तर २०३० साली जग असे असेल ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

12 January 2012

तर २०३० साली जग असे असेल


माजी राष्ट्रपती डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांनी हार्वर्ड विद्यापीठात अलीकडेच 'हरीश सी. महिंद व्याख्यान' दिले. त्याचा हा गोषवारा. २०३० साली आपले जग कसे असेल याचे चित्र त्यात डॉ. कलाम यांनी उभे केले आहे ......................
आज जगासमोर गरिबी, निरक्षरता, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव, स्वच्छ आणि पर्यावरण संवर्धन साधणारी वीजनिर्मिती, साधनसामग्रीचे न्याय्य वाटप, उच्च जीवनमूल्यांचे संस्कार करणारे दर्जेदार शिक्षण पुरविणे, रोगांचे निवारण, उत्तम दर्जाची आरोग्यसेवा आणि चांगले राहणीमान जनतेसाठी उपलब्ध करणे ही आव्हाने आहेत. या समस्यांच्या कारणांमागे आणि त्यावरील उपायांमागे अनेक आंतरराष्ट्रीय घटक आहेत. म्हणूनच उपाययोजना (सोल्युशन्स) शोधून काढणे ही जगभरातील सर्वच देशांची- 'जागतिक समाजा'ची- सामूहिक जबाबदारी ठरते. आताच्या जगात नवे शोध आणि त्यांचा उपयोग यांना भौगोलिक किंवा राजकीय बंधनांमध्ये जखडून ठेवता येत नाही. आज लागलेला नवा शास्त्रीय शोध पाहता पाहता हजारो मैल दूर असलेल्या देशांमध्ये पोहचून आपली बाजारपेठ तेथे शोधतो. अनेक शैक्षणिक संस्था, नागरिक यांच्याशी झालेल्या विस्तृत चर्चांवर आधारित असे '२०३० साली आपले जग कसे असायला हवे' याचे हे चित्र मी सादर करीत आहे. सन २०३० साली माझ्या कल्पनेतील जग असे असेल... त्यात ग्रामीण आणि शहरी जनता, श्रीमंत आणि गरीब, विकसित आणि विकसनशील यांच्यातील तफावत बरीच कमी झालेली असेल. त्यावेळी वीज आणि शुद्ध पाण्याचे वाटप न्याय्य झालेले असेल. सर्वांना परवडणारी उत्तम दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध असेल. प्रत्येक राष्ट्राची बलस्थाने आणि अंगभूत क्षमता सिद्ध आणि स्पष्ट झालेल्या असतील. या क्षमतांच्या सुसूत्रीकरण आणि एकत्रीकरणाच्या मोहिमांतूनच राष्ट्रांना आर्थिक लाभ आणि गतिमान विकासाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होणार आहे. प्रशासन जनतेला प्रतिसाद देणारे, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असेल. महिला आणि मुलांशी संबंधित गुन्हे थांबलेले असतील आणि समाजातील कोणालाही आपण एकटे, वेगळे पडलो आहोत असे वाटणार नाही. ते जग असे असेल, ज्यात प्रत्येक राष्ट्र आपल्या नागरिकांना स्वच्छ, हिरवेगार पर्यावरण देऊ शकेल. प्रत्येक राष्ट्र उत्कर्षशील, सुरक्षित, दहशतवादापासून मुक्त, शांत आणि सुखी असेल. राष्ट्रांचे नेतृत्व सृजनशील असेल त्यामुळे ते राष्ट्रांमधील, समाजांमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा उभारून, कार्यान्वित करून शांतता आणि उत्कर्ष हेच आपले ध्येय मानतील. सन २०३० मधील जगाच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक असेल, ग्रामीण आणि शहरी जीवनांतील विषमता कमी करणे. जगभरातील तीनशे कोटींहून अधिक लोक ग्रामीण विभागात राहतात आणि त्यांच्यासाठी सर्वसमावेशक विकास, टिकाऊ शांतता आणि सर्वव्यापी उत्कर्ष साध्य करण्यासाठी या जनतेचे सक्षमीकरण महत्त्वाचे आहे. ग्रामीण-शहरी तफावत दूर करण्याचा प्रश्न हा दारिद्र्यनिवारण आणि विषमतेवर मात करण्याच्या मोहिमेशी जवळून संबंधित आहे. जगभरातील सुमारे ७० टक्के अत्यंत गरीब लोक खेड्यांमध्ये राहतात. शिक्षण, आरोग्यसेवा आणि उत्पन्न मिळविण्याच्या गरजेतून ग्रामीण लोकसंख्या शहरी भागांत स्थलांतर करीत आहे, चांगल्या संधींचा शोध घेण्याची धडपड करीत आहे, पण तिच्या वाट्याला निराशाच येत आहे. यामुळे शहरांतील गरिबीमध्ये भर पडते आणि समाजात विषमतेची दरी, संघर्ष निर्माण होतो. जगभरातील ग्रामीण भागांत अद्यापही उपयोगात आलेली साधनसामग्री, क्षमता, परंपरागत कौशल्ये आहेत. त्यांना त्यांच्या साधनांच्या, कौशल्यांच्या मूल्यवृद्धीसाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. म्हणूनच त्यासाठी काळाच्या ओघात टिकणाऱ्या, चिरस्थायी यंत्रणा विकसित करणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागांना शहरी सोयी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट अशा टिकाऊ विकास यंत्रणेद्वारे करावयाचे आहे. त्यातून तीन प्रकारच्या जोडण्या- (कनेक्टिव्हिटीज) निर्माण कराव्या लागतील. एक, प्रत्यक्षातील म्हणजे 'फिजिकल', दुसरी इलेक्ट्रॉनिक आणि तिसरी ज्ञानाची ('नॉलेज'). यातून 'आथिर्क जोडणी' निर्माण होईल. गावांचे परस्परांशी आणि शहरांशी उत्तम रस्त्यांद्वारे आणि आवश्यक तेथे रेल्वेमार्गांनी दळणवळण प्रस्थापित झाले पाहिजे. खेड्यांना शाळा, महाविद्यालये, इस्पितळे या पायाभूत सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत. ही झाली 'फिजिकल कनेक्टिव्हिटी'. तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या अद्ययावत साधनांद्वारे स्थानिक ज्ञानपरंपरेचे रक्षण आणि संवर्धन केले गेले पाहिजे. गावांना उत्तम शिक्षकांकडून उत्तम शिक्षण मिळण्या-बरोबरच चांगली वैद्यकीय सेवा, कृषी, मत्स्यव्यवसाय, फलोज्ञान आणि अन्नपदार्थ प्रक्रिया याबाबतची नवनवी माहिती खेड्यांत उपलब्ध झाली पाहिजे. ही झाली 'इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी'. एकदा या दोन जोडण्या अस्तित्वात झाल्या की 'नॉलेज कनेक्टिव्हिटी' अमलात आणली जाऊ शकेल. 'नॉलेज कनेक्टिव्हिटी'तून उत्पादनक्षमता, माहितीचा प्रसार, आरोग्यसेवेतील पारदर्शकता आणि बाजारपेठांशी संपर्क हे साध्य होऊशकेल. या तीन 'कनेक्टिव्हिटीज' साध्य झाल्या की त्यातून उत्पन्न वाढविण्याची क्षमता, त्यातून 'इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी'पर्यंत पोहचण्यासाठी गती मिळेल. जेव्हा आपण ग्रामीण भागांना शहरी सुखसोयी पुरवू शकू, तेव्हाच ग्रामीण भागांतील जीवनमान उंचावू शकू, गुंतवणूक आकषिर्त करू शकू. मग त्यावेळी ग्रामीण बीपीओज आणि 'मायक्रोफायनान्स'च्या यंत्रणांचा परिणामकारक वापर करू शकू. हे सर्व करण्यासाठी नेतृत्वाजवळ निर्णय घेण्याचे धाडस असले पाहिजे. नेतृत्वाजवळ उमदे व्यवस्थापन, पारदर्शक व्यवहार आणि कामाची सचोटी असली पाहिजे. 'ग्लोबल व्हिजन २०३०'मध्ये प्रदूषणविरहित स्वच्छ पर्यावरण, गरिबीशिवाय उत्कर्ष, युद्धाच्या भीतीपासून मुक्त शांतता आणि जगभरातील सर्व नागरिकांना राहण्यासाठी हे जग एक सुखाचे ठिकाण बनणे अभिप्रेत आहे. ही समान ध्येये साध्य करण्यासाठीच्या मोहिमेत जगातील अनेकानेक देशांचा, संस्थांचा आणि लोकांचा सहभाग आवश्यक आहे

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites