March 2015 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

28 March 2015

उद्योजकीय मानसिकता आत्मसात करा - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'उद्योजकीय मानसिकता आत्मसात करा' या विषयावरील दिनांक २५ मार्च २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

नमस्कार मित्रांनो, एखादा व्यक्ती जेव्हा आपला स्वतःचा उद्योग सुरु करतो तेव्हा तो उद्योजक बनतो. स्वतःचा उद्योग सुरु करणं आजच्या युगात तसं फारसं कठीण नाही. कोणतीही व्यक्ती कोणत्याही वयात स्वत:चा उद्योग सुरु करु शकते. उद्योजक होण्यासाठी कोणतीही औपचारीक पात्रता लागत नाही. शिक्षणाचीही अट नाही, किंवा वयाची मर्यादा नाही. बर्‍याच तरुणांना आजकाल व्यवसायात यायची इच्छा असते, खास करुन सर्विस इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची देखिल आवश्यकता नसते. त्यामुळे असंख्य पहिल्या पिढीचे उद्योजक स्वतःचा उद्योग सुरु करतात. सुरु केल्यानंतर प्रत्येक व्यवसाय हा यशस्वी होतोच असे नाही, त्यामागे मला जाणवणारे प्रमुख कारण म्हणजे, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी 'उद्योजकीय मानसिकता' फार कमी उद्योजकांनी आत्मसात केलेली असते.

मित्रांनो, माझं असं ठाम मत आहे की उद्योजकता ही मानसिकता आहे. व्यवसाय करत असलेल्या व्यक्तीची मानसिकता ठरवते की तो व्यक्ती खर्‍या अर्थाने उद्योजक आहे की नाही. मी बर्‍याच लघुउद्योजकांना व्यक्तीगतरित्या ओळखतो, त्यांना मार्गदर्शन करतो. त्यामुळे माझ्या अनुभवावरुन मी सांगु शकतो की प्रत्येक लघूउद्योजक हा कागदावर उद्योजक जरी असला तरी मानसिकतेने तो उद्योजक असतोच असं नाही. उद्योजक होण्यासाठी कोणत्याही प्रकारची औपचारिक पात्रता जरी लागत नसली, तरी यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रत्येक उद्योजकाने 'वैचारीक पात्रता' नक्कीच आत्मसात केली पाहीजे. उद्योजकीय मानसिकता' आत्मसात करण्यासाठी प्रत्येक लघुउद्योजकाने ७ महत्वाचे गुणधर्म आत्मसात केले पाहीजेत. कोणताही व्यवसाय सुरु करताना उद्योजकाने हे ७ गुणधर्म आत्मसात करणे व्यवसायाच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरु शकतात. उद्योजकीय मानसिकतेचे ७ गुणधर्म कोणते ते समजुन घेऊया.

१) आत्मविश्वास : मित्रांनो, यशस्वी उद्योजक होण्यासाठी सर्वात महत्त्वाची डिग्री लागते ती म्हणजे 'आत्मविश्वास' व पैकीच्या पैकी गुण मिळवावे लागतात 'सकारात्मक प्रवृत्ती' मध्ये. आपले शिक्षण किती आहे? आपले वय काय आहे? आपली जात-धर्म कोणता आहे? आपला भुतकाळ कसा होता? ह्या सर्व गोष्टींचा फारसा प्रभाव आपल्या व्यावसायिक कामगिरीवर होऊच शकत नाही जर आपला स्वतःवर प्रचंड विश्वास असेल. व्यवसाय सुरु केल्या नंतर, खास करुन सुरुवातीच्या काळात आपल्याकडे सर्वात महत्त्वाचा कोणता एक असेट असला पाहीजे तर तो म्हणजे आपला 'आत्मविश्वास'. व्यवसाय चालवताना आपल्या मार्गामध्ये असंख्य अडचणी येतात, कित्येक घटना आपल्या मनाविरुध्द् घडतात, प्रत्येक वळणावर आव्हानं आपली वाट पाहत असतात या सर्व परिस्थितीवर मात करायची असेल तर आपण मानसिकरीत्या सक्षम असणे अत्यावश्यक असते. या सर्व आव्हानांना बिनधास्तपणे तोंड देण्यासाठी आपला आत्मविश्वासच आपल्या कामी येतो. टुरिझम इंडस्ट्रीमधील अग्रगण्य कंपनी 'केसरी टुर्स' चे संस्थापक श्री. केसरी पाटील यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी, प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमध्ये केसरी टुर्सची स्थापना केली. त्यांचा आत्मविश्वास हीच त्यांची त्यावेळची अमुल्य संपत्ती असेल या बद्दल मला शंका नाही.

२) स्वातंत्र प्रिय परंतु वचनबध्द : मित्रांनो, यशस्वी उद्योजकांना स्वातंत्र प्रिय असते. बर्‍याच जणांची अशी समजुत असते उद्योजकीय स्वातंत्र म्हणजे 'आपल्याला कोणी विचारणार नाही!' स्वातंत्र म्हणजे आपण पाहीजे तेव्हा काम करु शकतो, पाहीजे तेव्हा नाही. स्वातंत्र म्हणजे आपण आपल्या मर्जीचे मालक? परंतु मी या स्वातंत्र्याबद्द्ल बोलत नाही आहे. उद्योजकाकडे स्वातंत्र असते व्यवसायाचे ध्येय ठरवण्याचे! नक्की आपला व्यवसाय किती मोठा करायचा या बाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र उद्योजकाकडे असते. आपण किती पैसा कमवायचा हे ठरवण्याचे स्वतंत्र्य उद्योजकाकडे असते. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे स्वातंत्र त्याच्याकडे असते. महत्त्वाची साधनसामुग्री उपलब्ध करण्याचे, योग्य व्यक्तींबरोबर, पुरवठादारांबरोबर स्नेहसंबंध प्रस्थापित करण्याचे, व्यवसायात महत्त्वाच्या योजना राबवण्याचे इ. स्वातंत्र उद्योजकाकडे असते. परंतु सर्वात महत्त्वाचे ठरवलेल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी उद्योजक १००% वचनबध्द् असला पाहीजे. यशस्वी उद्योजकांची त्यांच्या व्यावसायिक ध्येयांना अनुसरुन प्रचंड वचनबध्द्ता असते. ते माघार घेत नाहीत, प्रयत्न करणे सोडत नाहीत. काय साध्य करायचे ते ठरवण्याचे स्वातंत्र्य उद्योजकाकडे असते परंतु ते साध्य करण्यासाठी तो स्वतःशी वचनबध्द् असतो.

३) भविष्याचा वेध घेणारा, संधीसाधक व लवचिकपणा असलेला : उद्योजकीय मानसिकतेचा हा गुणधर्म फार कमी उद्योजकांकडे असतो. माझ्या संपर्कात येणार्‍या बर्‍याच लघुउद्योजकांच्या बाबतीत मला हे प्रकर्षाने जाणवतं की जगात होत असलेल्या बदलांचा त्यांच्या व्यवसायावर व बाजारपेठेवर काय परिणाम होईल याचा वेध ते घेत नाहीत. आदर्श उद्योजक भविष्याचा वेध घेतो, होणार्‍या बदलांना ओळखतो, त्यामधे तो संधी शोधतो व व्यवसायामध्ये त्याला अनुसरुन बदल घडवून आणण्यासाठी तो लवचिकपणा दाखवतो. 'मोडेन पण, वाकणार नाही' या विचारसरणीचा तो नसतो. उलट तो 'वाकेन पण मोडणार नाही' या मानसिकतेचा असतो.

४) ध्येयवादी व परिश्रम घेण्यास तयार : उद्योग उभारणी करत असताना, उद्योजकाकडे स्पष्ट ध्येय असणे अत्यंत गरजेचं असतं. ध्येयाशी गाठ बांधल्यानंतर ते साध्य करण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागेल तेवढी मेहनत करण्याची तयारी उद्योजकाची असली पाहीजे. खास करुन कोणत्याही उद्योगाच्या सुरवातीच्या काळात दिवस रात्र एक करुन परिश्रम घ्यावे लागतात. उद्योगामध्ये एक प्रकारे गतिज उर्जा निर्माण करण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. आदर्श उद्योजकाची तशी मानसिक तयारी असते. तो उत्साहाने काम करतो, न थकता, न थांबता. जे. आर. डी. टाटा यांची अविरतपणे काम करण्याची क्षमता विलक्षण होती. त्यांच्या सभोवतालची माणसे त्यांना बघुन थक्क व्हायची. लार्सन अ‍ॅंन्ड टुर्बोचे अध्यक्ष ए. एम. नाईक वायाच्या ७४ व्या वर्षी १४ ते १६ तास काम करतात. तळवळकर जिमचे अध्यक्ष श्री. मधुकर तळवळकर सर वयाच्या ८२ व्या वर्षी आजसुध्दा कंपनी मध्ये रोज सक्रीयपणे काम करतात. आपले व्यावसायिक ध्येय साध्य करण्यासाठी यशस्वी उद्योजक वाट्टेल तेवढे परिश्रम घेण्यास तयार असतात.

५) पैशांच महत्त्व : मित्रांनो, व्यवसायासाठी पैसा हा खुप महत्त्वाचं साधन आहे. प्रत्येक उद्योजकाने पैशाला महत्त्व दिलच पाहिजे. आपण व्यवसाय यशस्वीपणे करत आहोत की नाही. हे व्यवसायातील कोणता एक घटक ठरवतो? उत्तर किती सोपं आहे. प्रॉफिट! जर व्यवसायाला पैसा कमवता आला नाही तर व्यवसाय फार काळ टिकणार नाही, आणि जर व्यवसायाला पैसा कमवायचा असेल तर त्याचा कर्ताधर्ता उद्योजकाला पैश्याचं महत्त्व माहीत असलं पाहिजे. पैसे कमवायला महत्त्व देणं म्हणजे चैनीच्या वस्तुंचा उपभोग घेणं, ऐश करणं असं नाही. तर पैश्याचा योग्य प्रकारे वापर करुन व्यवसायाची आर्थिक प्रगती घडवून आणणे व त्याच प्रमाणे व्यवसायाशी संलग्न व्यक्तींचे जीवन समृध्द करणे. जगातील सर्व यशस्वी उद्योजक पैशांना महत्त्व देतात, म्हणुनच ते आर्थिक यश मिळवतात.

६) उत्कृष्ट विक्री कौशल्य : मित्रांनो, ग्राहकाला उत्पादन व सेवा विकत घेण्यास प्रवॄत्त करण्यासाठी विक्री कौशल्य फार महत्त्वाची भुमिका बजावते. परंतु उद्योजकाच्या मानसिकतेमध्ये उत्कृष्ट विक्री कौशल्य असण्याचे कारण असे की उद्योजक आपल्या मनातील संकल्पना त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींना कळत नकळत विकत असतो. ग्राहकांना आपले उत्पादन कसे त्यांना उपयुक्त आहे हे पटवून देण्यासाठी, आपल्या कर्मचार्‍यांना ध्येयसाध्य करण्यासाठी प्रेरीत करण्यासाठी, पुरवठादारांना योग्य किंमतीत चांगल्या दर्जाचे उत्पादन व सेवा पुरवण्यासाठी, बँका किंवा गुंतवणुकदारांकडून आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी, सरकारी अधिकार्याकडून हव्या त्या मान्यता मिळवण्यासाठी उद्योजकाकडे उत्कृष्ट विक्री कौशल्य असलेच पाहीजे. उत्कृष्ट विक्री कौशल्य असलेली व्यक्ती इतरांवर प्रभाव पाडू शकते. जर आपल्याला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या लोकांवर प्रभाव हा पाडावाच लागेल.

७) विनम्र व अहंकार विरहीत : मित्रांनो, आपला आत्मविश्चास, क्षमता व आपण केलेले परिश्रम यांच्या जोरावर आपण यशस्वी व्हाल व यशाच्या शिखरावर पोहोचाल परंतु तिथे पोहोचल्यानंतर जर आपण अहंकार बाळगला तर जास्त काळ आपण त्या शिखरावर टिकू शकणार नाही. मी अश्या कित्येक उद्योजकांना ओळखतो जे एका विशिष्ट पातळी पर्यंत पोहोचून यशस्वी झाले परंतु त्यांनी मिळवलेल्या यशाच्या अहंकाराचे ते बळी पडले. त्यांचा 'इगो' इतका वाढतो की व्यवसायापेक्षा तो जपणे जास्त महत्त्वाचं त्यांना वाटू लागतो. त्यांचा विनम्रपणा नष्ट होतो व त्यांनी मिळवलेल्या यशाच्या जोरावर त्यांना आदर व सन्मानाचा जास्त लोभ वाटु लागतो. त्यादरम्यान त्यांच्या व्यवसायावरचा फोकस हलतो व व्यवसायाला उतरती कळा लागते.

मित्रांनो, मला प्रामाणिकपणे असं वाटतं की एखादी व्यक्ती जर नोकरी करत असेल परंतु वरील सात गुणधर्मांचं पालन करत असेल तर ती एक प्रकारे उद्योजकच आहे. परंतु एखाद्या व्यक्तीचा कागदावर स्वतःचा व्यवसाय असेल परंतु वरील सात गुणधर्म त्याच्या मानसिकतेत नसतील तर तो स्वतःच्या व्यवसायात नोकरीच करत आहे असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार कारण 'उद्योजकता' ही मानसिकता आहे. पेशा नाही!
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि 7666426654 या क्रमांकावर पाठवा.

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.
http://goo.gl/uNdKBy

24 March 2015

आधी इतरांना समजुन घ्या - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माणसे जोडूया, जग जिंकूया' या सदरातील 'आधी इतरांना समजुन घ्या' या विषयावरील दिनांक २३ मार्च २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

"प्लीज मला समजुन घ्यायचा प्रयत्न कर!"
"तु मला कधीच समजुन घेत नाहीस"
"He will never understand my feelings."
मित्रांनो ही वाक्य बर्‍याच वेळा आपल्या कानावर पडत असतील, किंवा आपण सुध्दा कधीतरी, कोणाबद्दल तरी, कळत नकळत हे असे बोलत असु. आपल्यापैकी प्रत्येकालाच असं वाटत असतं की इतर व्यक्तींनी आपल्याला समजुन घेतलं पाहिजे. खास करुन आपले कुटुंबिय, आपला मित्रपरिवार व आपले सहकारी ज्यांच्या बरोबर आपण दिवसातील जास्त वेळ व्यतित करतो. सहाजिकच आहे आपल्या जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तींनी जर आपल्याला समजुन घेतलं तर आपलं जगणं किती सुखकर होईल. परंतु प्रश्नं असा पडतो की इतरांनी आपल्याला समजुन घेण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? मित्रांनो, इतरांनी जर आपल्याला समजुन घ्यावं असं वाटत असेल तर सर्वात रामबाण मार्ग म्हणजे, 'आधी इतरांना समजुन घ्या!'

आपण जर आधी इतरांना समजुन घेण्यासाठी पुढाकार घेतला तर इतर देखिल आपल्याला समजुन घेण्यासाठी पुढे सरसावतात. जर आपण त्यांना समजुन घेत आहोत तर त्यांना सुध्दा आपल्याला समजुन घेण्याची नैतिक जबाबदारी जाणवते आणि ते आपल्याला समजून घेतात. जसं आपल्याला वाटतं की इतरांनी आपल्याला समजुन घ्यावं. तसचं इतरांनाही वाटत असत की आपण त्यांना समजुन घ्यावं. म्हणून आपण आधी इतरांना समजुन घेण्यासाठी स्वतःमध्ये समजुतदारपणा आणला पाहिजे. परंतु आणखी एक प्रश्न पडतो की इतरांना समजुन घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
मित्रांनो, समजुन घेणं म्हणजेच इतर व्यक्ती ज्या परिस्थितीमध्ये आहेत ज्या अनुभवातून सध्या जात आहेत, त्याठिकाणी आपण स्वतःला ठेवून कल्पना करणे की जर आपण त्या व्यक्तीच्या जागी असतो तर आपल्याला कसं वाटलं असतं. जेव्हा आपण स्वतःला दुसर्‍या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करतो त्यावेळी आपल्याला त्या व्यक्तीच्या भावनांची जाणिव होते व आपण त्या व्यक्तीला समजुन घेऊ शकतो. परंतु आणखी एक प्रश्न निर्माण होतो की त्या व्यक्तीची परिस्थिती किंवा अनुभव आपल्याला कळणार कसा? आपण अंतरज्ञानी नाही आहोत! म्हणूनच जर आपल्याला इतर व्यक्तींना समजुन घ्यायचं असेल तर आपण त्या व्यक्तीचं बोलणं 'कान आणि मन लावून ऐकलं' पाहीजे. जेव्हा आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील व्यक्ती किंवा आपला सहकारी त्याच्याबद्दल सांगत असेल त्यावेळी त्याचं म्हणणं शांतपणे ऐका. त्या व्यक्तीच्या भावना समजुन घ्या. फक्त ऐकू नका. कान व मन लावून ऐका. फक्त कानाने ऐकल्याने आपल्याला माहीती मिळते परंतु कान व मन लावून ऐकल्याने त्या व्यक्तीच्या भावनांची आपल्याला जाणिव होते, व आपल्याला व्यक्तीच्या खर्‍या परिस्थितीची जाणिव होते. इतर व्यक्तींचं म्हणणं ऐकल्यामुळे समजुन घेतल्यामुळे सहाजिकच त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपुलकी व मैत्री निर्माण होते. त्यामुळे आपलं म्हणणं ऐकण्यासाठी ती व्यक्तीसुध्दा पुढाकार घेते.

मित्रांनो, ऐकणं हे कोणत्याही संभाषणामध्ये बोलण्याइतकचं प्रभावी ठरु शकतं. आपल्याला देवाने दोन कान व एक तोंड दिलं आहे. बहूतेक हाच संदेश त्यातुन आपण घ्यायला हवा की त्याच प्रमाणामध्ये बोला आणि ऐका. कमी बोला आणि जास्त ऐका! आपल्या स्नेहसंबंधांमध्ये यशस्वी होण्यासाठी एक चांगला श्रोता होणं गरजेचं आहे. चांगला श्रोता म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असेल, तेव्हा कान व मन लावून ऐका.
मित्रांनो, आज मी आपल्याला एक आव्हान देतो, आजच व आत्तापासुनच दुसर्‍यांचं म्हणणं शांतपणे, कान व मन लावून ऐकण्याचा निर्णय घ्या. जेव्हा दुसरी व्यक्ती बोलत असेल तेव्हा मनामध्ये आपलं उत्तर तयार करु नका. जेव्हा एखादी व्यक्ती आपले विचार मांडत असेल तेव्हा दुसरीकडे कुठेच लक्ष देऊ नका; फक्त मनापासुन ऐका. त्या व्यक्तीला महत्त्व द्या. प्रत्येक व्यक्तीच्या मनात बर्‍याच गोष्टी दडल्या आहेत. त्यांना व्यक्त व्हायचं आहे. त्यांना वाट करुन द्या. फक्त एवढं करुन बघा आणि आपल्या स्नेहसंबंधांमध्ये चमत्कार अनुभवा. इतर व्यक्ती देखिल आपल्याला महत्त्व देऊ लागतील व आपलं म्हणणं, ऐकतील. आपल्याला समजुन घेतील. जर इतरांनी आपल्याला समजुन घ्यावं असं वाटत असेल तर आधी इतरांना समजुन घ्या.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि 7666426654 या क्रमांकावर पाठवा...

वेबसाईट: www.born2win.in
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.
http://goo.gl/uNdKBy

19 March 2015

उद्योजकता... म्हणजे काय रे मित्रा? - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'उद्योजकता म्हणजे काय?' या विषयावरील उद्योजकीय मानसिकता उलगडणारा दिनांक १८-मार्च-२०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...
नमस्कार मित्रांनो 'माझा बिझनेस मित्र' या सदराअंतर्गत मी उद्योजक मित्रांशी संवाद साधणार आहे. आज बर्‍याच प्रमाणात मराठी तरुण उदयोग क्षेत्रात येत आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरु करुन तो यशस्वी करण्याच्या उद्देशाने ते निरनिरळ्या क्षेत्रांमध्ये बिझनेस करत आहेत. 'मराठी माणूस धंदा करु शकत नाही!' ही समजुत हळूहळू इतिहास जमा होऊ लागली आहे. मी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात गेल्या १० वर्षांपासुन कार्यरत आहे. प्रामुख्याने मराठी माणसाने स्वतःचा व्यवसाय सुरु करावा व नोकरी मागणार्‍यांच्या यादीत सामिल न होता नोकरी देणार्‍यांच्या यादीत सामिल व्हावे या विचारांचा मी आहे. परंतु आपल्यापैकी बहूतांश मराठी लघुउद्योजक, खास करुन पहिल्या पिढीचे लघुउद्योजकांना व्यवसायाचा काहीच अनुभव नसतो. त्यांच्याकडे विशिष्ट क्षेत्राचे थोडेफार तांत्रिक ज्ञान असते. त्याच्या आधारावर ते स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतात. उद्योजक बनतात! परंतु व्यवसायाचा अनुभव पाठीशी नसल्यामुळे, व्यावसायिक कौशल्य आत्मसात न केल्याने व व्यवसाय उभारणीबद्दल आवश्यक ज्ञान नसल्यामुळे कित्येक लघुउद्योजक वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असतात. मी शेकडो मराठी लघुउद्योजकांना व्यक्तिगतरित्या ओळखतो. त्यांच्या व्यवसायाबद्द्ल मला इथंबुत माहीती आहे व त्यांच्या अडचणी मी जवळून पाहिल्या आहेत. मी स्वतःदेखिल एक उद्योजक आहे. त्यामुळे 'माझा बिझनेस मित्र' या सदराव्दारे मी लघुउद्योजक मित्रांना, दर आठवडयाला आपला व्यवसाय यशस्वी करण्याच्या मार्गावर येणार्‍या अडचणींवर परिणामकारकपणे मात करण्यासाठी एक कानमंत्र देणार आहे. मी ठामपणे सांगु शकतो प्रत्येक कानमंत्र आपल्याला आपली व्यावसायिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी लाभदायक ठरेल.
मित्रांनो आपण एक उद्योजक आहात. परंतु उद्योजकता म्हणजे काय? ह्या मुलभुत प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजुन घेतलं पाहीजे. जो पर्यंत आपण 'उद्योजकता' या शब्दाचा अर्थ समजुन घेत नाही तो पर्यंत आपण उद्योजकीय मानसिकतेचा अवलंब करु शकत नाही. बर्‍याच व्यक्तींची अशी समजुत असते की उद्योजक म्हणजे 'आपण आपल्या मर्जीचे मालक' असणे. आपण हवे ते करु शकतो व त्याचे आपल्याला पैसे मिळतात. बर्‍याच जणांना असं देखिल वाटत असते की उद्योजकता म्हणजे स्वावलंबी असणे, भरपुर मेहनत घेण्याची तयारी असणे व सर्व गोष्टी आपण स्वतः करणे. आपल्या, उद्योजकते विषयीच्या समजुती ठरवत असतात की एक उद्योजक म्हणुन आपण किती प्रगती कराल. आणि म्हणुनच 'उद्योजकता' म्हणजे काय हे समजुन घेणं महत्त्वाचे आहे.
मित्रांनो, उद्योजकता म्हणजे Entrepreneurship (आंत्रप्रुनियरशीप) उद्योजक म्हणजे Entrepreneur ( आंत्रप्रुनियर). 'आंत्रप्रुनियर' हा शब्द इंग्रजी जरी असला तरी त्यांचं मुळ फ्रेंच भाषेमध्ये आहे. या शब्दाचा अर्थ आहे 'अशी व्यक्ती जी जोखिम घेते'. Someone who undertakes risk. उद्योजकाचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'जोखिम' आपल्याला उद्योजकता म्हणजे काय हे समजुन घ्यायचं असेल तर उद्योजक जोखिम का घेतो व कशी घेतो हे समजुन घेतलं पाहीजे. उद्योजकाने जोखिम घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 'बाजारपेठेतील व्यावसायिक संधी'. उद्योजक संधी ओळखुन त्यातुन यश मिळवण्यासाठी जोखिम घेतो व व्यवसाय उभारणीसाठी तो आपली कार्यक्षमता, पैसा, वेळ, मनुष्यबळ व यंत्रणा पणाला लावतो. त्या मोबदल्यात मिळालेले यश किंवा अपयशाला सामोरे जाण्याची त्याची तयारी असते.
मित्रांनो, जो पर्यंत बाजारपेठेत संधी नाही तो पर्यंत व्यवसाय किंवा कोणतंही प्रॉडक्ट किंवा सर्विस अस्तित्वात येणं अशक्य! उद्योजकाकडे ही संधी ओळखण्याची नजर असली पाहीजे. तसा दॄष्टिकोन आपसुक नसेल तर उद्योजकांनी विकसित केला पाहीजे. उद्योजक नेहमी भविष्याचा वेध घेणारा व त्यामध्ये संधी शोधणारा असला पाहीजे. एकदा व्यावसायिक संधी हेरली की मग वेळ येते रिस्क घेण्याची म्हणजेच जोखिम घेण्याची! व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी उद्योजक महत्त्वाचे रिसोर्स उपलब्ध करुन देतो व रिसोर्स उपलब्ध करुन देण्यासाठी त्याला जोखिम घ्यावी लागते. जोखिम घेण्यासाठी उद्योजकाने पुरेसा अभ्यास करणे गरजेचे आहे. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी उद्योजकाने कार्यक्षमता, संस्था व यंत्रणा, मनुष्यबळ, आर्थिक भांडवल व वेळ या सर्व रिसोर्सची योग्य त्या प्रमाणात उपलब्धता करुन दिली पाहीजे.
कार्यक्षमता : व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक ज्ञान व कौशल्य.
संस्था व यंत्रणा : व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी संस्था निर्माण करणे व त्या अंतर्गत सुनियोजीत यंत्रणा प्रस्थापित करणे.
मनुष्यबळ : योग्य प्रमाणामध्ये आवश्यक कार्यक्षमतेचे मनुष्यबळ उपलब्ध करणे.
आर्थिक भांडवल : व्यवसाय उभारणीसाठी लागणारा पैसा उभा करणे.
वेळ : आपला वेळ व्यवसाय निर्मितीसाठी गुंतवणे.
वरील सर्व बाबी जेव्हा उद्योजक उपलब्ध करतो तेव्हा तो एक प्रकारे जोखिम घेतो. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी प्लान बनवतो व कृती करतो. साध्य होणार्‍या परिणांमाना उद्योजक स्वतः सामोरा जातो. मग तो परिणाम यश असेल कींवा अपयश! आणि हा मुलभुत फरक आहे उद्योजकांमध्ये व इतरांमध्ये. 'Entrepreneur takes risk & experiences the consequences!' व्यवसायाच्या वाट्याला जर अपयश आलं तर त्याचा भुर्दंड उद्योजकालाच भरावा लागतो. आणि जर यश हाती आलं तर त्याचा मोलाचा वाटा उद्योजकाच्या वाट्याला येतो. म्हणुनच जगातील सर्वात श्रीमंत माणसे हे उद्योजकच असतात. त्यांनी घेतलेल्या जोखिमेचा त्यांना फार मोठा मोबदला मिळतो. कारण व्यवसाय उभारणीची एवढी मोठी जोखिम जर उद्योजक घेत असेल आणि जर अपयश आले तरी तो सामोरा जात असेल तर यश मिळाल्यावर त्याच्या जोखिमेच्या प्रमाणातच त्याला मोबदला मिळतो.
मित्रांनो, बरेच लघुउद्योजक व्यवसायाच्या सुरुवातीलाच जोखिम घेतात. थोडेफार यशस्वी होतात. परंतु त्यानंतर व्यवसाय विकासासाठी जोखिम घेणं थांबवतात. नवीन संधीचा शोध घेत नाहीत. नवीन रिसोर्सची निर्मीती करत नाहीत. फक्त आहे तो व्यवसाय टिकवण्यावर भर देतात. बचावात्मक पवित्रा घेतात. माझ्यामते असे उद्योजक फक्त कागदावरच उद्योजक असतात. मानसिकतेने ते निवृत्त उद्योजक असतात असं मला वाटतं.
मित्रांनो, उद्योजकाचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'जोखिम' व्यवसायात अग्रेसर राहण्यासाठी उद्योजकांनी सातत्याने 'अर्थपूर्ण जोखिम' घेणं गरजेचं आहे. जो जोखिम घेतो तो उदयोजक! हे सुत्र लक्षात ठेवलं पाहीजे. त्यासाठी भविष्याचा वेध घेणारा दृष्टीकोन अवलंबला पाहीजे. जगातील बाजारपेठेत होणार्‍या गोष्टींचा आढावा घेतला पाहीजे. नवीन संधींचा ठाव घेतला पाहीजे व संधींच सोनं करण्यासाठी, व्यवसाय उभारणी केली पाहीजे. आणि त्यासाठी जोखिम घेतली पाहीजे.
लक्षात ठेवा, बंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असते. पण तिथे ठेवण्यासाठी जहाज बनवले जात नाही.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि 7666426654 या क्रमांकावर पाठ्वा...

वेबसाईट: www.born2win.in
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.
http://goo.gl/uNdKBy


11 March 2015

प्रथम दर्शनी छाप - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील दिनांक ९ मार्च २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

नमस्कार मित्रांनो! 'माणसे जोडूया, जग जिंकूया' या माझ्या सदरा अंतर्गत मी आपल्या बरोबर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. लोकांशी संवाद साधून त्यांच्याशी उत्कृष्ट स्नेहसंबंध जोपासून व त्यांचं सहकार्य मिळवून आपण नेमकी कश्या प्रकारे प्रगती करु शकतो हे आपण या सदराद्वारे समजुन घेऊ शकाल. त्याच बरोबर नक्की कोणती कृती केल्यामुळे मांडण्यात आलेल्या विचारांची आपल्याला अंमलबजावणी करता येईल यावर माझा भर असेल, आणि निश्चितच अगदी साध्या व सोप्या भाषेत मी माझे विचार व्यक्त करेन. चला तर मग 'माणसे जोडूया जग जिंकुया!'
मित्रांनो, लोकांशी नेमकं कसं वागावं आणि कसं बोलावं? हा खुप मोठा प्रश्न बहूतांश व्यक्तींना सतावत असतो. विशेषतः जर आपण व्यावसायिक वर्तुळात वावरत असाल तर नक्कीच ही गोष्ट आपल्याला जाणवत असेल. त्याच प्रमाणे जर आपण गृहीणी असाल, विद्यार्थी असाल किंवा निवृत्त व्यक्ती असाल तरीसुध्दा ती तितकीच महत्त्वाची बाब आहे. 'कार्नेगी फाउंडेशन' या संस्थेने या विषयावर रिसर्च केला, त्या दरम्यान असे निष्पन्न काढण्यात आले की, व्यक्तींची आर्थिक प्रगती ही १५% त्याच्या तांत्रिक ज्ञानावर अवलंबून असते आणि ८५% प्रगती ही परस्पर व्यवहारावर कौशल्यावर अवलंबून असते.
मित्रांनो, मी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षणक्षेत्रात गेल्या १० वर्षांपासुन कार्यरत आहे. हजारो व्यक्ती माझ्या विविध कार्यशाळांमध्ये भाग घेत असतात. बर्‍याच व्यक्तींशी माझा वैयक्तिक संपर्क देखिल होतो. बहुतांश व्यक्तींना परस्पर व्यवहार कौशल्याबद्दल औपचारीक शिक्षणादरम्यान मार्गदर्शन मिळालेलेच नसते व त्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात प्रगती करण्यासाठी मदतीची गरज असते. 'माणसे जोडूया जग जिंकुया!' या सदरा अंतर्गत याच महत्त्वाच्या विषयाला अनुसरुन मी निरनिराळ्या संकल्पना मांडेन. आज पासुन त्याची आपण सुरुवात करुया, 'प्रथमदर्शनी छाप' कशी पाडावी या समकल्पनेपासुन!
मित्रांनो, आपली प्रथम दर्शनी छाप म्हणजे आपलं 'फर्स्ट इंप्रेशन'! असं म्हंटलं जात की 'Your first impression is your last impression.' खरं आहे, कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो, तेव्हा कळतनकळत त्या व्यक्तिवर आपला प्रभाव हां पडतच असतो. मग तो प्रभाव सकारात्मक असेल तर त्या व्यक्तीबरोबर आपण चांगले स्नेहसंबंध प्रस्थापित करु शकतो व भविष्यात नक्कीच त्या व्यक्तीचे सहकार्य मिळणे आपल्याला सोपे जाईल. नकारात्मक प्रभावामुळे ते शक्य होणार नाही. आपण आपली प्रथमदर्शनी छाप प्रभावशाली नक्कीच करु शकतो. प्रथमदर्शनी छाप पाडण्यासाठी आपल्याकडे फारसा वेळही नसतो. फक्त काही सेकंद असतात तर मग एवढ्या कमी वेळेत हे शक्य आहे का? हो मित्रांनो! हे शक्य आहे! आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर पहिल्या 'चार सेकंदात' प्रभाव पाडू शकतो! प्रथमदर्शनी छाप पाडण्यासाठी, चार सेकंद पुरेशी आहेत. या चार सेकंदांमध्ये, खालिल चार गोष्टी जाणीवपुर्वकपणे करा...
१. पहिला सेकंद-
डोळ्यात डोळे घालुन पाहा: मित्रांनो, सर्व प्रथम आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो, त्या व्यक्तीशी कनेक्ट होण्यासाठी आपण त्या व्यक्तीशी 'आय कॉन्टॅक्ट' करायला हवा. आपली नजर थेट त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये असली पाहिजे. जर आपली नजर स्थिर नसेल तर त्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्या व्यक्तीच्या चेहर्‍याकडे आपण सहज नजरेने पाहिल्याने, त्या व्यक्तीचा चेहरा सुध्दा लक्षात राहण्यास मदत होते. कृपया डोळे वटारुन पाहू नका. आपले बघणे सहज, स्वाभाविक असु द्या!
२. दुसरा सेकंद-
स्माइल: आपल्या चेहर्‍यावर छान असे स्मितहास्य ठेवा. आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटत आहात याचा आपल्याला आनंद होत आहे हे त्या व्यक्तीला जाणवू द्या. त्या व्यक्तीला भेटण्याआधी आपला मुड कसाही असला तरी त्या व्यक्तीला भेटताना मात्र चेहरा प्रफुल्लित असु द्या. लक्षात ठेवा आपण ज्या प्रमाणे त्या व्यक्तीच्या चेहर्‍याकडे पाहत आहोत त्याच प्रमाणे ती व्यक्ती सुध्दा आपल्या चेहर्‍याकडे पाहत आहे. स्मितहास्यामुळे दोन्ही व्यक्तींमध्ये त्वरीत सकारात्मक उर्जा निर्माण होते. स्मितहास्य म्हणजे मोठमोठ्याने हसणे नव्हे! जस्ट स्माइल प्लिज!
३. तिसरा सेकंद-
हस्तांदोलनः जर प्रोफेशनल वर्तुळात वावरत असाल तर त्या व्यक्तीला भेटण्यासाठी व हस्तांदोलन करण्यासाठी आपला उजवा हात पुढे करा. जेणेकरुन त्या व्यक्तीला सुचित होईल. हस्तांदोलन करताना हाताची पकड मध्यम ठेवा. एकदम घट्ट नाही किंवा एकदमच सैलही नाही. भारतीय संस्कृतीनुसार पुरुष स्त्रीला भेटत असेल तर हस्तांदोलनासाठी पुढाकार घेण्याचा अधिकार स्त्रीकडे आहे. अश्यावेळी हस्तांदोलन ऐवजी 'नमस्ते' करु शकता.
४. चौथा सेकंद-
अभिवादन: स्पष्ट आवाजात व विनम्रपणे 'नमस्कार', ‘Good Morning’, ‘Good Afternoon’, ‘Good Evening’ असे ग्रीट करा.
मित्रांनो, चार सेकंदात आपण कोणत्याही व्यक्तीवर सकारात्मक प्रथम दर्शनी छाप पाडू शकतो. १. डोळ्यात डोळे घालुन पाहा २. स्मितहास्य करा ३. हस्तांदोलन करा ४. अभिवादन करा. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व मनापासून करा. आपल्या वागणुकीमध्ये दिखावा नसला पाहिजे.
मी सांगितलेल्या चार सोप्या व परिणामकारक मंत्रांचे पालन करा व परस्पर व्यवहार कौशल्य आत्मसात करण्यासाठी पहिली पायरी उचला.
माणसे जोडूया जग जिंकुया!
ऑल द बेस्ट!

- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि ७६६६४२६६५४ या क्रमांकावर पावा...

वेबसाईट: www.born2win.in
फेसबुकः www.facebook.com/AtulRajoliBORN2WIN
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा येथे क्लिक करा.


Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites