February 2011 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

19 February 2011

'ध्येयपुर्तीचा ध्यास' - सहावा लक्ष्यसिध्दी सोहळा

नमस्कार!

मित्रांनो लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाची सहावी बॅच आता आपल्या शेवटच्या आठवड्यामध्ये पदार्पण करत आहे. गेल्या दिड वर्षांमध्ये ५०० पेक्षा जास्त महाराष्ट्रीय प्रोफेशनल व्यक्तिंनी लक्ष्यवेध प्रशिक्षण क्रमाच्या सहाय्याने आपल्या प्रोफेशनमध्ये यशाची उच्च शिखरे गाठली आहेत व ही विजयी घौडदौड अशीच पुढे चालु ठेवली आहे.


लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद व लक्ष्यवेधच्या मदतीने प्रशिक्षणार्थ्यांनी केलेली व्यावसायिक प्रगती पाहून बॉर्न टू विनच्या संपुर्ण टिमला प्रचंड आनंद होतोय व या पुढील उपक्रम देखिल अतिशय परिणामकारक करण्याची जिद्द बॉर्न टू विन मध्ये निर्माण झाली आहे. भविष्यात बॉर्न टू विन व्दारे जबरदस्त प्रभावशाली व प्रेरणादायी कार्यक्रमांची मेजवानी आपणास हमखास लाभेल यात शंका नाही!


आपणा सर्वांना माहीतच असेल कि लक्ष्यवेधचा पदवीदान समारंभ म्हणजेच 'लक्ष्यसिध्दी सोहळा' हा कार्यक्रम देखिल नेहमीच अतिशय दिमाखदार पध्दतीने पार पाडतो. लक्ष्यसिध्दी सोहळयामध्ये लक्ष्यवेधच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात येते व प्रत्येक लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे प्रमु़ख आकर्षण म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे. प्रत्येक लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये व्यवसाय क्षेत्रातील दिग्गज व्यक्ति कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे असतात व त्यांचे अनमोल असे मार्गदर्शन आपणास लाभते.

आता पर्यंतचा प्रत्येक लक्ष्यससिध्दी सोहळा प्रेक्षकांच्या दणदणीत प्रतिसादात पार पडतो.

मित्रांनो लक्ष्यवेधचा सहावा लक्ष्यसिध्दी सोहळा दिनांक २८ फेब्रुवारी २०११ रोजी, माटुंगा वेस्ट, मुंबई येथिल कर्नाटक स्घं हॉल मध्ये संध्याकाळी ६:३० ते ९:३० दरम्यान पार पडणार आहे. बॉर्न टू विन टिमला आपल्याला कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे कि या लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे प्रमुख पाहूणे व मार्गदर्शक असणार आहेत तळवळकर्स बेटर व्हॅल्यु फिटनेस लिमीटेड चे कार्यकारी अध्यक्ष श्री. मधुकर तळवळकर! हो मित्रांनो, तळवळकर सर म्हणजे एक असाधारण असे व्यक्ति त्यांनी तळवळकर्स या भारतातील फिटनेस क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेची मुहूर्तमेढ केली व ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासुन ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. आज भारतामध्ये तळवळकर्सच्या ७५ पेक्षा जास्त शाखा आहेत. तळवळकर्स ही एक प्रोफेशनली मॅनेज्ड संस्था आहे. गेल्याच वर्षी तळवळकर्सचा IPO देखिल बाजारात आला. अतिशय लहान अवस्थेत चालु झालेला हा व्यवसाय आज उत्तुंग यश संपादन करित आहे व भविष्यात देशविदेशामध्ये तळवळकर्स च्या महत्त्वकांक्षी योजना आहेत.

२८ फेब्रुवारी रोजी लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये श्री. मधुकर तळवळकर आपली यशोगाथा आपल्या समोर सादर करणार आहोत, 'ध्येयपुर्तीचा ध्यास' या विषयावरील लाइव्ह मुलाखतीच्या माध्यमातुन. त्यांची मुलाखत घेतील बॉर्न टू विनचे संचालक, अतुल राजोळी.

या मुलाखती मध्ये तळवळकर सर तळवळकरची सुरुवात कशी झाली? त्या दरम्यान त्यांना कोणत्या अडचणी आल्या? त्या अडचणींवर मात त्यांनी कश्या प्रकारे केली? पुढे तळवळकर्सच्या नविन शाखा कश्या उघडल्या गेल्या? तळवळकर्सचे व्यावसायिकरण कसे झाले? एक छोटेखानी व्यायामशाळा ते अत्याधुनिक साधन सामुग्रींनी सज्ज, तळवळकर्स बेटर व्हॅल्यु फिटनेस लिमिटेड ही ७५ पेक्षा जास्त शाखा असलेली, व्यावसायिक संघटना त्यांनी कशी उभारली? हा प्रवास त्यांच्या प्रत्यक्ष त्यांच्याच व्दारे अनुभवण्याची एक सुवर्ण संधी आपणास लाभणार आहे...

लक्ष्यसिध्दी सोहळा:

विषयः 'ध्येयपुर्तीचा ध्यास'

दिनांकः २८ फेब्रुवारी २०११
वेळः संध्याकाळी ६:३० वाजता
स्थळः कर्नाटक संघ हॉल, माटुंगा (प)
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९

तर मित्रांनो आपल्या कॅलेंडरमध्ये आत्ताच नोंद करुन टाका... व कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहा!

धन्यवाद!

-टिम बॉर्न टू विन

16 February 2011

प्रगतीचा एक्स्प्रेस वे - लोकसत्ता

नमस्कार मित्रांनो!

दिनांक १२ फेब्रुवरी २०११ च्या संध्याकाळी सुप्रसिध्द कॉर्पोरेट लॉयर श्री. नितीन पोतदार लिखीत 'प्रगतीचा एक्सप्रेस वे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होटेल ताज मध्ये अगदी दिमाखदार पध्दतीने पार पडला. या कार्यक्रमाला मी स्वतः देखिल उपस्थित होतो. मराठी उद्योग व साहीत्य जगतात पहील्यांदाच एखादे मराठी पुस्तक, हॉटेल ताज मध्ये भव्यदिव्य कार्यक्रमामध्ये प्रकाशित झाले. या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याबद्द्ल मी स्वतःला भाग्यशाली समजतो व मला आमंत्रित केल्याबद्दल नितीन पोतदार सरांचे मनापासुन आभार मानतो. उद्योग जगतातील दिग्गज व्यक्तिंच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाबाबत लोकसत्तामध्ये जो लेख आला तो ईथे आपणास वाचण्यासाठी उपलब्ध करुन देत आहे.

धन्यवाद!

आपला विश्वासु
अतुल राजोळी



मराठी उद्योजकांनी विशेषत तरुणांनी पारंपरिक मानसिकतेतून बाहेर पडून आपली आर्थिक प्रगती केली पाहिजे. जुन्या मानसिकतेचा पगडा अजूनही अनेक मराठी लोकांवर आहे. ही कोती मनोवृत्ती बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण त्याला हवा तेवढा वेग नाही. अशावेळी कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी लिहिलेले प्रगतीचा एक्स्प्रेस वे हे पुस्तक म्हणजे तरुण मराठी उद्योजकांना अगदी योग्य वेळी रिचार्ज करणारे पुस्तक आहे, असे प्रतिपादन नियोजन मंडळाचे सदस्य व अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. जीवनरंग प्रकाशनने तयार केलेल्या प्रगतीचा एक्स्प्रेस वे या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जाधव, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे सीएफओ वाय.एम. देवस्थळी यांच्या हस्ते ताजमहाल हॉटेलमध्ये काल झाले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. जाधव म्हणाले की गरिबीचे उदात्तीकरण मराठीत सर्वाधिक आहे. आपल्या काही म्हणीही गरिबीचेच समर्थन करतात. गरिबांनी गरीब राहावे म्हणून श्रीमंतांनी पसरवलेली ही अफवा आहे. खरे तर दारिद्ऱ्यापेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे मनोदारिद्रय़. ते अगोदर दूर व्हायला हवे. म्हणून बदलत्या मराठी मानसिकतेची चर्चा करणे अतिशय महत्त्वाची बाब आहे. मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की उद्योगात दूरदृष्टी आणि वेगळे काही करण्याची प्रेरणा आवश्यक असते. उद्योजकात ऊर्जा आणि नवनिर्मितीची ऊर्मी असावे लागते. त्यात त्याच्या प्रज्ञा आणि प्रतिभेचा कस लागत असतो. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळात महाव्यवस्थापक म्हणून काम करताना मला उद्योगक्षेत्रात जे अनुभव आले होते, त्याचा पुनप्रत्यय मला नितीन पोतदारांचे हे पुस्तक वाचताना आला. मराठी मनातील उद्योगाविषयीचा न्यूनगंड दूर होण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे. या पुस्तकामुळे उद्योगाचा एक्प्रेस वे अधिक एक्स्प्रेस होईल. उद्योगाच्या अखंडीकरणासाठी आणि सातत्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची चर्चा श्री. वाय. एम. देवस्थळी यांनी केली. ते म्हणाले की लांब पल्ल्यापर्यंत पोहोचणारी दृष्टी उद्योजकाकडे हवी. सर्वोत्तमाचा ध्यास धरून त्याच्या पूर्ततेचा प्रयत्न करणे आणि सर्वसमावेशक व पारदर्शकता याच्या जोडीला आपल्या सहकाऱ्याचे कौतुक करण्याचे आणि आत्मपरिक्षण करण्याचे कसबही त्याच्यात असायला हवे.



या गोष्टी जर उद्योगात असतील तर कुटुंबाने चालविलेला उद्योग आणि व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून केलेला उद्योग यात फरक करता येणार नाही. या दोन उद्योगात फरक करणे मला मान्य नाही. मराठी माणूस उद्योगात कसा स्थीरावला आहे, याचे विवेचन कुमार केतकर यांनी सहकारक्षेत्राचा हवाला देऊन केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात उद्योजकता नाही, असे नाही. तो एक न्यूनगंड आहे. आपल्याकडे अशिक्षित आणि अल्पशिक्षितांनीही शतकापूर्वी यशस्वी उद्योग केले आहेत आणि करीतही आहेत. पण आता नोकरीमुळे त्यांच्या अंगभूत गुणांवर बुरशी चढली आहे. ती बुरशी काढून टाकून त्याच्याखाली दडलेले सत्य जाणले पाहिजे.

पुस्तकाच्या प्रयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट करताना नितीन पोतदार म्हणाले की गेल्या २३ वर्षांत मी जागतिक स्तरावरचे अनेक उद्योगक्षेत्रातील घडामोडी जवळून पाहिल्या आहेत. त्यात जातीचा, भाषेचा प्रश्न कुठेच डोकावत नाही. एकतर उद्योजक असतो किंवा उद्योजक नसतो. मराठी माणूस यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही, असे सर्वेक्षण कोणी आणि केव्हा केले? चाकरमानीचा लेबल आपण स्वत:वर का लादून घेतो? येणारे शतक हे ज्ञानाधिष्ठीत असणार आहे. तेव्हा दोन दशकांसाठी तरी आपण आपले चुकीचे समज बाजूला ठेवूया आणि आताच्या महत्त्वाकांक्षी युवकांवर चाकरमानीचा शिक्का मारू नका. त्यांना फुलू द्या. कारण मराठी माणसाचा विश्वासाहार्यता हा ब्रण्ड आहे. हा ब्रॅण्ड पुढे नेण्याची गरज आहे. मला माझ्या क्षेत्रात आलेले अनुभव मी समाजापुढे ठेवले आहेत. आपणाला आलेले अनुभवही आपण तरुणांसमोर ठेवून मराठी उद्योजकांची एक पिढी निर्माण करायला हातभार लावू या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जीवनरंग प्रकाशनचे संजय गोविलकर यांनी त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की मराठी पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम जाणून ताजमहाल हॉटेलमध्ये घेण्यात आला. २६/११ च्या काळरात्रीनंतर आपण याच ठिकाणी पुन्हा भारतीय म्हणून एक झालो. त्याचा संदर्भ आणि उद्योगक्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या टाटांच्या वास्तूत हा कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. यावेळी द.म.सुकथनकर, एस.बी.आय.इन्सुरन्सचे अध्यक्ष अशोक प्रधान, टाटा रिटेल इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष दीपक देशपांडे, नंदकिशोर देसाई, कॅमलिनचे सुभाष दांडेकर, श्रीराम दांडेकर, सचिन जकातदार, सुनील रोहोकले, अनेय खरे, उपेंद्र कुलकर्णी, निखील नाईक, नितीन वेद्य, उदय निरगुडकर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व उद्योगपतीं यावेळी उपस्थिती होते. प्रगतीचा एक्स्प्रेस वे हे पुस्तक http://www.bookganga.com/ या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

सौजन्यः लोकसत्ता - 

05 February 2011

प्रश्न विचारा!

प्रश्न विचारा!
बॉर्न २ विन संस्थेच्या लक्ष्यवेध सोहळ्यात २ डिसेंबर १० ला लार्सन अन्ड टूर्बोचे सीएफओ व डायरेक्टर वाय. एम. देवस्थळी हे प्रमुख पाहुणे होते. बॉर्न २ विनचे प्रमुख अतुल राजोळी यांनी देवस्थळींची मुलाखत घेतली. अनेक बिझनेस चॅनेलवर देवस्थळी आपल्याला अनेकवेळा दिसतात व ते एल अन्ड टी, इन्फ्रास्ट्रक्चर, अर्थव्यवस्था अशा विषयांवर बोलत असतात. पण लक्ष्यवेध सोहळ्यास आलेला श्रोतृवर्ग तरुण व करिअरमध्ये पुढे जायच्या ध्येयाने पछाडलेला. त्यामुळे राजोळींनी मुलाखतीचा रोख ठेवला होता करिअर ग्रोथ. व देवस्थळींचे मोठेपण हे की त्यांनी सर्व प्रश्नांना सर्वांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत व मोकळेपणाने उत्तरे दिली. ही मुलाखत चांगलीच रंगली व प्रत्येकजण काही शिकून गेला, जाताना बरोबर काही मौल्यवान विचार घेऊनच गेला.

सिडनेहॅम कॉलेजमधून बी. कॉम. केल्यानंतर देवस्थळींनी सी. ए. व एल. एल. बी. दोन्ही एकदमच केले ते सहज व तशी प्रथाच असल्यासारखे होते म्हणून. एल. अन्ड टी. ही पायाभूत सुविधा क्षेत्रातील आज एक अजस्त्र कंपनी आहे. सध्या तिची वार्षिक उलाढाल ३७००० कोटींची आहे व नक्त नफा ४३७५ कोटींचा आहे. एक स्वच्छ, निष्कलंक व अत्यंत कार्यक्षम कंपनी अशी एल अन्ड टीची ख्याती आहे. डेन्मार्कमधील दोन तरूण इंजिनिअर व्यवसायासाठी भारतात आले व १९३८ मध्ये त्यांनी ही कंपनी स्थापन केली. १९५० मध्ये हीचे रुपांतर पब्लीक लिमिटेड कंपनीत झाले व त्यावेळेस तिची वार्षिक उलाढाल होती एक कोटी रुपये फक्त! म्हणजेच ६० वर्षात १ कोटीवरून ३७००० कोटी अशी कंपनीने झेप घेतलेली आहे. आता ही पूर्णपणे भारतीय कंपनी आहे. भारताच्या प्रगतीत तिचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. या कंपनीत ७४ साली अकाऊंटस सुपरवाझर म्हणून रुजू होताना पुढे ही कंपनी इतकी मोठी होईल असे वाटले होते का, या प्रश्नाच्या उत्तरात देवस्थळी म्हणाले, ह्या कंपनीत मूल्यांना महत्व आहे, वाटेल त्या प्रकारे व्यवसाय ती करणार नाही इतके माहिती होते. माणसे छान निवडतात याची कल्पना होती. इथे प्रगतीच्या संधी आहेत दिसत होते. कंपनीत अधिकारीपदावर रुजू झाल्यावर आजही ती व्यक्ती डायरेक्टर होऊ शकते. ही एक प्रोफेशनली मॅनेज्ड कंपनी आहे.


देवस्थळींना मुंबईत फॅक्टरीतील, मॅन्यूफॅक्चरींगमधील कामाचा अनुभव होता. काही वर्षांनी ते कोलकाता, दिल्ली इथे गेले व कामाचे स्वरूपही बदलले. मार्केटींग, सेल्स अशा विभागात त्यांनी काम केले. ही वर्षे खडतर होती का विचारल्यावर ते म्हणाले, खडतर नव्हे तर माझ्यासाठी ही मजेची वर्षे होती. तरुण वय होते, नवे शिकायचे होते, स्वत:चा सर्वांगीण विकास साधायचा होता. बाहेर काम केल्याने बिझनेसकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला. तिथल्या कार्यसंस्कृतीशी परिचय झाला. दिल्लीत उदा: खूशमस्करेपणा चालतो! तरुणांना त्यांचे सांगणे होते, आज स्पेशलायझेनला खूप महत्व दिले जाते. नव्याने रुजू होणारे म्हणतात, मला ट्रेझरीमध्ये काम करायचे आहे. पण फक्त ट्रेझरी, फक्त एक खाते असा दृष्टीकोन नको. एकाच खात्याचा अनुभव असेल तर त्या खात्याच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारता येईल, पण कंपनीच्या सर्वोच्च पदापर्यंत जाता येणे कठीण. स्वत:च्या कम्फर्ट झोनमध्ये राहू नका. नवे शिकत राहा, मी आजही शिकत असतो असे ते म्हणाले. बदल्यांच्या वेळचा काळ कुटुंबासाठी मात्र खडतर होता हे ते मान्य करतात.

९० नंतर खाजगीकरणाचा काळ सुरू झाला. पायाभूत सुविधा क्षेत्रात कंपनीला मोठी कामे मिळायला लागली, त्याचा व्यावसायिक जीवनावर काय परीणाम झाला याबाबत ते म्हणतात, ९० पासून आर्थिक उदारीकरण सुरू झाले, पण कंपन्यांना बांधा, वापरा, हस्तांतरीत करा प्रकल्प मिळणे ९८ सालापासून सुरू झाले. तसेच कंपनीला परदेशातील मोठे प्रकल्प मिळत होते. वित्त विभागाच्या कामात फार मोठा फरक झाला. अनेकविध मार्गाने भांडवल उभारणे आवश्यक झाले. परदेशातून एडीआर, जीडीआर मार्फत भांडवल उभारले. ह्या सगळ्याचा अभ्यास करावा लागला. बिझनेसच्या लोकांना विचारून माहिती करून घेतली. देवस्थळी म्हणतात, प्रश्न विचारा, जिज्ञासूवृत्ती हवी. अर्जूनाने प्रश्न विचारला म्हणून तर श्रीकृष्णाने गीता सांगितली. प्रश्न विचारण्याबाबत कोणताही संकोच नको असे ते आग्रहाने सांगतात. प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्याऐवजी जर कोणी काय मुर्खासारखा प्रश्न विचारतोयस म्हणत असेल तर त्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. अशा लोकांच्या धास्तीने प्रश्न विचारणे बंद करू नका असे ते म्हणतात.

देवस्थळी आजही सकाळी ८ ते रात्री ८ काम करतात. ही पॅशन, ड्राईव्ह, उर्जा कुठून येते यावर ते म्हणतात, ह्या कंपनीने मला खूप दिले, पुढच्या पाच-दहा वर्षांचा विचार कंपनीत सुरू असतो. यश मिळवल्यानंतर ते टिकवून ठेवणे कठीण असते. ते टिकवायचे ह्या जबाबदारीने पॅशन येते. एल अन्ड टीचे हे वैशिष्ट आहे की इथे सामान्य माणसे असामान्य कर्तृत्व दाखवतात. सकारात्मक दृष्टीकोन, उद्दीष्ट माहीत हवे व मी ते साध्य करू शकतो हा दृढ विश्वास हवा, यशस्वी व्यक्तीच्या अशा ते तीन क्वालीटी सांगतात. अधिकार्‍याना त्यांचा सल्ला आहे, कर्मचार्‍याचे काही चांगले दिसले तर दहा वाक्ये बोला पण वाईट दिसले तर एकच वाक्य बोला. मनापासून कौतूक करा, तेही दहा लोकांसमोर, पण दोष त्या एकट्यालाच सांगा. अपयशाला तोंड देण्याबाबत ते म्हणतात, २००८ च्या जगभरच्या पडझडीमुळे एल अन्ड टीच्या ट्रेझरीला तोटा सहन करावा लागला. भावनिक असल्याने देवस्थळीना त्याचा त्रास झाला. पण कंपनी फार छान असल्याने त्रास सहन करू शकले. त्यातून ते शिकले बिझनेसमध्ये चढ-उतार होणारच. पुन्हा ती चुक होऊ नये याची काळजी घेणे.

रोल मॉडेल अर्थात आपली आदर्श व्यक्ती ह्या कल्पनेला आपण खूप महत्व देतो. देवस्थळी म्हणतात, एकच व्यक्ती रोल मॉडेल असू नये कारण ती व्यक्ती काही बाबतीत चांगली असेल तर काही बाबतीत नसेलही. तिला आंधळेपणाने फॉलो करू नका व अनेक व्यक्तींकडून जे जे चांगले गुण आहेत ते घ्या.

एल अन्ड टी वित्तक्षेत्रात धडाक्याने विस्तार करत आहे. म्युचुअल फंड ताब्यात घेऊन त्या व्यवसायात प्रवेश केला आहे. बॅंक सुरू करणार आहे अशी कुणकुण आहे. अशा अनेक नव्या व्यवसायाची सुरवात करून ते यशस्वी करण्याची फार मोठी जबाबदारी देवस्थळींवर आहे. ते आता केवळ एक प्रोफेशनल नाहीत तर बिझनेसमन म्हणून त्यांचे ट्रान्झिशन झालेले आहे. ह्या स्थित्यंतराबाबत ते म्हणतात, उद्योजक धोका पत्करतो, जोखीम घेण्याची ताकद हवी. त्याला धंद्याचा सर्वांगीण विचार करावा लागतो, फक्त आपल्या खात्यापुरते पाहून चालणार नाही. उद्योगासंबधी त्यांनी जे सांगितले ते सर्व उद्योजकांसाठी महत्वाचे आहे. ते म्हणतात, ऑर्गनायझेशन बिल्डींग म्हणजे संस्था ऊभारणे आवश्यक. त्यासाठी कर्मचारी, अधिकारी जमवावे लागतात. त्यांना टिकवून ठेवावे लागते. निर्णय घेताना केवळ तात्कालीक फायद्याचा विचार करून चालत नाही तर दीर्घ पल्याचा विचार करावा लागतो. यश मिळाले तरी ते टिकवून ठेवणे, त्यात सातत्य राखणे महत्वाचे असते. करिअर बाबत त्यांचा सल्ला आहे, दिशा ठरवा, शॉर्टकटने फायदा होत नाही. पटापट नोकर्‍या बदलवून ज्ञान मिळत नाही. कंपनीत मुल्यांना महत्व असावे, पण तुम्ही रुजू झालेल्या कंपनीत हे तत्व नसेल तर स्वत:साठी तुम्ही मूल्ये निर्माण करा. भारत देश महान करायचा असेल तर उद्योजक प्रामाणिक हवेत.

बिझनेस वाढवण्यासाठी काय करावे ह्याबाबत त्यांचे मार्गदर्शन आहे, कुठे जायचे ते माहीत हवे, इतरांनी केलेले डोळसपणे बघा. इनोव्हेशन, चेंज व इनट्रॉस्पेक्शन म्हणजे नवे मार्ग शोधणे, बदल करत राहाणे व आत्मपरिक्षण हवे.

मराठी संस्कार – अपब्रिगिंगबाबत ते म्हणतात, आपण मुलांना फार सुरक्षित वातावरणात वाढवतो, नको शब्दाचा जास्त वापर करतो, त्यांना धडाडी शिकवायला पाहिजे. केवळ घरातूनच नव्हे तर शाळा, कॉलेजातूनही नवे करण्यासाठी प्रोत्साहन हवे. संतुष्ट, समाधानी असणे वेगळे आणि काही अचीव्ह न करताचा संतुष्ट असणे वेगळे. निवृत्तीला पाच – दहा वर्षे बाकी असतानाही, आता मी जास्त काम करून काय करू, लवकरच निवृत्त होणार असा विचार करणे चुक आहे. आपल्या मेंदूचा पाच टक्के वापरही आपण करत नाही.

मुलाखतीचा समारोप करताना, पुढे काय ह्या प्रश्नावर ते म्हणाले, सध्या मायक्रोफायनान्स क्षेत्र वादाच्या भोवर्‍यात सापडलेले आहे. पण ह्या आव्हानाचे संधीत रुपांतर करुन दाखवायचे आहे. फायनान्शियल इनक्लूझनसाठी भरीव कामगिरी करायची आहे. मला सिनेमाची आवड आहे, निवृत्त झाल्यावर एक चांगला सिनेमा काढायचा आहे, हे त्यांचे उद्गार त्यांच्या एका वेगळ्या पैलूकडे निर्देश करणारे होते.

बॉर्न २ विनने मुलाखतीआधी देवस्थळींच्या वेळोवेळी विविध चॅनेलवर झालेल्या मुलाखती संकलीत करुन त्याचा व्हिडीओ दाखवला. ह्या संस्थेच्या कार्यक्रमातील तांत्रिक बाबी वाखाणण्याजोग्या होत्या.

अर्थ व उद्योगक्षेत्रातील अशा कर्तृत्ववान व्यक्ती समाजासमोर वारंवार यायला हव्यात.

उदय कुलकर्णी ९८६९६७२६९६
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites