांडवलाशिवाय करता येण्याजोग्या ऑनलाईन व्यवसायाच्या संधी शोधायला आजच सुरुवात करा. आतापर्यंत झालं ते झालं, यापुढे इंटरनेट क्रांतीमध्ये आपण कोणत्याही परीस्थीतीत मागे रहायचं नाही.

जाता जाता Gary Hayes ( Personalize Media ) या Social media expert ने बनविलेले हे infographic नजरेखालुन घालण्यास विसरु नका. सोशल मेडीयाचा आवाका जितका जास्त वाढतोय तितकाच त्याचा वेगही जास्त आहे. दर सेकंद, मिनीट, तासाला सोशल मिडीया कमालीचा पुढे जातोय. दहा मिनिटे या लेखाचा tab तसाच ठेवुन परत या आणि पहा गेल्या दहा मिनिटात काय घडले आहे ते.


12 January 2012

तर २०३० साली जग असे असेल


माजी राष्ट्रपती डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांनी हार्वर्ड विद्यापीठात अलीकडेच 'हरीश सी. महिंद व्याख्यान' दिले. त्याचा हा गोषवारा. २०३० साली आपले जग कसे असेल याचे चित्र त्यात डॉ. कलाम यांनी उभे केले आहे ......................
आज जगासमोर गरिबी, निरक्षरता, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव, स्वच्छ आणि पर्यावरण संवर्धन साधणारी वीजनिर्मिती, साधनसामग्रीचे न्याय्य वाटप, उच्च जीवनमूल्यांचे संस्कार करणारे दर्जेदार शिक्षण पुरविणे, रोगांचे निवारण, उत्तम दर्जाची आरोग्यसेवा आणि चांगले राहणीमान जनतेसाठी उपलब्ध करणे ही आव्हाने आहेत. या समस्यांच्या कारणांमागे आणि त्यावरील उपायांमागे अनेक आंतरराष्ट्रीय घटक आहेत. म्हणूनच उपाययोजना (सोल्युशन्स) शोधून काढणे ही जगभरातील सर्वच देशांची- 'जागतिक समाजा'ची- सामूहिक जबाबदारी ठरते. आताच्या जगात नवे शोध आणि त्यांचा उपयोग यांना भौगोलिक किंवा राजकीय बंधनांमध्ये जखडून ठेवता येत नाही. आज लागलेला नवा शास्त्रीय शोध पाहता पाहता हजारो मैल दूर असलेल्या देशांमध्ये पोहचून आपली बाजारपेठ तेथे शोधतो. अनेक शैक्षणिक संस्था, नागरिक यांच्याशी झालेल्या विस्तृत चर्चांवर आधारित असे '२०३० साली आपले जग कसे असायला हवे' याचे हे चित्र मी सादर करीत आहे. सन २०३० साली माझ्या कल्पनेतील जग असे असेल... त्यात ग्रामीण आणि शहरी जनता, श्रीमंत आणि गरीब, विकसित आणि विकसनशील यांच्यातील तफावत बरीच कमी झालेली असेल. त्यावेळी वीज आणि शुद्ध पाण्याचे वाटप न्याय्य झालेले असेल. सर्वांना परवडणारी उत्तम दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध असेल. प्रत्येक राष्ट्राची बलस्थाने आणि अंगभूत क्षमता सिद्ध आणि स्पष्ट झालेल्या असतील. या क्षमतांच्या सुसूत्रीकरण आणि एकत्रीकरणाच्या मोहिमांतूनच राष्ट्रांना आर्थिक लाभ आणि गतिमान विकासाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होणार आहे. प्रशासन जनतेला प्रतिसाद देणारे, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असेल. महिला आणि मुलांशी संबंधित गुन्हे थांबलेले असतील आणि समाजातील कोणालाही आपण एकटे, वेगळे पडलो आहोत असे वाटणार नाही. ते जग असे असेल, ज्यात प्रत्येक राष्ट्र आपल्या नागरिकांना स्वच्छ, हिरवेगार पर्यावरण देऊ शकेल. प्रत्येक राष्ट्र उत्कर्षशील, सुरक्षित, दहशतवादापासून मुक्त, शांत आणि सुखी असेल. राष्ट्रांचे नेतृत्व सृजनशील असेल त्यामुळे ते राष्ट्रांमधील, समाजांमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा उभारून, कार्यान्वित करून शांतता आणि उत्कर्ष हेच आपले ध्येय मानतील. सन २०३० मधील जगाच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक असेल, ग्रामीण आणि शहरी जीवनांतील विषमता कमी करणे. जगभरातील तीनशे कोटींहून अधिक लोक ग्रामीण विभागात राहतात आणि त्यांच्यासाठी सर्वसमावेशक विकास, टिकाऊ शांतता आणि सर्वव्यापी उत्कर्ष साध्य करण्यासाठी या जनतेचे सक्षमीकरण महत्त्वाचे आहे. ग्रामीण-शहरी तफावत दूर करण्याचा प्रश्न हा दारिद्र्यनिवारण आणि विषमतेवर मात करण्याच्या मोहिमेशी जवळून संबंधित आहे. जगभरातील सुमारे ७० टक्के अत्यंत गरीब लोक खेड्यांमध्ये राहतात. शिक्षण, आरोग्यसेवा आणि उत्पन्न मिळविण्याच्या गरजेतून ग्रामीण लोकसंख्या शहरी भागांत स्थलांतर करीत आहे, चांगल्या संधींचा शोध घेण्याची धडपड करीत आहे, पण तिच्या वाट्याला निराशाच येत आहे. यामुळे शहरांतील गरिबीमध्ये भर पडते आणि समाजात विषमतेची दरी, संघर्ष निर्माण होतो. जगभरातील ग्रामीण भागांत अद्यापही उपयोगात आलेली साधनसामग्री, क्षमता, परंपरागत कौशल्ये आहेत. त्यांना त्यांच्या साधनांच्या, कौशल्यांच्या मूल्यवृद्धीसाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. म्हणूनच त्यासाठी काळाच्या ओघात टिकणाऱ्या, चिरस्थायी यंत्रणा विकसित करणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागांना शहरी सोयी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट अशा टिकाऊ विकास यंत्रणेद्वारे करावयाचे आहे. त्यातून तीन प्रकारच्या जोडण्या- (कनेक्टिव्हिटीज) निर्माण कराव्या लागतील. एक, प्रत्यक्षातील म्हणजे 'फिजिकल', दुसरी इलेक्ट्रॉनिक आणि तिसरी ज्ञानाची ('नॉलेज'). यातून 'आथिर्क जोडणी' निर्माण होईल. गावांचे परस्परांशी आणि शहरांशी उत्तम रस्त्यांद्वारे आणि आवश्यक तेथे रेल्वेमार्गांनी दळणवळण प्रस्थापित झाले पाहिजे. खेड्यांना शाळा, महाविद्यालये, इस्पितळे या पायाभूत सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत. ही झाली 'फिजिकल कनेक्टिव्हिटी'. तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या अद्ययावत साधनांद्वारे स्थानिक ज्ञानपरंपरेचे रक्षण आणि संवर्धन केले गेले पाहिजे. गावांना उत्तम शिक्षकांकडून उत्तम शिक्षण मिळण्या-बरोबरच चांगली वैद्यकीय सेवा, कृषी, मत्स्यव्यवसाय, फलोज्ञान आणि अन्नपदार्थ प्रक्रिया याबाबतची नवनवी माहिती खेड्यांत उपलब्ध झाली पाहिजे. ही झाली 'इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी'. एकदा या दोन जोडण्या अस्तित्वात झाल्या की 'नॉलेज कनेक्टिव्हिटी' अमलात आणली जाऊ शकेल. 'नॉलेज कनेक्टिव्हिटी'तून उत्पादनक्षमता, माहितीचा प्रसार, आरोग्यसेवेतील पारदर्शकता आणि बाजारपेठांशी संपर्क हे साध्य होऊशकेल. या तीन 'कनेक्टिव्हिटीज' साध्य झाल्या की त्यातून उत्पन्न वाढविण्याची क्षमता, त्यातून 'इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी'पर्यंत पोहचण्यासाठी गती मिळेल. जेव्हा आपण ग्रामीण भागांना शहरी सुखसोयी पुरवू शकू, तेव्हाच ग्रामीण भागांतील जीवनमान उंचावू शकू, गुंतवणूक आकषिर्त करू शकू. मग त्यावेळी ग्रामीण बीपीओज आणि 'मायक्रोफायनान्स'च्या यंत्रणांचा परिणामकारक वापर करू शकू. हे सर्व करण्यासाठी नेतृत्वाजवळ निर्णय घेण्याचे धाडस असले पाहिजे. नेतृत्वाजवळ उमदे व्यवस्थापन, पारदर्शक व्यवहार आणि कामाची सचोटी असली पाहिजे. 'ग्लोबल व्हिजन २०३०'मध्ये प्रदूषणविरहित स्वच्छ पर्यावरण, गरिबीशिवाय उत्कर्ष, युद्धाच्या भीतीपासून मुक्त शांतता आणि जगभरातील सर्व नागरिकांना राहण्यासाठी हे जग एक सुखाचे ठिकाण बनणे अभिप्रेत आहे. ही समान ध्येये साध्य करण्यासाठीच्या मोहिमेत जगातील अनेकानेक देशांचा, संस्थांचा आणि लोकांचा सहभाग आवश्यक आहे
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites