2016 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

31 December 2016

२०१६ चे खुप धन्यवाद आणि सुस्वागतम २०१७!

नमस्कार मित्रांनो,
काही तासांतच २०१६ या वर्षाची सांगता होईल आणि आपण २०१७ या नवीन वर्षामध्ये पदार्पण करू तर सर्वप्रथम तुम्हाला नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. २०१६ या वर्षाचा निरोप घेताना काही आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो ज्या BORN2WIN च्या परिवारासाठी अत्यंत महत्त्वाच्या व यशस्वी ठरल्या. आपल्या सर्वांच सहकार्य व सदिच्छेमुळेच आमच्यासाठी हे वर्ष अविस्मरणीय होतं त्यासाठी Team BORN2WIN आपली नेहमीच कृतज्ञशिल राहिल.
मित्रांनो BORN2WIN चे मिशन आहे 'लोकांना अर्थपूर्ण आणि समृध्द जीवन जगण्यास मदत करणे', हे जगण्यासाठी BORN2WIN ने वेगवेगळ्या कार्यशाळा व प्रशिक्षणक्रम या वर्षीही आयोजित केले होते.
जानेवारी २०१६ मध्ये BORN2WIN ने आपल्या कारकिर्दीची ८ वर्षे पूर्ण केली व आता ९ वे वर्ष २०१७ जानेवारी मध्ये पूर्ण करणार आहे.

जगातील व्हिजनरी व्यवसायांच्या अभ्यासावर आधारित व प्रभावी उद्योजकीय नेतृत्व गुणांच्या संशोधनावर आधारित अतुल राजोळी यांचा एक विचार परिवर्तित करणारा कार्यक्रम The Secrets of Visionary Business. भव्यदिव्य व्यवसायिक स्वप्नं आपल्या उराशी बाळगणार्‍या प्रत्येक उद्योजकांसाठी १६ जानेवारी आणि १६ जून २०१६ रोजी ठाणे येथे उद्योजकांच्या उस्त्फुर्त प्रतिसादात पार पडला.
The Secrets of Visionary Business  १६ जानेवारी २०१६

The Secrets of Visionary Business  १६ जून २०१६

३१ जानेवारी २०१६ रोजी BORN2WIN चा लोकप्रिय कार्यक्रम The Success Blue Print ठाणे येथे दणक्यात पार पडला.
The Success Blue Print

BORN2WIN ने खास उद्योजक व प्रोफेशनल्स यांच्यासाठी The Magic of Magnetic Marketing ही एक दिवसीय कार्यशाळा अंधेरी येथे चाणाक्य इंन्स्टिट्युट मध्ये २६ फेब्रुवारी आणि २४ सप्टेंबर रोजी आयोजित केली. या कार्यशाळेमध्ये आपल्या Product व Services ची माहिती आपल्या संभाव्य ग्राहकापर्यंत प्रभाविपणे मांडून बाजारपेठेत आपल्या व्यवसायाची वेगळी छाप निर्माण करुन जास्तीत-जास्त ग्राहक आपल्याकडे कसे आर्कषित करायचे याबद्दल मार्गदर्शन मिळाले.
The Magic of Magnetic Marketing २६ फेब्रुवारी २०१६


The Magic of Magnetic Marketing २४ सप्टेंबर २०१६

नवोदित उद्योजकांसाठी स्वतःमधील उद्योजकाला जागे करा ही कार्यशाळा १० एप्रिल रोजी प्रभादेवी व २९ सप्टेंबर रोजी माटुंगा येथे नवोदित उद्योजकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली.
स्वतःमधील उद्योजकाला जागे करा १० एप्रिल २०१६


स्वतःमधील उद्योजकाला जागे करा २९ सप्टेंबर २०१६

प्रथमच Branding  या विषयावर आधारित A-Tool For Branding ही एकदिवसीय कार्यशाळा ४ मे आणि २२ डिसेंबर २०१६ रोजी BORN2WIN च्या ऑफीस मध्ये आयोजित करण्यात आली होती, ह्या मध्ये Branding बाबतचे तंत्र, मंत्र व शास्त्र यांचा उलघडा झाला व उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा Brand बनविण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.
A-Tool For Branding ४ मे २०१६


A-Tool For Branding २२ डिसेंबर २०१६

२३ जून रोजी  Professional Selling Skills ही उद्योजकांना जबरदस्त प्रभावशाली विक्री कौशल्य व कृती योजनांवर आधारित कार्यशाळा होती.

Professional Selling Skills

SPIN SELLING PLUS ही SELLING Skills वर आधारीत एक दिवसीय practical कार्यशाळा २२ जुलै रोजी दणदणीतरीत्या पुर्ण झाली.

SPIN SELLING PLUS

१० ऑगस्ट २०१६ रोजी सुसज्ज व्हा यशस्वी व्हा ही एकदिवसीय कार्यशाळा तसेच ९ नोव्हेंबर रोजी विश्वास निर्मिती वेगवान प्रगती ही एक दिवसीय कार्यशाळा माटुंगा येथे मैसुर असोसिएशन हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती. 
सुसज्ज व्हा यशस्वी व्हा!

विश्वास निर्मिती वेगवान प्रगती!

१५ ऑगस्ट स्वातंत्र दिवसाच्या निमित्ताने संगमनेर येथे एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. १०००+ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता, अतिशय उत्साही आणि जबरदस्त असा हा स्वातंत्र्यदिन खर्‍या अर्थाने साजरा झाला.
संगमनेर येथी एक दिवसीय कार्यशाळा

या वर्षी लक्ष्यवेध जो स्वप्नांना वास्तवात बदलणारा एक परिणामकारक प्रशिक्षणक्रम आहे, त्याच्या  २६वी (स्पेशल २६), २७वी (सत्ता सत्तावीसची), २८वी (Fantastic 28) व २९वी (Leap २९) बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाल्या व आता ३०वी बॅच उत्साहात सुरु आहे. झालेल्या बॅचचा पदवीदान समारंभ ज्या सोहळ्याची आजी-माजी प्रशिक्षणार्थी आतुरतेने वाट पाहत असतात, म्हणजेच लक्ष्यसिद्धी सोहळा देखील दिमाखात पार पडला. २६ वा लक्ष्यसिद्धी सोहळा ५ मार्च रोजी रचना सांसद हॉल व २७वा लक्ष्यसिद्धी सोहळा २९ मे रोजी टेक्सटाईल हॉल, प्रभादेवी येथे पार पडला.
२६ वा लक्ष्यसिद्धी सोहळा

२७वा लक्ष्यसिद्धी सोहळा

३१ ऑगस्ट रोजी २८ वा लक्ष्यसिध्दी सोहळा मैसुर असोसिएशन, माटुंगा (पूर्व) येथे झाला. 'BVG Group' चे चेअरमन श्री. हणमंतराव गायकवाड यांनी 'एक असामान्य यशोगाथा' यामधून त्यांचा प्रेरणादायी उद्योजकीय प्रवास सर्वांन समोर मांडला.
२८ वा लक्ष्यसिध्दी सोहळा

१० डिसेंबर रोजी २९व्या लक्ष्यसिध्दी सोहळ्या मध्ये आर्थिक क्रांती, या विषयावर  गौतम ठाकूर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाचा विषय पैसा आणि त्याला अनुसरुन यावर्षी जे Demonetisation झाले आहे ते अगदी सोपे करुन त्यांनी सर्वांनसमोर मांडले.
 वा लक्ष्यसिध्दी सोहळा

या वर्षी ३१ जुलै रोजी आपली Graphology ची १०वी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून बॉर्न टू विन ने आत्तापर्यंत जवळ जवळ २५० Graphologist घडवले आहेत. दहाव्या बॅचच्या प्रशिक्षणर्थ्यांची कामगिरी देखिल जबरदस्त होती. 
Graphology ची १०वी बॅच

दरवर्षी प्रमाणे उन्हाळी सुट्टीमध्ये बॉर्न टू विन तर्फे राबविण्यात येणारा 'फ्युचर पाठशाला' हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम मे २०१६ मध्ये विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात दणदणीतरित्या पार पडला. त्याचप्रमाणे फ्युचर पाठशाला कार्यशाळेचा समारोप समारंभ म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम फ्युचर पाठशाला जोश २०१६ दिनांक २९ मे २०१६ रोजी, मैसुर असोसिएशन, माटुंगा मध्ये अतिशय उत्साहवर्धक व भारावून टाकणार्‍या वातावरणात पार पडला. फ्युचर पाठशालाचे वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थींनी आपल्या प्रेरणादायी परफॉर्मन्सव्दारे हा कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांना मोहीत करुन टाकलं. कर्यक्रमातील ऊर्जा व तरुणाईचा जल्लोष खरोखरच जबरदस्त असा होता. 
फ्युचर पाठशाला जोश २०१६

MBX म्हणजेच Marathi Business Xchange, ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वरळी येथे महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेला आगळा वेगळा कार्यक्रम. महाराष्ट्रीय उद्योजकांच्या उपक्रमांचे प्रदर्शन, विविध विषयांवर दिग्गजांची चर्चासत्रे, उद्योजकांसाठी महत्त्वाच्या विषयांवर तज्ञांच्या कार्यशाळा आणि व्यावसायिक नेटवर्किंग अश्या भन्नाट संकल्पनेवर आधारीत ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून उद्योजकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. MBX च्या पहिल्याच प्रयत्नाला चांगले यश मिळाले.
MBX : Marathi Business Xchange

वास्तुरविराज या भारतातील वास्तुशास्त्र क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या २५० वास्तु तज्ञांना "आपला वास्तु व्यवसाय यशस्वीपणे वाढावा" या विषयावर अतुल राजोळी २ऑक्टोबर रोजी ठाणे येथे व २३ ऑक्टोबर रोजी पुणे येथे मार्गदर्शन केले.. सर्व वास्तु तज्ञांनी कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला..!!
आपला वास्तु व्यवसाय यशस्वीपणे वाढावा

मित्रांनो, वर्ष २०१६ कधी सुरु झालं कधी संपलं कळलंच नाही. या वर्षभरामध्ये टिम बॉर्न टू विनने उल्लेखनिय कामगिरी नक्कीच केली. २०१६ वर्षाचा निरोप घेताना २०१६ मध्ये जे काही साध्य केलं व शिकलो त्याचा सकारात्मक दृष्टीकोन गाठीशी बांधून बॉर्न टू विन वर्ष २०१७ साठी पुन्हा एकदा सज्ज आहे.
Thank You 2016... Welcome 2017...!

15 December 2016

व्यवसाय विकासाचे ७ मार्ग - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! कोणताही यशस्वी उद्योजक नेमकं काय करतो? उद्योजकाची आपल्या व्यवसायामध्ये नेमकी भुमिका काय? माझ्या मते यशस्वी उद्योजक, आर्थिक जोखिम घेऊन व्यवसायाचे आदर्श व्यवसायात रुपांतर करतो व व्यवसायाचा विस्तार करतो. यशस्वी उद्योजकाचे लक्ष व्यवसायाचा विकास करण्यावर असते. कोणत्याही यशस्वी व्यवसायाच्या वाटचालीचा आलेख हा चढता असतो. व्यवसायाला सतत प्रगतीपथावर ठेवण्यासाठी सातत्याने व्यवसाय वृध्दी करत राहणे अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी व्यवसायाने मागिल वर्षापेक्षा जास्त आर्थिक उलाढाल केली पाहीजे, व्यवसायाचे उत्पन्न मागिल वर्षापेक्षा वाढले पाहीजे. यशस्वी उद्योजकाकडे व्यवसायाचा विकास करण्याची मानसिकता असते. भविष्यात निरनिराळ्या मार्गांनी आपला व्यवसाय कसा वाढवता येईल?  हा प्रश्न सतत तो आपल्या मनात स्वतःला विचारत असतो. 

मित्रांनो, या लेखामध्ये मी आपल्याला व्यवसाय विकासाच्या ७ युक्त्या सांगणार आहे. या ७ युक्त्यांचा विचार करुन आपण, आपला सध्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी नक्कीच काहीना काही कृती करु शकता.

१) ग्राहकांची संख्या वाढवा:
व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात ग्राहकांची संख्या कमी असते. त्यानंतर ग्राहकांची संख्या वाढते. बर्‍याच वेळा ग्राहकांची संख्या word of mouth मुळे वाढते. बरेच उद्योजक जाणिवपूर्वकपणे ग्राहक वाढवण्यासाठी कृती योजना आखत नाहीत. आपल्या बाजारपेठेत उपलब्ध जास्तीत जास्त संभाव्य ग्राहकांपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहीजे. आपल्या व्यवसायाचं उत्पन्न पुर्णपणे आपल्या ग्राहकांच्या संख्येवर अवलंबून आहे. आपले ग्राहक जेवढे जास्त, तेवढा आपला व्यवसाय मोठा. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्या व्यवसायाकडे आकर्षित करा. त्यासाठी प्रभावी मार्केटींग तंत्रांचा वापर करा. जास्त ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचे प्रॉडक्ट व सेवा देण्यासाठी व्यवसाया अंतर्गत प्रबळ यंत्रणा निर्माण करा.


२) उत्पादन व सेवेची किंमत वाढवा:
बाजारपेठेमध्ये जशी मागणी वाढू लागते तशी उत्पादन व सेवेची किंमत वाढवून सुध्दा व्यवसाय वृध्दी करता येते. परंतु हे तितके सोपे नाही. त्यासाठी 'ब्रँड' निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागते. आपल्या उत्पादन व सेवेच्या गुणवत्तेमध्ये सुध्दा सुधारणा करावी लागते. ग्राहक आपल्या उत्पादन व सेवेसाठी जास्त वेळ तेव्हाच देतो जेव्हा त्याला त्याचं मुल्यं योग्य वाटतं. आपल्या उत्पादन व सेवेची किंमत नेहमी योग्य असली पाहीजे.

३) उत्पादन व सेवेची संख्या वाढवा:
व्यवसायाची एका विशिष्ट पातळी पर्यंत प्रगती झाल्यानंतर व्यवसायाचे एकनिष्ठ ग्राहक निर्माण होतात. त्यापैकी मोठा ग्राहकवर्ग प्रस्थापित झाल्या नंतर याच ग्राहकाला आपल्या व्यवसायासंबंधित व इतर ज्या गरजा असतात त्यांना आधारीत उत्पादने व सेवा आपल्या व्यवसायामार्फत उपलब्ध करुन द्या. आपला सध्याचा समाधानी ग्राहक आपल्या कडून आणखी इतर गोष्टी विकत घेण्यासाठी तयार असतो. त्याला इतर उत्पादने व सेवा आपल्या व्यवसायाव्दारे विकत घेण्याची संधी द्या. त्यासाठी आपल्या सध्याच्या ग्राहकांच्या इतर गरजा ओळखा. गरजा ओळखल्यानंतर उत्पादने व सेवेंची निर्मिती करा. त्यासाठी आपण इतर व्यवसायांबरोबर सहयोगाने गरजा पुर्ण करु शकता.  

४) भौगोलिक क्षेत्र वाढवा:
आपले उत्पादन व सेवेचे सध्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये बर्‍यापैकी जम बसवल्यानंतर, ज्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये संभाव्य ग्राहकांची संख्या मुबलकपणे आहे. त्या ठिकाणी आपले उत्पादन व सेवा कश्याप्रकारे विकता येईल यासाठी योजना आखा. आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपल्या व्यवसायाची मर्यादा कोणतेही भौगोलिक स्थान, सिमा ठरवू शकत नाही. ज्या ठिकाणी, संधी आहे तिथे आपण आपल्या व्यवसायाची वृध्दी करु शकता. मग ते ठिकाणी कोणतेही शहर असुदे, जिल्हा असुदे, राज्य असुदे किंवा देश असुदे. भौगोलिक क्षेत्र वाढवल्याने व्यवसायाचा व्याप वाढतो म्हणुनच प्रबळ व्यवस्थापन यंत्रणेची गरज भासते. प्रबळ व्यवस्थापन यंत्रणा नसेल तर व्यवसायाचा विस्तार होणे कठीण होऊन बसते.

५) उत्पादन व सेवा खरेदीची पुनरावृत्ती वाढवा:
जेवढा उत्पादन व सेवेचा वापर जास्त तेवढी विक्रीची संधी जास्त. ग्राहकाने उत्पादन व सेवेच्या खरेदीची पुनरावृत्ती होते. त्यामुळे साहजिकच व्यवसायात वाढ होते. ग्राहक आपल्याकडे पुन्हा पुन्हा येण्यासाठी उत्पादनांच्या वापरामध्ये कश्या प्रकारे वाढ करता येईल यावर विचारमंथन करा.
उदाहरणार्थ: कॅडबरी चॉकलेटने आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रसंगी कॅडबरी खाण्यास प्रवृत्त केलं, भारतीय सणांदरम्यान मिठाई ऐवजी कॅडबरी खाण्यास ग्राहकांना सांगितले, मग दर महिन्याच्या पहील्या दिवशी, मग कोणत्याही गोष्टीच्या शुभारंभाआधी कॅडबरीने आपल्याच ग्राहकांना खरेदीचि पुनरावृत्ती करायला लावून आपल्या व्यवसायाची वृध्दी केली.

६) उत्पादन व सेवा वितरणाची माध्यमे वाढवा:
एखाद्या रेस्टॉरंट ला आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर वितरणाची माध्यमे वाढवावीच लागतात. रेस्टॉरंट मध्ये येऊन खाण्या व्यतिरीक्त इतर माध्यमांव्दारे आपले उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवावी लागतात.
उदाहरणार्थ: टेक अवे सर्विस, फ्री होम डीलीव्हरी, कॅटरर्स सर्विस, फ्रँचायजी इ. आपले उत्पादन व सेवा निरनिराळ्या वितरणा माध्यमांतुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आजकाल इंटरनेटच्या युगात. इ-कॉमर्स वेबसाईटचा वापर करुन जगाच्या कानाकोपर्‍यात आपले उत्पादन आपण पोहोचवू शकता. 

७) नविन ग्राहक वर्गाला उत्पादन व सेवा विक्री करा:
सध्या आपण विशिष्ठ ग्राहक वर्गापुरते उत्पादन व सेवा विक्री करत असाल तर पुर्णपणे वेगवेगळ्या ग्राहकवर्गाला कश्याप्रकारे विक्री करता येईल याबाबत योजना आखा. जर पुन्हा एकदा रेस्टॉरंटच उदाहरण द्यायचं झालं तर रेस्टॉरंटच्या जवळपास जर व्यावसायिक संकुल असेल तर तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी टिफीन सर्विसेस ते सुरु करुन पुर्णपणे नविन ग्राहक वर्गाला आपल्या व्यवसायाकडे आकर्षित करु शकतात. एखादा व्यवसाय रिटेल ग्राहकांना जर विक्री करत असेल तर तो बिझनेस टू बिझनेस विक्री करण्यासाठी विशेष पाऊलं उचलुनं आपला ग्राहक वर्ग वाढवू शकतो. बिझनेस टू बिझनेस व्यवसाय करणारा उद्योजक सरकारी कामे करण्यासाठी कृती करु शकतो याला 'सेगमेंटेशन' असं सुध्दा म्हाणतात. त्या व्दारे व्यवसाय एका नव्या ग्राहकवर्गाच्या 'सेगमेंट' मध्ये शिरतो.

मित्रांनो, मला ठाम विश्वास आहे की वरील ७ युक्त्यांमुळे आपल्या विचारांना चालना मिळाली असेल व 'व्यवसाय वृध्दी' करण्यासाठी आपण प्रेरीत झाला असाल. उद्योजकाला आपला व्यवसाय वाढवण्याखेरीज खरे तर पर्यायच नाही.

भारत हा एक विकसित होणारा देश आहे त्यामुळे आपल्याला महागाईला सामोरं जावं लागतं, म्हणुनच आपल्या व्यवसायाच्या विकासाचा वेग किमान महागाई मात करेल इतका तरी असलाचं पाहिजे. तरचं आपण व्यवसायात तग धरून उभे राहू शकू.

'व्यवसायातील विकास' अनुभवण्यासाठी पाउल उचला.

7666426654 या क्रमांकावर संपर्क करा किंवा 'GROWTH' असे whatsapp करा. बॉर्न टु विनचे Growth Consultant आपल्याला संपर्क करतील. आजच मोफत One To One भेट द्या.

21 October 2016

'एक असामान्य यशोगाथा' - श्री. हणमंतराव गायकवाड



बॉर्न टू विनच्या अठ्ठाविसाव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यातील, श्री. हणमंतराव गायकवाड यांच्या 'एक असामान्य यशोगाथा' या विषयावरील प्रभावशाली व्याख्यानाचा व्हिडियो पाहण्यासाठी खालिल YouTube लिंकवर क्लिक करा.


व्हिडियो पहा व इतरांबरोबर शेअर करा.


PArt 1



Part 2




Part 3



07 October 2016

सात उद्योजकीय स्वातंत्र्य!

नमस्कार उद्योजक मित्रांनो!
आपण उद्योजक होण्याचा निर्णय नक्की का घेतलात? उद्योजक बनून आपल्याला काय असं मिळणार होतं म्हणून आपण ही जोखिम घेतली? आपला स्वतःचा व्यवसाय सूरु करण्यामागचं नेमकं कारण काय? मित्रांनो, मी हा प्रश्न माझ्या उद्योजकीय विकास कार्यशाळांमध्ये नेहमीच विचारतो. माझ्या समोर बसलेल्या उद्योजकांची या प्रश्नावर निरनिराळी उत्तरे येतात. परंतु त्या सर्व उत्तरांना एकत्रित करुन जर एकाच शब्दात उत्तर द्यायचं झालं, तर मी ठामपणे सांगु शकतो की प्रत्येक उद्योजकाला स्वतःचा उद्योग सुरु करुन जे खरोखरचं हवं असतं ते म्हणजे 'स्वातंत्र्य'!
प्रत्येक उद्योजकाला आपल्या व्यवसायाव्दारे 'अर्थपुर्ण व समृध्द' जीवन जगण्याचं स्वातंत्र्य हवं असतं. हो मित्रांनो! अर्थपुर्ण आणि समृध्द जीवन! माझ्यामते यशस्वी उद्योजकांकडे अर्थपुर्ण आणि समृध्द जीवन जगण्याचं स्वातंत्र्य असतं. मी बऱ्याच यशस्वी उद्योजकांचा मी अभ्यास केला, (त्यामधील काही उद्योजक आज हयात नाहीत.) माझ्या अभ्यासादरम्यान मला असं जाणवलं की प्रत्येक यशस्वी उद्योजक आपलं जीवन अर्थपुर्ण आणि समृध्दपणे जगतो.
अर्थपुर्ण जीवन जगण्याचं स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मुल्यांनुसार जगण्याचं स्वातंत्र्य, आपल्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्यांच्याशी तडजोड न करता जगण्याचं स्वातंत्र्य, आपलं जीवन एका उद्देशाशी निगडीत जगण्याचं स्वातंत्र्य, आपल्या जीवनाव्दारे इतरांना काहीतरी योगदान देण्याचं स्वातंत्र्य.

समृध्द जीवन जगण्याचं स्वातंत्र्य म्हणजे आपलं ध्येय ठरवून ते साध्य करण्याचं स्वातंत्र्य, आपल्या विचारांनी, भावनांनी व कृतीनी वैभवशाली होण्याचं स्वातंत्र्य, प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचं स्वातंत्र्य, आपले स्नेहसंबंध उत्कृष्ठपणे जोपासण्याचे स्वातंत्र्य, आपले आरोग्य ठणठणीत ठेवून उत्साही व प्रफुल्लीतपणे जगण्याचं स्वातंत्र्य, आर्थिकरित्या सोइस्कर व समधानकारकपणे जगण्याचे स्वातंत्र्य व खर्‍याअर्थाने यशस्वी जीवन जगण्याचं स्वातंत्र्य!

मित्रांनो, माझं असं ठाम मत आहे की आपण यशस्वी उद्योजक आहोत असं तेव्हाच म्हणू शकू जेव्हा आपण अर्थपुर्ण व समृध्द जीवन जगु. प्रत्येक उद्योजकाकडे तसं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य उपलब्ध आहे. परंतु प्रत्येक उद्योजक स्वतंत्रपणे आपले जीवन जगतोच असे नाही. फार थोडे उद्योजक खर्‍या अर्थाने अर्थपुर्ण व समृध्द जीवन जगत असतात. इतर उद्योजकांसाठी ते आदर्श असतात. इतर उद्योजकांना सुध्दा या यशस्वी उद्योजकाप्रणाने जीवन जगायची इच्छा असते. परंतु सर्वांना तसं जीवन जगता येत नाही. या लेखामध्ये आपण जाणुन घेऊया उद्योजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय?
मित्रांनो, उद्योजकतेबद्दलची एक व्याख्या जी मला प्रचंड आवडते , ती म्हणजे, "उद्योजकता म्हणजे काही वर्ष असं आयुष्य जगणं जे इतरं कोणी जगण्याचं धाडस करत नाहीत, जेणे करुन उर्वरीत आयुष्य अश्याप्रकारे जगणं जे इतर कोणी जगु शकत नाही!" किती खरं आहे यशस्वी उद्योजक स्वतंत्र्यपणे जीवन जगतात, जे इतरांसाठी स्वप्नंवत असतं. जे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी त्यांनी व्यवसाय सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला, त्या स्वातंत्र्याचा अगदी मनमुरादपणे आस्वाद घेत असतात. बरेच लघुउद्योजक व्यवसाय सुरु करण्याची जोखिम घेतात, परंतु त्यांना 'उद्योजकीय स्वातंत्र्य' मात्र साध्य होत नाही.

मित्रांनो माझ्यामते कोणत्याही उद्योजकाला व्यवसाय उभारणी करताना स्पष्टपणे ठाऊक असले पाहीजे की त्याला नेमकं कोणतं स्वातंत्र्य आपल्या व्यवसायामार्फत अनुभवायचं आहे. आपल्या व्यवसायाची जडण-घडण त्याने अश्या प्रकारे केली पाहीजे जेणे करुन त्याला हवे असलेले स्वातंत्र्य त्याला अनुभवता येईल. प्रत्येक उद्योजकाला आपल्या व्यवसायाच्या माध्यमातुन इच्छित स्वातंत्र्य जरी अपेक्षित असले तरी प्रत्येक उद्योजकाला वेगळं स्वातंत्र्य हवं असतं. माझ्या मते उद्योजकीय स्वातंत्र्य सात प्रकारची असतात. सात उद्योजकीय स्वातंत्र्यापैकी काही महत्त्वाची स्वातंत्र्य उद्योजकाला हवी असतात.

सात उद्योजकीय स्वातंत्र्य :

१) आदर्श व्यक्ती बनण्याचं स्वातंत्र्य:
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची काही मुल्यं असतात. प्रत्येकाची इच्छा असते की आपण आपल्या मुल्यांप्रमाणे वागावे. परंतु प्रत्येकाला त्याच्या मुल्यांप्रमाणे जीवन जगता येतचं असे नाही. बर्‍याच वेळा उद्योजकांना नैतिकतेला धाब्यावर बसवून 'धंदा' करावा लागतो. त्यांना ठाऊक असतं की आपलं वागणं व निर्णय आदर्श नाहीत. जे उद्योजक आपल्या मुल्यांशी तडजोड न करता यशस्वी होतात ते इतरांसाठी आदर्श असतात. उदाहरणार्थ: इंम्फोसिस या जगविख्यात भारतीय कंपनीचे संस्थापक श्री. नारायण मुर्ती, सुरुवाती पासुनच आपल्या मुल्यांशी तडजोड करण्यास तयार नव्हते. सचोटी व स्वाभिमान या त्यांच्या वैयक्तिक मुल्यांना अनुसरुनच ते आपले जीवन जगत आहेत म्हणूनच त्यांना हवं असलेलं उद्योजकीय स्वातंत्र्य त्यांना नक्कीच प्राप्त झालं.

२) वेळेचं स्वातंत्र्य:
काही उद्योजकांना 'सकाळी ९ ते संध्याकाळी ६' या चाकोरीबध्द् जीवना पासुन स्वातंत्र्य हवे असते. त्यांना आपल्या व्यवसायापसुन आपला वेळ आपल्याला हव्या त्या पध्द्तीने व्यतीत करायचा असतो. पाहीजे तेव्हा काम, पाहीजे तेव्हा विश्रांती, पाहीजे तेव्हा मजा! उदारणार्थ: 'व्हर्जिन गृप' या आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी कंपनीचे सर्वेसर्वा सर रिचर्ड ब्रॅन्सन, हे स्वातंत्र्य प्रेमी म्हणुन प्रसिध्द आहेत. आज ते १०० पेक्षा जास्त व्यवसायांचे मालक आहेत परंतु आपला वेळ पाहीजे हवा तसा व्यतीत करतात. ९ ते ६ च्या कचाट्यापासुन ते मुक्त आहेत.

३) हवं ते काम करण्याचं स्वातंत्र्य: काही उद्योजकांना एखाद्या गोष्टीचा प्रचंड ध्यास असतो. त्यांना आपलं जीवन एका विशिष्ट कार्यासाठी समर्पित करण्याची इच्छा असते. त्यामुळे ते एखादा विशिष्ट व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. जीवन भर आपल्याला ज्या गोष्टीत रस आहे, ज्या गोष्टीत क्षमता आहे व जे केल्याने त्यांना प्रचंड समाधान मिळतं अशी गोष्टचं सातत्यानं केल्याने त्यांना उद्योजकीय स्वातंत्र्य लाभते. उदाहरणार्थ: तंत्रज्ञान क्षेत्रात नाविन्यपुर्ण नवनिर्मिती हा एकमेव ध्यास असलेले 'अ‍ॅपल' चे जनक स्टीव्ह जॉब्स् आपल्या शेवटच्या श्वासा पर्यंत अविरतपणे आपला ध्यास असलेले कार्य करत होते. माझ्यामते 'उद्योजकीय स्वातंत्र्य' त्यांनी खर्‍या अर्थाने अनुभवले.

४) आर्थिक स्वातंत्र्य: कित्येक उद्योजक आपला व्यवसाय स्थापन करतात कारण त्यांना प्रचंड पैसा कमवायचा असतो. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीवर जर आपण एक दृष्टीक्षेप टाकला तर आपल्याला आढळून येईल की ही सर्व माणसे उद्योजक आहेत. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झालेल्या उद्योजकांकडे प्रचंड पैसा असतो. आर्थिक स्वातंत्र्य प्रात्प झालेली ही उद्योजकमंडळी एक सुखकर जीवन जगत असतात. जगातील सर्व भैतिक सुख त्यांना सहज परवडणारे असते. उदाहरणार्थ: 'रिलायन्स ग्रुपचे' जनक श्री. धीरुभाई अंबानी हे सुरुवातीपासुनच प्रचंड संपत्ती निर्माण करण्याचे स्वप्न पहायचे. आर्थिक स्वातंत्र्य त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे होते ते त्यांनी मिळवले. धीरुभाईंनी आपलं आणि इतरांचं जीवनही समृध्द केलं.

५) सामाजिक कार्याचं स्वातंत्र्य: बर्‍याच उद्योजकांना आपल्या समाजासाठी, राष्ट्रासाठी किंवा जगासाठी काहीतरी योगदान देण्याची प्रचंड इच्छा असते त्यामुळे ते उद्योजक होऊन आपल्या व्यवसायामार्फत सामाजिक गरजांना पुर्ण करण्याचे ठरवतात. काही उद्योजक आपल्या उत्पादन व सेवांव्दारे समाजाची गरज भागवतात, काही उद्योजक जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करुन सामाजिक गरज भागवतात, काही उद्योजक आपल्या व्यवसायातील नफा सामाजिक कार्यासाठी अर्पण करतात, काही उद्योजक राष्ट्राच्या प्रगतिला हातभार लावण्यासाठी धडपडत असतात, काही उद्योजक जगाच्या विकासासाठी अथकपणे कार्यरत असतात. आपण केलेल्या योगदानाव्दारे त्यांना उद्योजकीय स्वातंत्र्य प्राप्त होते. उदाहरणार्थ: मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेटस्, आज त्यांनी निर्माण केलेल्या संपत्तीव्दारे जगातील अडचणी दुरकरण्यासाठी कार्यरत आहेत. बी. व्ही. जी ग्रुपचे संस्थापक श्री. हणमंतराव गायकवाड भारताच्या विकासाला हातभार लावण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास उत्साहाने कृती करत आहेत. श्री. रामदेव बाबा यांनी पतंजली संस्थेव्दारे लोकांच्या उपयोगी, नाविन्यपुर्ण स्वदेशी उत्पादने स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे.

६) मानवी स्नेहसंबंधांचं स्वातंत्र्य: काही उद्योजक आपल्या महत्त्वाच्या नाते संबंधांच्या हीतासाठी व्यवसायात येतात. आपल्या कुटुंबियांच्या सर्व गरजा व इच्छा पुर्ण करण्यासाठी त्यांना व्यवसाय करणे योग्य वाटते. नोकरी करुन आपल्या स्नेहसंबंधांसाठी विशेष काही आपण करु शकणार नाही असं त्यांना जाणवतं आणि म्हणूनच ते उद्योजक बनण्याचा निर्णय घेतात. बरेच यशस्वी व्यवसाय हे 'फॅमिली मॅनेज्ड् व्यवसाय' असतात. पिढ्यान पिढ्या हे व्यवसाय सुरु असतात. उदाहरणार्थ: भारतातील फिटनेस इंडस्ट्रीजचे जनक श्री. मधुकर तळवलकर सर यांनी स्वतःच्या व्यायामशाळा सुरु करुन आपला ध्यास असलेल्या क्षेत्रात व्यवसाय सुरु केला परंतु त्यामागे आणखी एक महत्त्वाचा उद्देश आपल्या कुटुबियांना उज्ज्वल भविष्य देणे हा सुध्दा होता. आज तळवलकर सरांची चौथी पिढी त्यांच्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यासाठी कार्यरत आहे. माझ्या मते मधुकर तळवलकर सर अर्थपुर्ण आणि समृध्द जीवन जगण्याचे एक आदर्श उदाहरण आहेत.

७) यशस्वी होण्याचं स्वातंत्र्य: बर्‍याच उद्योजकांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची आंतरिक इच्छा असते. ही ओळख आपल्या व्यवसायाव्दारे होईल अशी आशा बाळगुन ते व्यवसाय सुरु करतात. व्यवसाय यशस्वी करुन आपण जगात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करावं असं त्यांना वाटत असतं. उदाहरणार्थ: श्री. दिपक सखाराम कुलकर्णी यांनी 'डी. एस. के.' अशी स्वतःची एक यशस्वी ओळख निर्माण केली. डी. एस. के. आज एक यशस्वी उद्योग समुह म्हणुन ओळखला जातो. निरनिराळ्या उद्योग क्षेत्रांमध्ये डी. एस. के. यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज डी. एस. के. उद्योजकीय स्वातंत्र्य अनुभवत आहेत.

मित्रांनो वरिल सात स्वातंत्र्यामधील सर्वच स्वातंत्र्य प्रत्येक उद्योजकाला हवी असतात असं मुळीचं नव्हे. या स्वातंत्र्यामधील काही स्वातंत्र्य आपल्याला महत्त्वाची वाटत असतील. मुद्दा हा आहे की आपण आपल्या व्यवसायाची जडणघडण अश्याप्रकारे केली पाहीजे की आपल्या व्यवसायामार्फत आपल्याला ही स्वातंत्र्य प्राप्त होईल. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातुन आपण अर्थपुर्ण व समृध्द जीवन जगु शकू.
उद्योजक मित्रांनो, आपल्याला नेमंक कोणतं स्वातंत्र्य हवं आहे हे ओळखा. आपल्या व्यवसायाची उभारणी त्या नुसार करा. अर्थपुर्ण व समृध्द जीवन जगण्याच्या दिशेने पाऊल उचला. लक्षात ठेवा, 'उद्योजकता' म्हणजे 'काही वर्ष असं आयुष्य जगणं हे इतर कोणी जगण्याचं धाडस करत नाहीत, जेणे करुन उर्वरित आयुष्य अश्याप्रकारे जगणं जे इतर कोणी जगु शकत नाही!' आशा करतो की आपण आपल्या उद्योजकीय प्रवासादरम्यान 'उद्योजकीय स्वातंत्र्य' अनुभवाल. शुभेच्छा!

'उद्योजकीय स्वातंत्र्य' अनुभवण्यासाठी पहीले पाउल उचला.
7666426654 या क्रमांकावर संपर्क करा किंवा 'FREEDOM' असे Whatsapp करा किंवा नाव नोंदवण्यासाठी खालील फॉर्म भरा. बॉर्न टु विनचे Growth Consultant आपल्याला संपर्क करतील. आजच मोफत one to one भेट घ्या. स्वतःमधील उद्योजकाला जागे करा!


09 September 2016

मार्केटींग करताना लघुउद्योजक कोणत्या ३ गोष्टी विसरतात? - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! आजकाल मार्केटींगचा जमाना आहे. जो दिखता है, वह बिकता है! जो व्यवसाय आपल्या प्रॉडक्टचे जबरदस्त मार्केटींग सातत्याने करत असतो, तो व्यवसाय बाजारपेठेत राज्य करतो. आपण पेप्सी किंवा कोकाकोला नाही जरी प्यायलो तर काही मरणार नाही आहोत तरीही या शितपेयांच्या कंपन्या आज अब्जावधी रुपयांमध्ये उलाढाल करत आहेत. का? कारण आक्रमक व सातत्याने केलेलं मार्केटींग! जगात कोणताही व्यवसाय यशस्वी तेव्हा बनतो जेव्हा त्या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक असतात. मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळवण्यासाठी कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक असते परिणामकारक मार्केटींग कृतीयोजना. आपलं प्रॉडक्ट कितीही उत्कृष्ट दर्जाचं जरी असलं तरी जोपर्यंत आपल्या ग्राहक वर्गाला त्याबद्दल सातत्याने व परिणामकारक पध्दतीने आपण सांगत नाही तो पर्यंत त्यांना कसं कळणार? आणि ग्राहक प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी पुढे तरी कसा सरसावेल?


मित्रांनो, बर्‍याच लघुउद्योजकांशी माझा संबंध येतो. बरेच लघुउद्योजक आपल्या व्यवसायाचे मार्केटींग जाणिवपूर्वकपणे करत नाहीत. त्यांना बहुतांश 'धंदा' हा 'Word of Mouth' व्दारेच मिळत असतो. बर्‍याच लघुउद्योजकांचा व्यवसाय एकाच कक्षेत फिरत असतो. बर्‍याच लघुउद्योजकांना मार्केटींग करणे खर्चिक वाटते. मार्केटींग वगैरेच्या ते फंदातच पडत नाहीत. काही प्रमाणात लघुउद्योजक मार्केटींग करतात सुध्दा परंतु त्यांना त्याचा हवा तसा परिणाम साधता येत नाही. कारण मार्केटींग करण्यासाठी ते 'टॅक्टीकली' (Tactically) विचार करतात. उदाहरणार्थ, त्यांचा भर जाहीराती, सेल्स कॉल, वेबसाईट, इ-मेल मार्केटींग, नेटवर्किंग, सोशल मिडीया, व्हीझीटिंग कार्ड, ब्रॉशर इत्यादी वर जास्त असतो. ही सर्व माध्यमे महत्त्वाची जरी असली तरी त्यांचा ' स्ट्रॅटेजिकली' (Strategically) विचार केला जात नाही.

मार्केटींग करताना लघुउद्योजक खालिल ३ गोष्टींचा विचार करायला नकळत विसरतात.

१) आपण बाजारपेठेमध्ये आपल्या व्यवसायाबाबत दुरगामी विश्वासार्हत कशी निर्माण करु शकतो?

जो व्यवसाय ग्राहकांचा विश्वास संपादन करतो, तो व्यवसाय दुरगामी यश मिळवतो. मार्केटींग करत असताना या बाबीचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे.




२) बाजारपेठेमध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आपली काय वेगळी ओळख असली पाहीजे?

प्रत्येक बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा आहे. आपले प्रॉडक्ट व सर्विस मध्ये काहीतरी वेगळेपण असणं अत्यावश्यक आहे आणि ते वेगळेपण आपल्या ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे 'कम्युनिकेट' झालं पाहीजे.

३) आपल्या व्यवसायाबद्दल, प्रॉडक्ट व सर्विसबद्दल ग्राहकांच्या मनात उत्सुकता निर्माण करुन आपण त्यांना संपर्क करण्यापेक्षा तेच आपल्याकडे कसे आकर्षित होतील?

हा एक प्रश्न आपल्या व्यवसायाच्या मार्केटींगची पध्दत बदलु शकतो, आणि आपल्याला हवे तेवढे ग्राहक आपण आकर्षित करु शकतो.


आपल्याला हवे तेवढे ग्राहक आकर्षित करण्यासाठी व प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी, अतुल राजोळी यांची एक दिवसिय कार्यशाळा... 'THE MAGIC OF MAGNETIC MARKETING'.

प्रशिक्षक: अतुल राजोळी
दिनांक: शनिवार, २४ सप्टेंबर २०१६
वेळ: सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६
स्थळ: चाणक्य इन्स्टीट्युट, सेमिनार सभागृह, पहिला मजला, सी. डी. बर्फीवाला मार्ग, अंधेरी (प.)
प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्क: 7666426654, 9619465689
ऑनालाईन बुकिंगसाठी पुढील लिंकवर क्लिक करा: https://goo.gl/hww8Wg



26 August 2016

एक असामान्य यशोगाथा

संसदेच्या हाऊसकीपिंगचं काम मिळालं आणि त्यानंतर ‘बीव्हीजी’चं नाव पसरतच गेलं. पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं मिळाली. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेतला धूळ बसून काळा झालेला रस्ता पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केली. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय. आज ‘बीव्हीजी’च्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी. कितीतरी. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था आहेत. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच.’’
“ माझ्या सभोवताली पैशावर
निजलेले उडय़ा मारणारे
गगनचुंबीत राहणारे
कोटय़धीश-अब्जाधीश
मीही माझ्या ध्रुवावर
सर्वापेक्षा उंचावर
जाण्यासाठी तप करणारा
जेथून कोणीच मला
पैशात तोलू शकणार नाही
भले मी निष्कांचन राहीन
पण ध्रुवावर जरूर जाईन !’’

हो. मी ध्रुवावर जायचं पक्कं केलं होतं. कसं? कधी? माहीत नव्हतं. खिशात पैसा नव्हता, मार्गही माहीत नव्हता, पण जायचं होतं, हे निश्चित! त्यावेळची ही माझी कविता.
मी पुण्यात बिबवेवाडीतल्या व्हीआयटी कॉलेजात होतो. इंजिनीअरींगचे शिक्षण घेत होतो. वसतिगृहात राहायचो. त्याआधी फुगेवाडी ते बिबवेवाडी हे रोजचं ४२ किलोमीटरचं अंतर सायकलवरून कापायचो. वेळ खूप जात होता. म्हणून वसतिगृहात राहायचं ठरवलं. पण महिन्याचं ३०० रुपयांचं भाडं देण्याची ऐपत नव्हती. प्राचार्य खाडिलकर सरांना भेटलो. त्यांनी २५ रुपयांमध्ये राहायची परवानगी दिली. माझी इलेक्ट्रिकची शेगडी होती. तिच्यावर भात शिजवायचो. खालून करपायचा, वरून कच्चा. मधला काढून खायचो. इतर पोरं टिंगल करायची. ती कॅन्टीन, स्वीट मार्टमधून खायला आणायची. पाटर्य़ा करायची. मला रोजच्या भाकरीची भ्रांत होती.
दहापैकी दोन पोरं मदत करायची. शनिवार-रविवारी पार्टीला जायची, मग त्यांच्या जागी मला मेसला जेवायची संधी मिळायची. बाकी पोरं मजा पाहायची.. तेव्हा धडा शिकलो- तुमच्याकडं पैसा असेल तर हजारो लोक जवळ येतात, नसेल तर मजा पाहतात. लहानपणी प्रेरणा मिळावं असं वातावरण आजूबाजूला नव्हतं. पण नेहमीच मोठी स्वप्नं पाहायचो. हे कुठून आलं असेल? आता आठवतं, लहानपणी वडील, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं ऐकायला न्यायचे. व्याख्यानांचे विषय असायचे- शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. याच दोन महान व्यक्ती माझ्या प्रमुख प्रेरणास्रोत बनल्या.
माझं गाव सातारा जिल्ह्य़ातलं रहिमतपूर. वडील सातारच्या न्यायालयात क्लार्क. तोकडा पगार. ते सतत आजारी असायचे. आई-वडील, मी, धाकटा भाऊ भाडय़ाच्या खोलीत राहायचो. घरात लाइट नव्हती. चौथीत स्कॉलरशिप मिळाली. वर्गातल्या हुशार-श्रीमंत मुलांना मिळाली नव्हती, मला मिळाली. आत्मविश्वास वाढला. वडिलांनी शिक्षणासाठी पुण्यात आणलं. मुक्काम पोस्ट- फुगेवाडी. रामचंद्र फुगे चाळ. १० बाय १० ची खोली. वडिलांना जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली. आजारपण सुरूच होतं. ते आजारी पडले की तीन-चार महिने बरे व्हायचे नाहीत. ससून, रुबी, बुधराणी, केईएम, िपपरीचं चव्हाण रुग्णालय फिरायचो. दरम्यान, आईला शिक्षिकेची नोकरी मिळाली. तरीपण पैशाची चणचण असायचीच. पैशाची गरज पडली की आई कानातला दागिना, मंगळसूत्र सोनाराकडं तारण ठेवून व्याजानं ५००-१००० रुपये घ्यायची.
माझं नूमवि, मॉडर्न हायस्कूलला शिक्षण झालं. मी वर्गात हुशार. गणितात तर पैकीच्या पैकी मार्क पडायचे. मॉडर्नमध्ये गणिताच्या रासकर सरांचा मी आवडता विद्यार्थी. ते कधीच पैकीच्या पैकी मार्क द्यायचे नाहीत, पण माझा एक मार्क कुठं कापायचा, हा त्यांना प्रश्न पडायचा. या गणितानंच मला उभं केलं. कारण आयुष्यात गणितच तुमच्या कामी येतं.
दहावीत चांगले मार्क मिळाले. आईच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी सुचवलं- डिप्लोमाला घाला. मग गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये गेलो. सायकलने जायचो. याच काळात वडील गेले. त्यांचं वय होतं- ४५ वष्रे नि माझं १८.
वडिलांना कपडय़ांची हौस होती. त्यांना थ्री-पीस सूट आवडायचा. त्यांनी जाण्यापूर्वी महिनाभर आधी सूट शिवायला टाकला होता. ते गेल्यावर मी तो घेऊन आलो. त्या प्रसंगानं सांगितलं- ‘माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही.’ काहीशी विरक्ती आली. त्याच वेळी ठरवलं, काहीतरी वेगळं, इतरांसाठी करायचं. ‘भारत विकास प्रतिष्ठान’ (बीव्हीजी) या नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून दानशूरांकडून देणग्या घेऊन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणं सुरू केलं. शिक्षण सुरू असतानाच क्लास घेणं, सॉस-जॅमच्या बाटल्या विकणं, घरं रंगवून देणं अशी कामं घेणं सुरू केलं.


इंजिनीअर बनायचं होतं. त्यासाठी औरंगाबादला प्रवेश मिळत होता, पण आईच्या आग्रहाखातर पुण्यातच राहिलो. व्हीआयटीला प्रवेश मिळाला, पण फीसाठी आईने मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेतून १५ हजारांचं कर्ज काढलं. माझा रोजचा ४२ किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू झाला. दरम्यानच्या काळात वडिलांच्या सेवेतील काही रक्कम मिळाली. इतर काही पैसे जुळवून गुरव-िपपळे येथे प्लॉट घेतला. त्यावर घर बांधलं. पैशाची गरज होती. कॉलेजला प्रॅक्टिकलपुरतं जायचो. बाकी कामाच्या मागे लागलो.
तेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियमचं काम सुरू होतं. एका एजन्सीकडं सिव्हिलची कामं होती. त्यांच्याकडं गेलो. माझं शिक्षण सुरू होतं इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचं आणि हे काम होतं सिव्हिलचं- काँक्रीटचा रस्ता करण्याचं. तीन लाख रुपयांचं कंत्राट होतं. मलाही घर बांधण्याचा अनुभव होता. एजन्सीला सांगताना ‘नरोवा-कुंजरोवा’ केलं. ‘डिप्लोमा केलाय, इंजिनीअरींग करतोय’ असं सांगितलं. पण कुठल्या विषयाचा हे बोललोच नाही. काम मिळालं, ते सात दिवसांत पूर्ण करायचं होतं. खर्च जाऊन दीडेक लाख रुपये सुटणार होते. मजुरांची जुळवाजुळव केली. आपल्याला पैसे मिळणार म्हणून मजुरांनाही जास्त मजुरी दिली. महिला-पुरुष अशा एका जोडीला दीडशे रुपये मिळायचे. मी अडीचशे रुपये दिले. शिवाय सकाळी चहा-वडापाव आणि रात्री त्यांना लागणारं त्यांचं आवडतं पेय. मजूर मंडळी खूश होती. शंभर जोडय़ा, पन्नास गाढवं मिळून पाच दिवसांतच काम उरकलं.
त्याचदरम्यान लातूरचा भूकंप झाला, पैसे अडकले. मध्ये पाऊस झाला. त्यात आमचा रस्ता वाहून गेला. चूक समजली. लेव्हल केली नव्हती. डोक्याला हात लावला. रस्ता पुन्हा केल्याशिवाय पैसे मिळणार नव्हते. रस्ता करण्यासाठी हाती पैसे नव्हते. मजुरांना हे समजलं. ते मदतीला धावून आले. त्यांनी पैसे न घेता काम केलं. सिमेंट, वाळूसुद्धा त्यांनीच मिळवली. रस्ता उत्तम झाला. पैसे मिळाले. सर्वाचे पैसे भागवून वर फायदाही झाला. आयुष्यात असे प्रसंग येत गेले, तेव्हा निराश न होता स्वत:च स्वत:ला प्रेरणा देत राहतो. विवेकानंदांचे ते शब्द उपयोगी पडले. आजही पडतात..

‘जेव्हा दशदिशा अंधकाराने भरून गेल्या होत्या,
तेव्हा मी म्हणत होतो- झुंजा, झुंजत पुढे चला..

आज आशेच्या प्रकाशानं दशदिशा किंचित उजळल्या असतील, तरीदेखील तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला!’

पुढं इंजिनीअरींगसाठी वसतिगृहात गेलो. एक सत्य समजलं, ‘जग नेहमीच प्रचंड अपमान करतं. ते मनाला लावून घ्यायचं नाही. तुम्ही हिरे असाल, तरी ते तुम्हालाच सिद्ध करावं लागतं..’ १९९४ साली बी.टेक.ची पदवी मिळाली. ‘टेल्को’मध्ये (आताची ‘टाटा मोटर्स’) ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली. पगार- महिना सात हजार रुपये. टेल्को म्हणजे प्रतिष्ठेची नोकरी. तिथं नोकरी करत असतानाही घरं रंगवून देण्याची वगरे कामं सुरूच होती. कंपनीत भंगारमध्ये तांब्याच्या वापरलेल्या तारा होत्या. त्यांचा कंपनीसाठी उपयोग केला आणि कंपनीचे अडीच कोटी रुपये वाचवले. त्यामुळे माझ्यावरचा विश्वासही वाढला.
दरम्यान, माझ्या गावाकडून कामाच्या आशेनं मुलं माझ्याकडे येत होती. मी कर्मचारी असल्याने कंपनीतल्या कामाची कंत्राटं घेऊ शकत नव्हतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच उपाय सुचवला- एखाद्या संस्थेतर्फे कामं घ्या. मग ‘भारत विकास प्रतिष्ठान’द्वारे हाऊसकिपींगचं काम घेतलं. ही गोष्ट १९९७ मधली. इंडिया गाडीचा प्रकल्प उभा राहत होता. तो स्वच्छ ठेवण्याचं काम घेतलं. आठ लोक होते. त्यानंतर मात्र मागं वळून पाहिलंच नाही. वाट्टेल ते काम द्या, नाही म्हणायचं नाही. हे आमचं तत्त्व. तेच कामी आलं.
गावचा मित्र उमेश माने हा माझ्यावर विश्वास टाकणारा पहिला माणूस. त्यांनी प्रतिष्ठानच्या कामासाठी नोकरी सोडली. कंत्राटं मिळवणं, पैशाची जुळणी करणं हे माझं काम आणि काम करून घेणं ही उमेश माने यांची जबाबदारी. पहिल्या वर्षीची उलाढाल होती आठ लाख रुपये. पुढच्या वर्षी ती झाली ५६ लाख रुपये. गुणवत्ता, प्रामाणिकपणा, विश्वास आणि वेळेच्या आधी पूर्ण होणारं काम यामुळे आम्हाला काम देणारे लोकच आमची प्रसिद्धी करत होते. आपोआप कामं मिळत होती. १९९९ मध्ये लग्न झालं. पत्नी वैशालीने घरची जबाबदारी उचलली. मग नोकरी सोडून हे काम पूर्णवेळ करायला लागलो. पुढे जनरल इलेक्ट्रिकल्सच्या (जीई) प्लँटचं स्वच्छतेचं काम मिळालं. बंगळुरूला जावं लागणार होतं. विलंब न करता मी, उमेश आणि आठ कामगार तिथं धडकलो. आमचे प्रेरणास्रोत शिवाजी महाराज. त्यांनी दक्षिणेवर स्वारी केली होती. आम्हीसुद्धा त्यांच्याच मातीतले ना! कंपनीचं दोन दिवसांनी ओपनिंग होणार होतं. त्याआधी प्लँट चकाचक केला. कामाची गुणवत्ता पाहून लोक समाधानी होते. मग चेन्नई, हैदराबाद अशी इतर शहरांमधली कामं मिळाली. कामाला नाही म्हणत नव्हतोच. रेल्वे स्थानकं, विमानतळ, रुग्णालये यांच्या स्वच्छतेचं काम घेतलं.. विस्तार वाढत असताना कर्मचाऱ्यांबाबत एक सूत्र कायम ठेवलं. कामावर देखरेख करणारा सुपरवायझर गावातला, विश्वासाचा माणूस, ३० टक्के कर्मचारी पुण्याहून-गावाहून पाठवलेले आणि ७० टक्के स्थानिक कर्मचारी. त्यामुळे कुठंही कामात अडथळा आला नाही.. अजून सारं सुरळीत सुरू आहे.

आणि म्हणूनच असेल कदाचित, मी पाहिलेली स्वप्नं पूर्ण झालीच. कधी तीन दिवसांतच, तर कधी १०-१५ वर्षांनी. १९९७ मध्ये पहिलं कंत्राट मिळालं तेव्हाच स्वप्न पाहिलं- आपल्याला संसदेच्या हाऊसकिपींगचं काम मिळालं तर.? तेव्हा माहीतही नव्हतं, तिथं काय पद्धत असते. पण २००३ साली हे स्वप्न पूर्ण झालं. ‘बीव्हीजी’चं नाव वाढत होतं. ते आता दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं. संसदेच्या ग्रंथालयाचं कंत्राट मिळालं. देखभालीचं काम. तिथं श्रीनिवासन नावाचा शिस्तबद्ध आणि प्रामाणिक मुख्य अभियंता होता. त्याला भेटून विश्वास दिल्यावर काम मिळालं, पण ते सहा महिन्यांपुरतंच. चांगलं केलं तर पुढं सुरू ठेवणार, नाहीतर हाकलून देणार. त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यासाठी ४० लाख रुपयांची दर्जेदार यंत्रणा विकत घ्यायला लागणार होती. काम सुरू राहिलं नाही तर ही यंत्रणा पांढरा हत्ती ठरणार होती. पण स्वत:वर विश्वास होताच. काम सुरू केलं. ते सुरूच राहिलं. श्रीनिवासन खूश झाले. त्यांनी पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं दिली. पण सुरक्षेच्या कारणास्तव आत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ‘बीव्हीजी’चे कर्मचारी बाहेरचीच स्वच्छता पाहत होते. बाहेरचा परिसर इतका स्वच्छ पाहून खासदारांनीच याबाबत विचारणा केली. मग थेट लोकसभेच्या सभापतींनी परवानगी दिली, तेव्हा ‘बीव्हीजी’चा लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश झाला. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेत चालण्यासाठी लाल दगडांचा मार्ग होता. तो धूळ बसून काळा झाला होता. तो पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केल्यासारखं अनेकांचा विश्वास बसत गेला. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.. दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या वास्तूला ‘बीव्हीजी’ची सेवा मिळू लागली. आज एकटय़ा दिल्लीत ‘बीव्हीजी’चे नऊ हजार लोक काम करतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी.. कितीतरी ग्राहक आहेत. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था, आस्थापना ग्राहक आहेत. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच. आता विविध क्षेत्रांमध्ये उतरलोय.
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस रुग्णवाहिकेचे (डायल १०८) कंत्राट ‘बीव्हीजी’कडं आहे. त्यासाठी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका राज्यभर धावत आहेत. याशिवाय लँडस्केप-गार्डनिंग, टेक्निकल सर्व्हिसेस, सुरक्षा सेवा, औद्योगिक सेवा, सोलार पार्क, एलईडी लायटिंग, सोलार पंप, प्लास्टिकपासून इंधन, फूड पार्क अशा अनेक क्षेत्रांत जम बसवतो आहे. ‘नॅशनल इन्नोव्हेशन फाउंडेशन’शी भागीदारी केली आहे. त्याद्वारे विविध व्याधींवरील चहा, आरोग्यदायी उत्पादने, शेळीचे दूध, उंटणीचे दूध, जैविक खते, जैविक कीटकनाशके अशा अनेक उत्पादनांमध्ये प्रवेश केला आहे.

मी इतके सारे उद्योग कसे करू शकतो? कारण माझ्या वाटचालीत विविध टप्प्यांवर भेटलेले असंख्य लोक आज माझ्यासोबत ‘बीव्हीजी’मध्ये आहेत. मी कार्यक्षम माणसं शोधतो आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतो. बस्स.. हा संच वाढतो आहे, उत्तरोत्तर अधिकच वाढत जाईल. ‘बीव्हीजी’चं ब्रीदवाक्यच आहे- ‘ह्य़ुमॅनिटी अहेड!’

२०२० पर्यंतचे उद्दिष्ट आहे दोन लाख कर्मचारी आणि कंपनीची १० हजार कोटींची उलाढाल! हे सर्व करताना माझ्या कर्मचाऱ्यांचा, सामान्य माणसांचा विचार असतो. कर्मचाऱ्याला इतर कंपन्यांपेक्षा दोन पैसे जास्तच मिळतात. त्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून इतर क्षेत्रांत प्रवेश करतोय. शासनाच्या विविध योजनांतून माझ्या ६०० कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात घरे देऊ शकलो. जे.आर.डी.टाटा हे उद्योगातील आदर्श आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकलो- सामाजिक बांधीलकी, कामाची पद्धत, एकजीनसीपणा. त्यामुळेच ‘बीव्हीजी’च्या मुख्यालयाला (चिंचवड, पुणे) नाव दिलंय- ‘बीव्हीजी हाऊस’! टाटांच्या ‘बॉम्बे हाऊस’चा हा प्रभाव!
लोकांचा विचार करत गेलो की आपोआप पैसा मिळतो. मी हेच करत आलो. त्यामुळे मीसुद्धा मोठा झालो. कधी गैर काम करत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, कोणाला फॉलो करत नाही, कोणाशी स्पर्धा करत नाही, संधी मिळाली तरी अनैसर्गीक नफ्याच्या मागे लागत नाही. त्यामुळे कधीही डोळे मिटले तरी शांत झोप लागते.
सर्व थरांत लहानमोठय़ा लोकांमध्ये वावरतो. राजकीय व्यक्ती, आध्यात्मिक गुरू, प्रशासकीय अधिकारी सर्वाशी मैत्री आहे. त्यामुळे अनेकांचे गरसमज होतात, पण कोण काय म्हणतं याकडं लक्ष न देता पुढं जात राहतो. त्याच वेळी कामगाराशी खांद्यावर हात टाकून बोलतो. त्यात काही वेगळं- विशेष वाटत नाही. आता इतकी पत कमावली आहे की, शेकडो कोटींचं कर्ज द्यायला बँका तयार आहेत. पण पूर्वी आईसाठी फ्रीज, वाॅशिंग मशीन घ्यायला कोणी कर्ज देत नव्हतं, ही परिस्थितीही विसरलेलो नाही. म्हणून जमिनीवरूनच चालतो.
खरंतर आता थांबलो तरी वैयक्तिक काही बिघडणार नाही. पण लोकांना जोडणं हे माझं व्यसन आहे. शिवाय आजच्या जगातही सरळ मार्गाने मोठं होता येतं, इतरांनाही मोठं करता येतं, हे दाखवून द्यायचंय. त्यासाठी मला कार्यरत राहावंच लागेल. कारण माझा आजही तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला !

सौजन्य: लोकसत्ता वृत्तपत्र 

हणमंतराव गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळवा लक्ष्यासिद्धी सोहळ्यामध्ये

!! लक्ष्यसिद्धी सोहळा !!
विषय: एक असामान्य यशोगाथा
दिनांक: 31 ऑगस्ट 2016
वेळ: सायंकाळी 6 वाजता
स्थळ: मैसूर असोसिएशन सभागृह, भाऊ दाजी रोड, माटुंगा (पु.)
प्रवेश विनामुल्य... अनुभव अमुल्य!
नाव नोंदणीसाठी संपर्क: 7666426654, 9619465689
नाव नोंदवण्यासाठी खालिल Form भरा





Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites