मैत्री बॅलन्सशीट संगे ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

27 August 2014

मैत्री बॅलन्सशीट संगे

डॉ. अनिल लांबा हे सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) म्हणून कार्यरत आहेत, त्याचबरोबर देशातील लोकांना अर्थसाक्षर बनवणे यासाठीही ते तितक्याच जोमाने कार्यरत आहेत. लोकांना अर्थसाक्षर बनवणे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक गुंतवणूकीबाबत (पर्सनल फायनान्स) मार्गदर्शन करणे हा मात्र त्याचा अजिबात अर्थ नाही. ते गुंतवणूक सल्लागार नाहीत! त्यांचा विषय किंवा कार्यक्षेत्र आहे बॅलन्स शीट - ताळेबंद पत्रक. काही विषयांचे नाव काढले तरी सर्वसाधारणपणे माणसे लगेच ते विषय किचकट आहेत, गुंतागुंतीचे आहेत, आपल्याला समजणार नाहीत असे गृहीत धरतात व त्यापासून दूर पळतात. आयकर, बॅलन्स शीट हे असे लोकांना दूर पळवून लावणारे विषय. पण बॉर्न टू विन संस्थेच्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यात डॉ. अनिल लांबांचे बॅलन्स शीट फायनान्स यावर भाषण झाले त्याला उपस्थित सर्व श्रोत्यांनी मन:पूर्वक दाद दिली. उपस्थित श्रोत्यांमध्ये बॉर्न टू विन संस्थेचा लक्ष्यवेध प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी होते, शिवाय इतरही मान्यवर होते. त्यातील बहुतेक सारे उद्योजक किंवा व्यावसायिक. त्यांच्यासाठी बॅलन्स शीट फायनान्स हे महत्वाचे विषय. भाषणानंतर या विषयांबाबतचे त्यांचे गैरसमज दूर झाले आणि या विषयांबाबत नवे विचार ते बरोबर घेऊन गेले. कार्यक्रम इतका यशस्वी झाला त्यासाठी प्रथम दाद द्यावी लागेल ती उद्योजकांची गरज लक्षात घेऊन कार्यक्रमासाठी डॉ. अनिल लांबा यांना पाचारण करणारे बॉर्न टू विनचे सीईओ अतुल राजोळी यांना!
कार्यक्रमात सुरवातीला लक्ष्यवेध हा बॉर्न टू विन संस्थेचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना डॉ. अनिल लांबा यांच्या हस्ते प्रमाणपत्र ट्रॉफीज प्रदान करण्यात आल्या. रोमान्सिंग बॅलन्स शीट हे डॉ. अनिल लांबा यांचे गाजलेले इंग्लिश पुस्तक. या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन त्यानंतर अतुल राजोळी यांच्या हस्ते झाले. बॅलन्स शीट व फायनान्स समजून घेताना हे अनुवादीत पुस्तकाचे नाव. डॉ. वीरेंद्र ताटके यांनी अनुवादाचे काम केले आहे. रोहन प्रकाशन या पुण्याच्या नामवंत संस्थेने हा प्रकाशित केला असून प्रकाशनाच्या वेळी रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर म्हणाले हे पुस्तक अगदी योग्य श्रोत्यांच्या उपस्थितीत प्रकाशित होत आहे याचा आनंद होत आहे. अतुल राजोळी पुस्तक प्रकाशित करताना म्हणाले, आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवे याची जाणीव उद्योजकांना होत आहे व हे एक सुचिन्ह आहे.
मध्यतंरानंतर डॉ. अनिल लांबा यांचे बॅलन्स शीट व फायनान्स या विषयांवर भाषण झाले. सुरवातीलाच त्यांनी श्रोत्यांना विचारले, तुमच्यापैकी नॉन- फायनान्स म्हणजे आपले काम फायनान्सशी संबंधित नाही असे समजणारे कोण आहेत त्यांनी हात वर करावा. बहुतेकांनी हात वर केले. डॉ. लांबा यावर म्हणाले, तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी जे काम करता त्यामुळे कंपनीच्या बॉटम लाईनवर परिणाम होत असेल तर तुम्ही फायनान्सशी नक्कीच संबंधित आहात. बॉटम लाईन म्हणजे काय? तर डॉ. लांबा म्हणाले, कंपनीचा नफा-तोटा हा प्रॉफीट व लॉस स्टेटमेंटमध्ये सर्वात खाली - तळाशी दाखवलेला असतो म्हणून त्याला बॉटम लाईन म्हणण्याचा प्रघात आहे. तुम्ही जर विक्रेते असाल तर कंपनीच्या उत्पादनाची विक्री केल्यामुळे तिला उत्पन्न मिळते व नफ्या-तोट्यावर परिणाम होतो. जर तुम्ही प्रॉडक्शन डिपार्टमेंटला असाल तरीही तुमच्या कामामुळे तुम्ही फायनान्सशी संबंधित आहात. या अर्थाने बघितले तर कंपनीच्या विविध खात्यात काम करणारा प्रत्येकजण फायनान्सशी संबंधित असतोच. पण आपला गैरसमज असतो, अकाऊंटस खात्यात काम करणारे म्हणजे हिशेब ठेवणारे तेवढे फक्त फायनान्सशी संबंधित आहेत. डॉ. लांबा पुढे म्हणाले, फायनान्सशी संबंधित असणार्‍या कंपनीतील प्रत्येकाने जर फायनान्स मॅनेजमेंटचे भान ठेवले तरच कंपनीची आर्थिक स्थिती चांगली राहील. मग प्रश्न येतो फायनान्स मॅनेजमेंट - आर्थिक व्यवस्थापन म्हणजे काय? त्याचे उत्तर आहे, आपल्या कामाशी निगडीत कृतीचा बॉटम लाईनवर काय परिणाम होतो त्याची जाण म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट.
एक सविस्तर उदाहरण त्यांनी दिले, एका मोबाईल कंपनीच्या विक्रेत्याला समजा मोबाईल फोन विकायचा आहे. हा दहा हजार रुपये विक्री किंमत निश्चित केलेला फोन ग्राहकाने आठ हजार रुपयांना मागितला तर त्या विक्रेत्यास माहीत हवे की या किंमतीत तो देणे कंपनीला परवडणारे आहे की नाही? याचाच अर्थ त्या फोनची कंपनीसाठी अंतिम कॉस्ट काय आहे त्यास माहीत हवे. समजा फोनची कॉस्ट नऊ हजार आहे तर आठ हजारात विकणे म्हणजे तोटा, पण सात हजार आहे व मालाला मागणी नाही तर विकून टाकणे यात फायदा. हे कॉस्टचे तत्व उद्योजकासाठीही महत्वाचे आहे, कसे ते पुढे बघू.
अनेक उद्योजक, अगदी बड्या कंपन्या उद्योगासाठी बॅंकांकडून कर्जे घेतात. ती हजारो कोटीच्या घरातील असतात. यातील काही हमखास बुडीत खात्यात जातात. सध्या याबाबतचे बहुचर्चित उदाहरण म्हणजे किंगफिशर एअरलाइन्सचे. या कंपनीला बॅंकांनी दिलेले सुमारे सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. छोट्या उद्योजकांबाबतही हे चित्र दिसते. डॉ. लांबा याबाबत म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेने उद्योग अपयशी-अयशस्वी का होतात याचा अभ्यास केला. त्यांना काही कारणे आढळून आली ती अशी;
  • उद्योग तांत्रिकदृष्ट्या कालबाह्य होणे
  • उत्पादनाची विक्री न करता येणे
  • लढाऊ व गैरवाजवी मागण्या करणारी कामगार संघटना - कामगार समस्या.
पण या अभ्यासातच दिसून आले, केवळ ५ टक्के उद्योग या कारणांनी अपयशी-अयशस्वी झालेले आहेत व ९५ टक्के उद्योग आर्थिक गैरव्यवस्थापन (फायनान्शियल मिस-मॅनेजमेंट) या एकाच कारणाने अपयशी-अयशस्वी झालेले आहेत. चांगले आर्थिक व्यवस्थापन किती महत्वाचे आहे ते यावरून दिसते. डॉ. लांबा म्हणतात, चांगल्या आर्थिक व्यवस्थापनाबाबत काही कळीचे नियम आहेत;

उद्योगाच्या भांडवलाची कॉस्ट (कॉस्ट ऑफ कॅपिटल) काय आहे?
उद्योजक उद्योगात स्वत:चे पैसे टाकतो, रिझर्व्हमधून म्हणजे व्यवसायाच्या संचित नफ्यातून जमा झालेले पैसे उद्योगात टाकतो, कर्ज घेतो, उधारीवर माल घेतो, त्याचे व्याज द्यावे लागते. अशा विविध प्रकारे भांडवल जमा करतो. तेव्हा मूलभूत तत्व असे की उद्योगातून मिळणारा नफा हा या भांडवलाच्या कॉस्टपेक्षा जास्त हवा. तसेच जेव्हा उद्योगासाठी कर्ज घेतले जाते तेव्हा त्या उद्योगातून कर्ज व व्याज परत करता येईल इतका नफा जनरेट व्हायला हवा. उद्योगासाठी आणखी सर्वात महत्वाची बाब म्हणजे कॅश फ्लो अर्थात रोकड. उद्योगाने समजा मोठा व्यवहार केला व त्यात भरपूर नफा होणार आहे, परंतु तो हातात येईपर्यंत कंपनीने तग धरायला हवा तर त्यासाठी तिच्याकडे रोकड हवीच. तसेच उद्योगात तेजी-मंदी-तेजी असे चक्र सुरू असते. तेव्हा मंदीतही तग धरून राहता येणे आवश्यक आहे.
डॉ. लांबानी देशाच्या अर्थव्यवस्थेचीही थोडी चर्चा केली. ते म्हणाले, उद्योग जसे आर्थिक गैरव्यवस्थापन यामुळे जसे अपयशी होते तसे संपूर्ण देशसुध्दा त्यामुळे धोक्यात येऊ शकतो. २००८ सालचा सबप्राईम घोटाळा हा त्याचेच उदाहरण आहे. मात्र आपल्या देशाचे आर्थिक व्यवस्थापन चांगले असल्याने त्यावेळेस आपण बचावलो. अर्थात जागतिकीकरणामुळे आता अनेक देशांतील तेज-मंदीचा एकमेकांवर परिणाम होत असतो, त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला झळ बसली हेही खरे.
उद्योगाचे आर्थिक व्यवस्थापन व शासनाचे आर्थिक व्यवस्थापन यात महत्वाचा फरक असा की उद्योगाला आधी भांडवल - पैशाची तरतूद करावी लागते किंवा किती भांडवल उभे करू याचा तो अंदाज घेतो व मग त्यानुसार खर्च किती करायचा ते ठरवतो, परंतु शासन मात्र खर्च किती करायचा ते आधी ठरवते. तितका पैसा सरकारकडे नसला तर त्याला डेफिशिट बजेट - तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. तुटीचे अंदाजपत्रकामुळे महागाई वाढते. डॉ. लांबा यांनी एक खुलासा केला, ते म्हणाले, महागाई खूप जास्त प्रमाणात वाढत असेल तर ते वाईट, तसेच ती खूप कमी प्रमाणात वाढत असेल तर तेही वाईट, कारण त्याचा अर्थ अर्थव्यवस्थेत गतिरोध निर्माण झाला आहे. महागाई हे अर्थव्यवस्था जिवंत आणि क्रियाशील असल्याचे लक्षण आहे व ४ ते ४.५ टक्के हा महागाईचा दर आवश्यक समजला जातो. तसेच महागाई वाढण्याचे कारण असते बाजारात येणारा पैशाचा मुबलक पुरवठा. वस्तुंच्या उपलब्धतेपक्षा त्यांना जास्त मागणी असेल तर त्यांचे भाव वाढतात व मागणी कमी असेल तर भाव कमी होतात, मागणी कमी होणे म्हणजे मंदी. सरकारला बाजारात येणारी पैशाची आवक घटावी वाटले तर सरकार कर वाढवते व व्याजदर वाढवते.
डॉ. लांबा यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते श्रोत्यांना कळेल असे बोलतात, उगाच क्लिष्ट तांत्रिक संज्ञा वापरत नाहीत. अर्थशास्त्राविषयी कुतुहूल जागृत करणारा हा यशस्वी कार्यक्रम त्यासाठी आभार बॉर्न टू विन, अतुल राजोळी त्यांच्या संपूर्ण टीमचे.
ही तर डॉ. लांबा यांच्या भाषणाची झलक म्हणता येईल. त्यांची मैत्री बॅलन्सशीट संगे ही पूर्ण दोन दिवसांची कार्यशाळा बॉर्न टू विन' तर्फे १७ व १८ ऑक्टोबर २०१४ ला आयोजित केलेली आहे. त्याचा अवश्य लाभ घ्यावा.

गुंतवणुक: रु. ३५,०००/-
बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी रु. २०,००० + 12.36% Services Tax
गणेश उत्सव विषेश ऑफर ८ सप्टेंबर २०१४ पर्यंत नाव नोंदणी केल्यास १५% ची सूट

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites