LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

11 October 2013

विश्वास निर्मिती वेगवान प्रगती!

विश्वास निर्मिती वेगवान प्रगती!
स्वतःची उच्च विश्वसनियता निर्माण करा...
विचार वागणुक परिवर्तित करणारी बॉर्न टू विन प्रस्तुत सहा तासांची मार्गदर्शक कार्यशाळा.
विश्वास हा आपल्या वैयक्तिक व्यावसायिक स्नेहसंबंधांचा आधारस्तंभ असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी स्नेहसंबंधांमध्ये, संघामध्ये, कुटुंबामध्ये, संस्थेमध्ये, राष्ट्रामध्ये जगामध्ये विश्वास खुप महत्त्वाची भुमिका बजावतो. जर विश्वास नसेल तर शक्तीशाली राजकीय सरकार पडू शकते, यशस्वी व्यवसाय उध्वस्त होऊ शकतो, अर्थव्यवस्था कोलमडू शकते, प्रभावी नेतृत्व संपुष्टात येऊ शकते, उत्तम मैत्रीचा अंत होऊ शकतो, स्नेहसंबंधांमध्ये तफावत निर्माण होऊ शकते.

उच्च विश्वास प्रस्थापित केल्याने उत्तुंग यशप्राप्ती होऊ शकते. विश्वास निर्मितीमुळे कोणत्याही क्षेत्रात आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत वेगवान प्रगती होऊ शकते. परंतु विश्वास निर्माण करण्याच्या  प्रक्रियेला बऱ्याच अंशी दुर्लक्षित केले जाते जेवढे महत्त्व दिले पाहिजे, तेवढे दिले जात नाही. विश्वास दिवसातले २४ तास, आठवड्यातील दिवस वर्षातील १२ महिने आपल्याला प्रभावीत करत असतो. आपल्या विचारांचा, आयुष्याचा, स्नेहसंबंधांचा, संभाषणाचा प्रत्येक वागणुकीचा दर्जा विश्वासावर अवलंबुन असतो.
जर वेगात चालायचं असेल तर एकटं चाला; परंतु बरंच अंतर चालायचं असेल तर इतरांना सोबत घेऊन चाला.

विश्वास निर्मिती वेगवान प्रगती! या सहा तासांच्या कार्यशाळेमध्ये बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी आपल्या प्रभावी शैलीद्वारे वैयक्तिक व्यावसायिक आयुष्यात स्नेहसंबंधांमध्ये उच्च विश्वास कसे निर्माण करु शकाल याबाबत मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेच्या मदतीने आपण आपली उच्च विश्वसनियता निर्माण करु शकाल आपल्या वैयक्तिक व्यावसायिक स्नेहसंबंधांच्या सहाय्याने यशस्वी होण्याच्या दिशेने वेगवान प्रगती कराल.

विश्वास निर्मिती वेगवान प्रगती! या कार्यशाळेमध्ये खालील गोष्टींचा खुलासा होईल?

. विश्वास आणि कार्य व्यवस्था
. विश्वास म्हणजे नक्की काय?
. विश्वासाच्या लहरी
. स्वतःची उच्च विश्वसनियता निर्माण करणे
. विश्वास निर्मितीचे महत्त्वाचे गुणधर्म
. विश्वसनिय स्नेहसंबंध निर्माण करणे
. विश्वास निर्मितीच्या १३ वागणुकी
. कुशल विश्वास-इतरांवर विश्वास ठेवण्याचे तंत्र

हि कार्यशाळा कोणासाठी?

. सामाजिक अथवा व्यावसायिक संस्थांचे कर्मचारी
. मॅनेजर, लिडर एक्सेक्युटिव्ह
. स्वयंरोजगारकर्ते प्रोफेशनल्स
. उद्योजक
. गृहिणी

दिनांकः गुरुवार, २४ ऑक्टोबर २०१३
वेळः दुपारी ठिक वाजता
स्थळः कर्नाटक संघ हॉल, ऑफ टी. एच. कटारीया मार्ग, माटुंगा (.)
गुंतवणुकः रुपये १२००/-, १०००/-, ६००/- फक्त
प्रवेशिका मिळवण्यासाठी संपर्कः
022-22939375/6/7/8, 7666426654, 9619465689



01 October 2013

निग्रहाचे बादशहा !

निग्रहाचे बादशहा !
सुनंदन लेले, सकाळ, रविवार, 15 सप्टेंबर 2013
मोठ्या अपघातातून बरा होत सहा महिन्यांत टेनिस कोर्टवर पुनरागमन करणारा थॉमस मस्टर असो, वयाची चाळिशी उलटून गेल्यावरही ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावणारा लिअँडर पेस असो वा गुडघ्याच्या दुखापतीवर मात करून 13 वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावणारा रॅफेल नदाल असो, त्यांच्या यशात चांगल्या खेळाबरोबरच निग्रही मनाचाही मोठा वाटा आहे. "अशक्‍य' हा शब्दच त्यांनी त्यांच्या शब्दकोशातून हद्दपार करून टाकलेला आहे.
ही घटना आहे 21 एप्रिल 1989 ची. ऑस्ट्रियाचा 21 वर्षीय टेनिसपटू थॉमस मस्टर त्याच्या कारकिर्दीच्या बहराच्या पर्वात होता. अमेरिकेतल्या फ्लोरिडा या गावी त्याचा अंतिम फेरीतला सामना होणार होता. सराव करून परत येत असताना त्याला भूक लागली म्हणून तो फूड मॉलवर थांबला. कारमधून पैसे काढायला त्यानं डिकी उघडली आणि तेवढ्यात काही कळायच्या आत तो हवेत सहा फूट फेकला गेला.

नॉर्मन सोबी नावाच्या मद्यधुंद माणसानं थॉमसच्या कारला समोरून प्रचंड जोरात धडक दिली होती. हा दणका इतका भयानक होता, की थॉमस तीनताड उडाला आणि त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचा चक्काचूर झाला. वेदनेची कळ त्याच्या मेंदूत गेली आणि तो भोवळ येऊन खाली पडला.
डॉक्‍टरांनी त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली. शुद्धीत आल्यावर त्यानं प्रथम पायाकडं बघितलं आणि डॉक्‍टरांना विचारलं"मी टेनिस कधी खेळू शकेन?'' डॉक्‍टर म्हणाले"मित्रा, टेनिस खेळायचं स्वप्न बाजूला ठेव...तू स्वत:च्या पायावर नीट चालू लागलास तरी मी देवाचे आभार मानेन.''
काही दिवसांनी थॉमसला रुग्णालयातून सोडण्यात आलं. एके दिवशी शस्त्रक्रिया करणारा डॉक्‍टर गावातल्या क्‍लबमध्ये व्यायामाला गेला असताना समोरचं दृश्‍य बघून तो थक्क झाला. कारण, थॉमस व्हीलचेअरवर बसून टेनिसचे फटके मारत होता. "हा काय वेडेपणा तू करतो आहेस थॉमस?'' डॉक्‍टरनं विचारलं असता, मस्टर म्हणाला"डॉक, माझ्या पायाला दुखापत झाली आहे; पण हात शाबूत आहेत... माझी पायाची दुखापत बरी होईपर्यंत मी हाताचा फील का घालवू...? माझे पाय बरे होतील, तेव्हा माझी फटक्‍यातली ताकद शाबूत राहायला हवी ना, म्हणून हा सराव करतोय...आणि रोज करत राहणार आहे.''
डॉक्‍टर थॉमसचा निग्रह बघून अचंबित झाला.
त्याच निग्रही थॉमसनं सहा महिन्यांत टेनिस कोर्टवर पुनरागमन केलं. इतकेच नव्हे तर मायकेल चॅंगसारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याला नमवीत 1995 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
ही कथा सांगण्याचा मतलब इतकाच, की निग्रही खेळाडू अशक्‍य ते शक्‍य करून दाखवतात आणि आदर्श घालून देतात.
लिअँडर पेसची कमाल
यंदाच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतल्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावून लिअँडर पेसनं कमाल केली. स्टीपनेकच्या साथीनं खेळताना लिअँडरनं उपांत्य फेरीत ब्रायन बंधूंचा केलेला पराभव तोंडात बोटं घालायला लावणारा होता. ब्रायन बंधूंचा दुहेरीतला खेळ जबरदस्त असतो. त्यातून मायदेशात खेळताना त्यांना मिळणारा "आवाजी' पाठिंबा त्यांचं मनोबल वाढवतो. असं असतानाही लिअँडर-स्टीपनेक जोडीनं ब्रायन बंधूंना थेट पराभूत केलं. तिथंच त्यांच्या विजेतेपदाचा पाया घातला गेला.
लिअँडरनं एका अशा विक्रमाची नोंद केली आहे, ज्यानं त्याचं नाव टेनिसच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाईल. तीन दशकांत विंबल्डनचं विजेतेपद मिळवणारा तो टेनिसच्या इतिहासातला फक्त दुसरा खेळाडू झाला आहे. होय, महान खेळाडू रॉड लेव्हर यांनीच फक्त असा चमत्कार करून दाखवला आहे. इतकंच नाही तर, सहा ऑलिंपिक स्पर्धांत लिअँडरनं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. हा विक्रम बाकी कोणत्याही टेनिस खेळाडूला जमलेला नाही. त्यानं 1992 मध्ये पहिल्यांदा ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतला, तो 2012 च्या लंडन ऑलिंपिक खेळापर्यंत. 2016 च्या रियो ऑलिंपिक स्पर्धेतही लिअँडरला खेळायचं आहे, असं समजतं.
1999 मध्ये लिअँडरनं महेश भूपतीच्या साथीनं पहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावलं; म्हणजेच 1990 चं दशक, 2000 चं दशक आणि आता 2010 चं दशक अशा तीन दशकांत लिअँडरची विजयी वाटचाल सुरू आहे. नुकतीच त्यानं चाळिशी ओलांडली आहे. वाढत्या वयात खेळताना, तिशीतील खेळाडूंनाही जमत नसताना लिअँडर नव्या जोमानं दुहेरीचे सामने खेळतो...आणि जिंकतो, याचा सर्वांना अभिमान आहे. बरोबर दहा वर्षांपूर्वी लिअँडरच्या मेंदूत ट्यूमर असण्याची शक्‍यता लक्षात घेऊन अमेरिकेत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या वेळी मार्टिना नवरातिलोवानं त्याला धीर दिला होता. अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 (9/11) रोजी "ट्‌विन टॉवर्स'वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आदल्या दिवशी लिअँडरनं ट्‌विन टॉवर्सच्या शॉपिंग मॉलमध्ये खरेदी केली होती. त्या खरेदीची पावती त्यानं अजून जपून ठेवली आहे. हे सगळं जिथं घडलं, त्याच न्यूयॉर्कमध्ये लिअँडरनं अमेरिकन खुल्या स्पर्धेतल्या दुहेरीचं विजेतेपद पटकावलं, हा मला विस्मयकारक योगायोग वाटतो.
नदालचा धडाका
2013 सालचं वर्णन रॅफेल नदाल कसं करेल, मला समजत नाही. वर्षाच्या सुरवातीला नदालनं पोट बिघडल्याचं कारण सांगत ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतून माघार घेतली. खरं सांगायचं तर त्याला पोटाबरोबर दुखऱ्या डाव्या गुडघ्यानंही सतावलं होतं. गुडघ्यावर तीन महिने उपचार करून घेतल्यावर नदालनं त्याच्या सर्वांत लाडक्‍या फ्रेंच खुल्या स्पर्धेवर राज्य गाजवलं. नदालचा उपांत्य फेरीत जोकोविचबरोबर झालेला साडेचार तासांचा सामना लाल मातीच्या कोर्टवरील सर्वोत्तम सामना समजला जातो. अंतिम सामन्यात आपल्याच देशाच्या डेव्हिड फेररला आरामात हरवत नदालनं विश्‍वविक्रमी आठवं विजेतेपद पटकावलं होतं.
फ्रेंच खुल्या स्पर्धेतल्या विजयी कामगिरीची नशा विंबल्डनच्या हिरवळीनं लगेच उतरवली. नदालला पहिल्या फेरीतच गारद व्हावं लागलं होतं. नदालला त्याचा दुखरा गुडघा परत सतावायला लागला होता. त्याच्या कारकिर्दीला धोका निर्माण करणारी गुडघ्याची दुखापत गंभीर होती. कारण डाव्या गुडघ्यातलं "पटेला टेंडन' अर्ध फाटलं होतं. 2012 मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेतलं विजेतेपद सोडता नदालला चांगला खेळ करता आला नव्हता. या सर्व पार्श्‍वभूमीवर नदाल अमेरिकन खुल्या स्पर्धेत कसा खेळतो, याकडं सर्वांचं लक्ष होतं. अमेरिकन खुल्या स्पर्धेतले सामने हार्ड कोर्टवर होत असल्यानं नदालच्या गुडघ्याची दुखापत डोकं वर काढणार नाही ना, अशी पाल बऱ्याच जणांच्या मनात चुकचुकत होती. विंबल्डनच्या मानहानिकारक पराभवानंतर नदालनं आपले प्रशिक्षक आणि काका टोनी यांच्याबरोबर योग्य मेहनत घेतली. कमजोर गुडघा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तंदुरुस्त केला. अमेरिकन खुल्या स्पर्धेअगोदर नदालनं तीन स्पर्धांत भाग घेत हार्ड कोर्टवर खेळायचा अनुभव गोळा केला. तो नुसताच खेळला नाही, तर त्यानं समोर आलेल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला पराभूत केलं.
न्यूयॉर्कच्या फ्लशिंग मेडोज प्रांगणात जाताना नदालच्या पाठीशी चांगल्या खेळाचा आणि भक्कम गुडघ्याचा विश्‍वास होता. पंधरा दिवसांच्या कालखंडात नदालनं दाखविलेल्या खेळानं प्रेक्षक अचंबित झाले. अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचला पराभूत करून नदालनं 13 वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले. "नदालच विजेतेपदाला पात्र होता...तो अफलातून खेळला...त्याच्या सातत्याला माझ्याकडं उत्तर नव्हतं,'' अशी प्रांजळ कबुली जोकोविचनं पराभवानंतर दिली. तंदुरुस्त नदालला पराभूत करणं किती कठीण आहे, याची प्रचिती सर्वांना आली. त्याच्या दुखऱ्या गुडघ्याची अवस्था बघता नदाल परत कोणत्या मोठ्या स्पर्धेत इतका चांगला खेळ करू शकेल, यावर कुणाचा विश्‍वास नव्हता; पण निग्रही नदालनं सर्व अडचणींवर मात करताना केलेले कष्ट सर्वांना दिसून आले.

निग्रही माणसांची झेप
वयाची चाळिशी उलटून गेल्यावरही ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावणारा लिअँडर पेस असो वा गुडघ्याच्या दुखापतीवर मात करून 13 वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावणारा रॅफेल नदाल असो, त्यांच्या यशात चांगल्या खेळाबरोबरच निग्रही मनाचाही मोठा वाटा असतो. "अशक्‍य' हा शब्दच त्यांनी त्यांच्या शब्दकोशातून हद्दपार करून टाकलेला असतो!
""आत्ता मी 40 वर्षांचा आहे. पुढच्या वर्षी 41, त्याच्या पुढच्या वर्षी 42...'', असं म्हणत लिअँडर "वय' या भीती दाखवणाऱ्या शब्दाची खिल्ली उडवतो. थॉमस मस्टरच्या जीवनकथेवरूनही हेच दिसून येतं, की निग्रही माणसांच्या मनात नकारात्मक विचारांना थारा नसतो.
थॉमस असो, लिअँडर असो वा नदाल असो, यांना नुसतं खेळताना आणि यश संपादन करताना बघून चालणार नाही. यश मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टाची नोंद घेणं आवश्‍यक आहे. अत्युच्च यश संपादन करण्यासाठी त्यांनी बाळगलेला निग्रह लक्षात घेतला पाहिजे. ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी हसत हसत केलेल्या त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे. विजेता जन्माला येत नसतो...दगडातून मूर्ती घडवताना जसे छिन्नीनं दगडाचे टवके काढावे लागतात, अगदी अशीच असते महान विजेता खेळाडू घडवितानाचीही प्रक्रिया! सर्वोच्च स्तरावरचा कोणताही खेळ बघताना म्हणूनच पाहणाऱ्याला भारावून जायला होतं!

11 September 2013

मुलाखतकार असावा तर असा!

मुलाखतकार असावा तर असा!
समीरण वाळवेकर, सकाळ, रविवार, ८ सप्टेंबर, २०१३
विख्यात ब्रिटिश मुलाखतकार, पत्रकार सर डेव्हिड फ्रॉस्ट यांचं नुकतंच (31 ऑगस्ट) निधन झालं. "टीव्हीवर मुलाखती घ्याव्यात तर फ्रॉस्ट यांनीच' असा लौकिक मुलाखत घेण्याच्या आगळ्यावेगळ्या शैलीद्वारे त्यांनी मिळवला होता. भाषेवर प्रभुत्व, समोरच्याला खुलवण्याची कला, मोजकं; पण मार्मिक बोलणं आणि सूचक कॉमेंट्‌सद्वारे मारलेल्या कोपरखळ्या...अशा गुणवैशिष्ट्यांनी त्यांच्या मुलाखती सजलेल्या असत. राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, अभिनेता, खेळाडू...कुणीही असो, फ्रॉस्ट यांनी मुलाखत द्यायची म्हटली की संबंधितांना दडपणच येत असे...!
लंडनमधल्या एका मित्राचा ई-मेल माझ्या कॉम्प्युटरवर येऊन पडला होता "डेव्हिड फ्रॉस्ट इज नो मोअर.'
क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर फ्रॉस्ट यांचा चेहरा तरळला. 1991 मध्ये भारतीय माहिती सेवेत (आयआयएस) दाखल झाल्यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात येत होतं आणि त्यात एक ब्रिटिश प्रशिक्षक बीबीसीच्या काही प्रसारणांच्या कॅसेट्‌स घेऊन आले होते. भारतात दूरदर्शन सोडल्यास एकही खासगी वाहिनी त्या वेळी नव्हती. फ्रॉस्ट यांनी घेतलेल्या काही मुलाखती त्यातल्या एका कॅसेटवर होत्या. त्या पाहताना या माणसाची पहिली ओळख झाली. तिथपासून ते 1997 च्या सुमारास भारतात नियमितपणे बीबीसी वाहिनी दिसू लागेपर्यंत (म्हणजे 1984 ते 1997 पर्यंत) डॉ. प्रणोय रॉय आणि विनोद दुवा हेच आमचे आदर्श. त्यानंतर आले तो सुरेंद्रप्रताप सिंग (एसपी) "आज तक' घेऊन! पण या सर्वांचे पितामह किंवा भीष्माचार्य म्हणजे फ्रॉस्ट!
1962 पासून ब्रिटिश टेलिव्हिजनवर झळकत स्वतःच्या प्रगल्भ, संयत आणि चिकित्सक शैलीनं फ्रॉस्ट यांनी जगभरातल्या चाहत्यांच्या मनात उत्तम टीव्ही पत्रकार, मुलाखतकार म्हणून मानाचं स्थान मिळवलं होतं. "दॅट वॉज द वीक दॅट वॉज' हा त्यांचा पहिला टीव्ही शो. काहीशा उपहासगर्भ पद्धतीनं, समोरच्याला कोपरखळ्या मारत, कधी चिमटे काढत फ्रॉस्ट हा शो अँकर या नात्यानं सादर करायचे. या शोमुळं ते इतके लोकप्रिय झाले, की जगभरातल्या नामवंत दूरचित्रवाणी वाहिन्यांकडून त्यांना आमंत्रणं येऊ लागली. अँकर म्हणून शो सादर करण्यासाठीची.
त्यांनी अँकर म्हणून शो सादर करावा, यासाठी अमेरिकी वाहिन्यासुद्धा उत्सुक असत. 1983 मध्ये ब्रिटनमध्ये "आय टीव्ही ब्रेकफास्ट स्टेशन' सुरू करणाऱ्या संस्थापकांपैकी फ्रॉस्ट हे एक होते. "ब्रेकफास्ट विथ फ्रॉस्ट' हा त्यांचा दर रविवारचा शो चांगलाच गाजला. 1993 ते 2005 अशी तब्बल 12 वर्षं तो चालला. त्यानंतर त्यांनी दोन दशकांत पाच टॉक शो चालवले. "थ्रू द की होल' हा काहीशा वेगळ्या धाटणीचा शोध-मुलाखतींचा शो टीव्ही-पत्रकारिता आणि मुलाखतींना वेगळा पैलू देऊन गेला. 2006 ते 2012 या सहा वर्षांत मात्र त्यांनी "अल्‌ जझीरा' वाहिनीवर "फ्रॉस्ट ओव्हर द वर्ल्ड' आणि "द फ्रॉस्ट इंटरव्ह्यू' हे दोन शो केले.

1968 मध्ये सव्वा लाख पौंडाची घसघशीत रक्कम देऊन अमेरिकी टीव्हीवर निमंत्रित करण्यात आलेले फ्रॉस्ट हे पहिले ब्रिटिश मुलाखतकार होते. "यूएस वेस्टिंग हाऊस'च्या "ग्रुप डब्ल्यू'साठी त्यांचा "द डेव्हिड फ्रॉस्ट शो' प्रचंड लोकप्रिय झाला. जॅक बेरी, टेनिसी विलियम्स यांच्यासारखे बडे लोक "फ्रॉस्ट ऑन अमेरिका' या त्यांच्या शोमध्ये आनंदानं सहभागी व्हायचे.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्‍सन यांची मुलाखत फ्रॉस्ट यांनी 1977 मध्ये घेतली. जगाच्या टीव्ही-इतिहासात सार्वकालिक मानदंड म्हणून मानल्या जाणाऱ्या ज्या काही मोजक्‍या टीव्ही-मुलाखती आहेत, त्यांत निक्‍सन यांची ही मुलाखत गणली जाते.
प्रत्येक भाग दीड तासाचा, अशी ही पाच भागांतली प्रदीर्घ मुलाखत होती. निक्‍सन यांना त्या काळात या मुलाखतीसाठी सहा लाख डॉलर मानधन देण्यात आलं होतं. ही मुलाखत खूप गाजली. या मुलाखतीसाठी फ्रॉस्ट यांनी सुमारे 30 तास निक्‍सन यांच्याबरोबर रेकॉर्डिंग केलं. त्यासाठी त्यांना एक महिना लागला.
अमेरिकेत त्या वेळी "वॉटरगेट' हे राजकीय भ्रष्टाचाराचं प्रकरण खूप गाजत होतं. "वॉटरगेट'बाबत आयुष्यात पहिल्यांदाच निक्‍सन यांनी- फ्रॉस्ट यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना- अमेरिकी जनतेची माफी मागितली होती, म्हणून ही मुलाखत ऐतिहासिक ठरली. ""अमेरिकी जनतेला मी फसवलं आहे आणि हे ओझं मला आयुष्यभर माझ्या शिरी बाळगावं लागेल,'' हे निक्‍सन यांचे माफी मागतानाचे शब्द होते!
फ्रॉस्ट यांनी 1964 ते 2010 या काळात सर्व म्हणजे आठ ब्रिटिश पंतप्रधानांची मुलाखत त्यांच्या टीव्ही-शोमध्ये घेतली होती. अशी कामगिरी नावावर असणारे फ्रॉस्ट हे बहुदा जगातले एकमेव टीव्ही-मुलाखतकार असावेत. त्याचबरोबर 1969 ते 2008 या काळातल्या सर्व अमेरिकी अध्यक्षांच्याही मुलाखती त्यांनी घेतल्या! असं भाग्य जगातल्या दुसऱ्या कोणत्याही टीव्ही-मुलाखतकार अँकरला मिळालेलं नाही.
निक्‍सन यांच्या त्या ऐतिहासिक मुलाखतीनंतर "फ्रॉस्ट-निक्‍सन' नावाचंच नाटक आणि नंतर चित्रपटही निघाले. हेसुद्धा जागतिक पातळीवरचं एकमेव उदाहरण! त्या काळी, म्हणजे 1970 च्या दशकात, "कॉंकार्ड' विमानानं लंडन ते न्यूयॉर्क असा दर वर्षी किमान 20-25 वेळा हवाई प्रवास करणारे फ्रॉस्ट हे "मोस्ट फ्रिक्वेन्ट फ्लायर' होते!
"फ्रॉस्ट ऑन सटायर' ही त्यांची टीव्ही-जगताला मिळालेली लघुपट रूपातली आणखी एक देणगी! एका तासाचा हा लघुपट "बीबीसी-फोर'साठी त्यांनी तयार केला आणि टीव्ही-इतिहासातल्या उपहासिकांचा वेध घेतला. टीना फे, रॉय ब्रेमनर, चेव्ही चेस, जॉन स्ट्युवर्ट, जॉन लॉइड यांच्यासारखे लोकप्रिय उपहासक आणि विनोदवीर त्यात सहभागी झाले होते. फ्रॉस्ट यांना डोळ्यांपुढे ठेवून त्या काळी अनेक चित्रपटांतल्या व्यक्तिरेखासुद्धा लिहिल्या जात असत.
नील आर्मस्ट्रॉंगनं चंद्रावर पाऊल ठेवलं, तेव्हा फ्रॉस्ट यांनी ब्रिटिश टीव्हीवर सलग दहा तासांचा "अपोलो-दोन कव्हरेज' नावाचा शो सादर करून प्रेक्षकांना थक्क केलं. 20-21 जुलै 1969 लाझालेला हा त्याचा शो ऐतिहासिकच ठरला!
1960 च्या दशकात ब्रिटिश अभिनेत्री जेनेट स्कॉटबरोबर फ्रॉस्ट फिरायचे. अमेरिकी अभिनेत्री डायन कॅरॉलबरोबर त्यांचं लग्नही ठरलं होतं; पण झालं नाही. ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ कॅरोलिन कुशिंग हिच्याबरोबरही त्यांची दोस्ती होती. अभिनेता पीटर्स सेलर्सच्या मृत्यूनंतर त्यांची बायको लीन फ्रेडरिकबरोबर फ्रॉस्ट यांनी लग्न केलं; पण एका वर्षात घटस्फोट झाला. अमेरिकी अभिनेत्री कॅरोल लिनली हिच्याबरोबरही फ्रॉस्ट यांचे 15 वर्षं प्रेमसंबंध होते असं म्हटलं जातं. 1983 मध्ये लेडी कॅरिनाबरोबर फ्रॉस्ट यांचा विवाह झाला. या विवाहातून त्यांना तीन अपत्यं झाली. तसं एकूण रंगेल आयुष्य होतं फ्रॉस्ट यांचं!
टीव्हीच्या छोट्या पडद्यावरचा फ्रॉस्ट यांचा वावर जितका सहजसुंदर, सुखावह, खट्याळ, खोडकर होता, तितकेच अनपेक्षित धक्के देणारे, उपहासात्मक चिमटे काढून अस्वस्थ करणारे त्यांचे प्रश्‍न असत. समोरचा माणूस कितीही मोठा असू द्या...पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, अभिनेता किंवा खेळाडू...असा कुणीही असू द्या...फ्रॉस्ट यांच्या प्रश्‍नांना उत्तरं देताना त्याच्या नाकी नऊ येत असत. फ्रॉस्ट यांच्यासमोर बसण्याआधी भली भली मंडळी गृहपाठ करून यायची! इतकंच नव्हे तर, मोठमोठ्या अभिनेत्रीही रंगीत तालीम करूनच मुलाखत द्यायला यायच्या. ही रंगीत तालीम मोठ्या दिग्दर्शकांसमवेत कॅमेऱ्यापुढं बसून रीतसर केली जायची...!
मुलाखती घेताना फ्रॉस्ट यांनी कधी आक्रस्ताळेपणा केला नाही, आवाजाची पट्टी वाढवली नाही किंवा असंसदीय शब्दप्रयोगही केले नाहीत. समोरच्याकडून ते हवी ती माहिती प्रगल्भपणे, संयत पद्धतीनं काढून घेत असत. स्वतःच्याही नकळत फ्रॉस्ट यांना हवं ते उत्तर दिल्यावर समोरच्याला उमगत असे, की आपण काय बोलून गेलो आहोत! निर्भयपणे, स्पष्टपणे आणि ठामपणे प्रश्‍न विचारणं ही फ्रॉस्ट यांची खासियत होती. फ्रॉस्ट यांच्याकडून टीव्ही अँकर-संपादकांनी खूप काही शिकण्यासारखं आहे. फ्रॉस्ट यांचा ठसा जागतिक टीव्हीवर; तसंच ब्रिटिश आणि अमेरिकी समाजजीवनावरही मोठ्या प्रमाणावर उमटला होता. फ्रॉस्ट यांनी टीव्हीवर मनापासून प्रेम केलं.
भाषेवर प्रभुत्व, समोरच्याला खुलवण्याची कला, मोजकं पण मार्मिक बोलणं आणि कोपरखळ्यांच्या सूचक कॉमेंट्‌स ही फ्रॉस्ट यांची वैशिष्ट्यं होती. फ्रॉस्ट यांनी टीव्ही-इंडस्ट्रीत पाच दशकं इतिहास घडवला. यापुढं, जेव्हा जेव्हा कॅमेऱ्यासमोर बसण्याची वेळ येईल, तेव्हा तेव्हा, डेव्हिड फ्रॉस्ट, तुमचा चेहरा डोळ्यांपुढं तरळेल आणि थोडं वळून कॅमेऱ्यात नजर भिडवून म्हटलेले तुमचे शब्द आठवतील ः "हॅलो...गुड इव्हिनिंग अँड वेलकम!'

02 September 2013

स्वप्नं प्रत्यक्षात आणणारा माणूस

स्वप्नं प्रत्यक्षात आणणारा माणूस
कालनिर्णयच्या रूपात मराठी घराघरातमनामनात पोहोचलेल्या ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचे नुकतेच निधन झाले. दैनिक लोकसत्तातील शब्दकोडय़ांपासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द, त्यांच्या आयुष्यात आलेली वेगवेगळी वळणं, चढउतार, त्या सगळ्यांतून बावनकशी सोन्यासारखे तावून सुलाखून बाहेर पडलेले जयंत साळगावकर म्हणजे एक आश्चर्याचा प्रवास आहे.

(वडिलांबद्दलचे जयराज साळगांवकर यांचे अनुभव)
बाबांनी १९५१ मध्ये लोकसत्तादैनिकामध्ये शब्दकोडे विभागात रचनाकार आणि सहसंपादक म्हणून कामाला सुरुवात केली. त्याआधी त्यांनी मालवणमध्ये ज्योतीनावाचे एक नियतकालिक चालवलं होतं. प्रचलित तसंच संत साहित्याच्या वाचनामुळे त्यांना शब्द, त्यांचे अर्थ, त्यातले बारकावे यांचं चांगलं ज्ञान होतं. लोकसत्ताच्या शब्दकोडे विभागात नोकरी करताना त्याचा त्यांना चांगलाच उपयोग झाला. लोकसत्तातील शब्दकोडय़ांना तेव्हा अमाप लोकप्रियता होती. शब्दकोडे विभागात तीस-बत्तीस माणसं काम करत. एका चौकोनाला आठ आणे अशी शब्दकोडे स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी होती. सुरुवातीला शब्दकोडय़ांवर सरकारी बंधनं नव्हती, पण नंतर तीस हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची बक्षिसं नसावीत आणि वर्षभरातून सतराच शब्दकोडी प्रकाशित करावीत अशी बंधनं आली. प्रत्येक स्पर्धेत एक लाखाच्या आसपास रक्कम जमा होत असे. बक्षिसं देऊनही चांगली रक्कम उरत असे. शब्दकोडय़ांमध्ये जितकी विविधता तितकं लोकांचं त्याबद्दलचं आकर्षण वाढे. लोकसत्ताचा खपही वाढे. त्यामुळे बाबा आणि विद्याधर गोखले शब्दकोडय़ांमध्ये नावीन्य आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघत. लोकसत्तातली शब्दकोडी इतकी लोकप्रिय होती की या वर्तमानपत्राचा उल्लेखच लोक कोडय़ाची लोकसत्ताअसा करत आणि असा उल्लेख केलेला तेव्हाचे संपादक ह. रा. महाजनी यांना अजिबात आवडत नसे, अशी आठवण बाबा सांगत. शब्दकोडे विभागात काम करताना विद्याधर गोखले यांच्यावर महिन्यातून एक तर बाबांवर महिन्यातून एक शब्दकोडे करण्याची जबाबदारी असे. त्याशिवाय त्या शब्दकोडय़ाच्या जाहिराती करायच्या आणि थोडेफार इतर व्यवस्थापकीय काम असे. ही कामं करूनही त्यांच्याकडे भरपूर वेळ उरायचा. त्या वेळात त्यांनी फलज्योतिषाचा आणि हस्तसामुद्रिकाचा अभ्यास केला. अगणित लोकांच्या कुंडल्या आणि हात त्यांनी त्या काळात बघितला. या अभ्यासाचा त्यांना लगेचच उपयोग झाला तो अत्यंत लोकप्रिय अशी लोकसत्तातली शब्दकोडी १९५६ मध्ये बंद पडली तेव्हा.
शब्दकोडे विभाग बंद झाल्यानंतर बाबा मात्र लोकसत्तातून बाहेर पडले. नोकरी सोडताना मिळालेल्या १५-१६ हजारांच्या रकमेतून त्यांनी लोकमित्रनावाचं साप्ताहिक सुरू केलं. पण सहा महिन्यांतच ते पैसेही संपले आणि साप्ताहिकही बंद पडलं. पण या लोकमित्रच्या अंकात बाबा साहित्याच्या अंगाने, संतवचनांवर आधारित राशिभविष्य लिहीत असत. त्यांचं या पद्धतीचं राशिभविष्य त्या काळात लोकप्रिय झालं होतं. लोकमित्रबंद पडल्यानंतर लोकसत्ताचे संपादक ह. रा. महाजनी यांनी बाबांना, त्याच प्रकारचं भविष्य लोकसत्तात लिहावं असं बाबांना सुचवलं. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासही त्यांना अशा प्रकारे कामात आला. त्यानंतर १९५६ ते १९६२ या काळात ते लोकसत्ताच्या रविवारच्या अंकात राशिभविष्य लिहीत. बाबांनी त्या काळात इतर नियतकालिकांमध्ये कथा, लेख असं भरपूर लिखाण केलं. त्यांचं राशिभविष्य वाचायला लोकांना फार आवडायचं. त्यामुळे नंतरही इतर अनेक दैनिकांमध्ये त्यांनी राशिभविष्य लिहिलं.
१९५६ साली त्यांनी लोकसत्तातली शब्दकोडं विभागातली नोकरी सोडली, पण शब्दकोडय़ाची त्यांच्यात निर्माण झालेली आवड मात्र त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातूनच १९५८ साली शब्दरंजन स्पर्धा सुरू झाली. त्यात प्रामुख्याने भर होता साहित्य क्षेत्रावर. सुप्रसिद्ध असलेल्या तसंच फारसा माहीत नसलेल्या साहित्यिकांच्या अवतरणांवर आधारित शब्दकोडं हा अगदी नावीन्यपूर्ण प्रकार होता. ते खरोखरचं शब्दरंजनच होतं. मराठी वाचकांनी शब्दरंजन स्पर्धा अक्षरश: डोक्यावर घेतली आणि बाबांना एक नवीनच मार्ग सापडला. शब्दरंजन म्हणजे जयंत साळगावकर हे समीकरणच पुढे रूढ होऊन गेलं. या शब्दरंजन स्पर्धेने बाबांना यश, पैसा सगळं मिळवून दिलं. पण त्यांचा स्वभावच असा होता की त्यातून त्यांना पुढचं काहीतरी दिसत असायचं. त्यातूनच पुढच्या कल्पना सुचायच्या आणि मग त्या प्रत्यक्षात उतरवायच्या मागे ते लागायचे.

साहजिकच शब्दरंजन स्पर्धेतून मिळालेल्या आर्थिक समृद्धीतून त्यांना वेध लागले ते संतवाङ्मय लोकांना स्वस्तात उपलब्ध करून देण्याचे. दासबोधातला विचार लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी त्या वेळी सव्वा रुपया किमतीत दासबोध उपलब्ध करून दिला. त्याशिवाय १९६० साली त्यांनी मुंबईत शिवाजी पार्कवर स्वरगंगानावाचा एक भक्तिगीतांचा खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अडीच लाखांहून अधिक लोक या कार्यक्रमाला आले आणि त्या काळातल्या अव्वल गायकांनी गायलेल्या भक्तिरसात डुंबले. शब्दरंजननावानेच त्यांनी एक मासिकही सुरू केलं होतं. त्याचे संपादक होते ग. दि. माडगूळकर. शब्दरंजनमधून जसजसा फायदा होत होता, त्यातून आर्थिक पाठबळ उभं राहात होतं, तसतशा बाबांच्या डोक्यातून नवनवीन कल्पना बाहेर येत होत्या. त्या तर ते प्रत्यक्षात आणतच, शिवाय त्या काळातल्या वेगवेगळ्या संस्थांना, समाजोपयोगी कामांना भरघोस आर्थिक मदतही करत.
शब्दरंजन स्पर्धेची ही भरधाव निघालेली गाडी ब्रेक लागावा तशी १९६४ पासून मंदीच्या वावटळीत सापडली. १९६९ मध्ये सरकारने लॉटरी सुरू केली. शब्दकोडी भरून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोक लॉटरीची तिकिटे विकत घ्यायला लागले. कोडी चालेनात. कोडय़ांची बक्षिसं देणं, छपाई, कागदवाल्यांची बिलं देणं सगळं हाताबाहेर जायला लागलं. अनेकजण कोर्टात गेले. अशा वेळी खरं तर कुणीही डगमगला असता. पण बाबा डगमगले नाहीत. आज त्या सगळ्याकडे बघताना असं वाटतं की एका गोष्टीतून दुसरी गोष्ट, तसं एका कामातून दुसऱ्या कामात, दुसऱ्या क्षेत्रात हे जसं काही सहजपणे घडत गेलं. तसं ते घडलं नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण बाबांची जिद्द, संकटातून वाट शोधायची, नव्या वाटेने तितक्याच उत्साहाने चालायची वृत्तीच अशी होती की ते त्या सगळ्यातून सहजपणे वाट काढत गेले. त्यामुळे शब्दरंजन स्पर्धा बंद झाल्यानंतर दिनदर्शिकेचं प्रकाशन करायचं ही कल्पना त्यांना सुचली. त्या काळात खरं तर इतरही दिनदर्शिका होत्या. पण बाबांनी १९७२ मध्ये तिला एक रूप दिलं आणि आज घरोघरी भिंतीवर असणारं कालनिर्णय त्यातूनच आलं. पहिल्या वर्षी कालनिर्णयची किंमत होती सव्वा रुपया आणि त्याचा खप झाला नव्वद हजार. आधी फक्त मराठीत निघणारे कालनिर्णय आता आठ भारतीय भाषांमध्ये निघते आणि त्याचा खप आहे, साधारणपणे दीड कोटी. कालनिर्णय हे सुटसुटीतपणे पाहायचं पंचांग तर आहेच, शिवाय आजच्या काळातल्या रोजच्या जगण्यात लागणाऱ्या अनेक गोष्टी त्यात आहेत. रेल्वेचं, एसटीचं टाइम टेबल घ्या, वेगवेगळ्या रेसिपी घ्या, वेगवेगळ्या टिप्स घ्या.. दिनदर्शिकेच्या उरलेल्या जागेत माहितीपूर्ण लेख इतरजणही प्रसिद्ध करत, पण तिथे पुलंपासून कुसुमाग्रजांपर्यंत मोठमोठय़ा साहित्यिकांचे लेख प्रसिद्ध करून बाबांनी त्या जागेचं आकर्षणमूल्यच एकदम वाढवलं. वर्षभर भिंतीवर असणाऱ्या कालनिर्णयच्या पाठीमागे असलेल्या रेल्वेच्या टाइम टेबलने तर त्याची उपयुक्तता एकदम वाढवली. आता कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय हे समीकरणच लोकांच्या मनात फिट्टं बसलं आहे. सुरुवातीला मराठी भाषकांमध्ये स्थान मिळवलेल्या कालनिर्णयचा नंतर इतर भाषांमध्ये जो पसारा वाढला तो पाहता कॅलेंडर कसं असावं, याबद्दलचा बाबांचा विचार हा फक्त मराठी मनापुरता सीमित नव्हता, तर तो एकूणच सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांना सामावून घेणारा होता हेच स्पष्ट होतं. कालनिर्णयचा जम बसल्यानंतर त्यांनी स्वत:चं मुद्रणालय सुरू केलं. जर्मनीहून मोठं मशीन आणलं. पुढे आणखी मशिन्स वाढवली. हळूहळू सुमंगल प्रेसचं नाव मुंबईतलं एक मोठं मुद्रणालय असं घेतलं जाऊ लागलं. बाबांनी कालनिर्णय सुरू केलं तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. त्यामुळे एखादा उद्योग कसा उभा राहतो ते मी जवळून बघू शकलो, समजून घेऊ शकलो. बाबांचा दांडगा लोकसंग्रह त्यांच्या या उद्योजकतेला कसा पूरक ठरला हे मी जवळून बघितलं आहे. त्यांनी जोडलेली माणसं त्यांच्या अशा प्रत्येक उपक्रमात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

अनेकविध प्रकारची माणसं बाबांच्या आयुष्यात आली. त्यात अनेक मोठमोठी माणसं होती. त्यातल्या अनेकांवर बाबांचा आणि अनेकांचा बाबांवर लोभ होता. या माणसांनी, त्यांच्या सहवासाने, त्यातल्या अनुभवांनी बाबांचं आयुष्य खरोखरच श्रीमंत केलं आहे.  पण या सगळ्यापलीकडे जाऊन बाबांचं श्रद्धास्थान होत ते गणपती. १९८९च्या कालनिर्णयमध्ये त्यांनी गणपतीबद्दल लिहिलं आहे, ‘‘भारतीय भूमीत जन्मलेले आणि इथंच लोकोत्तर कर्तृत्व गाजवून अमरत्व पावलेले आपले विविध देव अवतारी पुरुष हे आपलं पारंपरिक वैभव आहे. आपले देव नीतिधर्माचे उद्धारक आहेत. महत्कार्याचे कारक आहेत. दीनदुबळ्यांचे तारक आहेत. अडलेल्या नाडलेल्यांचे साहाय्यक आहेत आणि म्हणूनच महाकाव्याचे नायक आहेत. रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये त्रिखंडात मान्य झाली आहेत ती त्यांचे नायक असे लोकोत्तर महापुरुष आहेत म्हणून. अशीच एक लोकोत्तर विभूती म्हणजे श्रीगणेश. परमेश्वर- पार्वतीचा हा पराक्रमी पुत्र दुष्टदुर्जनांचा निर्दालन करून विश्ववंद्य झाला. गजानन गणेश हा देवांचा सेनापती. केवळ रणक्षेत्रातच नव्हे तर कलाक्षेत्रातही अग्रस्थानाचा अधिकारी. संगीत, नृत्य, नाटय़ इत्यादी सर्व कलांचा प्रथमपदाचा मानकरी. आपण त्याला पूजतो ते तो असा गुणाधीश आहे म्हणून!’’
विद्याधर गोखले हे बाबांचे दैनिक लोकसत्तामधले सहकारी. बाबांवरच्या एका लेखात ते म्हणतात, ‘‘साळगावकरांच्या शब्दरंजन कोडय़ांच्या अत्यंत चलतीच्या काळात मी त्यांचे नाव स्वप्नरंजन साळगावकरअसेच ठेवले होते. कारण स्वप्नरंजनहा त्यांचा स्वभावच आहे. पहा ना, अवघा २५० रुपये पगार असताना १९५५ साली या गृहस्थाच्या डोक्यात मुंबईहून सिंधुदुर्ग विशेषांककाढण्याचे स्वप्न जागृत झाले.  ते पु. भा. भाव्यांना म्हणाले होते, ‘पाहिजे तेवढे लिहा. पृष्ठसंख्येची मर्यादा तुम्हाला नाही.त्यासाठी त्यांनी मुखपृष्ठासाठी मोठे चित्रही काढून घेतले होते. ग्लॉसी पेपरवर त्यांना हा अंक काढायचा होता. सिंधुदुर्गात दणक्यात प्रकाशन समारंभ करायचा होता. पण ते स्वप्न अधुरंच राहिलं.’’
बाबांना साठ वर्षे पूर्ण झाली तेव्हा काढलेल्या विशेषांकात ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांचा एक मोठा लेख आहे. त्यात दळवी लिहितात, ‘‘जयंतरावांनी पैसा जवळ केला. पण अनेकदा पैशाबरोबर येणारा गर्व, मिजास, अहंभाव, उधळपट्टी, श्रीमंतीचं प्रदर्शन अशांसारख्या गोष्टी जवळ येऊन दिल्या नाहीत. मध्यम गरिबी, बेकारी, बरे दिवस, सुरळीत आयुष्य, पुन्हा जीवघेणी गरिबी आणि त्यानंतर उदंड श्रीमंती अशा विविध अवस्थांमधून गेल्यानंतर आता श्रीमंती असतानाही साळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वात एक आध्यात्मिक श्रीमंती निर्माण होत आहे असं दिसतं. त्यांच्या वृत्तीत एक प्रकारची तटस्थता निर्माण होत आहे. आपला धर्म, आपला समाज यांचा ते अधिक विचार करत आहेत असं वाटतं. हिंदू धर्मात झपाटय़ाने सुधारणा व्हाव्यात यावर त्यांचा कटाक्ष आहे. हिंदू धर्माकडे ते मानवधर्म म्हणून पाहतात. अंधश्रद्धांचं निर्मूलन झालं पाहिजे असं ते मानतात. पण ते करताना डोळस श्रद्धेवरही त्यांचा भर आहे. जगाचं सूत्रसंचालन करणारी शक्ती आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. त्या शक्तीची भक्ती हवी, ती शक्ती तुम्हाला योग्य रस्त्यावर ठेवते असं ते मनापासून मानतात.’’
याच अंकात बाबांवर लिहिलेल्या लेखात दत्तप्रसाद दाभोळकर लिहितात, ‘‘भविष्यावर विश्वास नसलेल्या माझ्या मनाला जयंतरावांनी अनेक झटके दिलेत. अजून माझा अविश्वास अभेद्य आहे. पण ते त्याला कधीतरी जमीनदोस्त करणार अशी मला भीती वाटते. पण तरीही ज्योतिर्भास्कर जयंतराव मला आवडतात आणि मी त्यांच्या प्रेमात पडलोय, त्याचे कारण त्यांची भविष्य ही विद्या नव्हे. मी त्यांच्या प्रेमात पडलोय ते समोरच्या माणसाला समजावून घेऊन त्याला आपल्याला पटलेली व आपल्याकडून होईल तेवढी मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे. जयंतराव माणसात गुंततात. त्यांना माणसे एकदम आवडतात किंवा आवडत नाहीत आणि मग आवडलेली माणसे संपूर्णपणे त्यांची असतात. जयंतरावांना आवडणाऱ्या माणसांत छोटा-मोठा असा भेदभाव नसतो. त्या यादीत त्यांच्या घरातील इतर कोणाशीच न पटणारा त्यांचा ड्रायव्हर असतो, नाहीतर माझ्यासारखा एखादा मित्र!’’
त्यांनी वडील या नात्याने मला काय दिलं, याचा मी विचार करतो तेव्हा जे जाणवतं ते मला आजही थक्क करणारं आहे. कारण मुळात त्यांनी लहानपणापासून मला जे दिलं, ज्याचा माझ्यावर खूप सखोल परिणाम झाला ते सगळं अगदी नकळत आहे. म्हणजे एखादा संस्कार करायचा म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षाही त्यांच्या सहज वागण्यातून मला जे काही मिळत गेलं त्याची किंमत कशाशीच होऊ शकत नाही. मला आठवतं, पहिलीमध्ये असताना परळमधल्या एका शाळेत मी जायचो. एकदा तिथल्या हेडमास्तरांनी मला भिंत आणि दार यांच्यामध्ये उभं करून, दाराची उघडझाप करायची शिक्षा दिली. बाबांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी मला विचारलं, तुला बालमोहनमध्ये जायचं आहे की किंग जॉर्जमध्ये? आता पहिलीतल्या मुलाला तेही शाळा कोणती हवी याबाबतचे दोन पर्याय देऊन त्यातून निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य देण्याचा तो काळ नव्हता. पण ते स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं. त्याचा माझ्यावर नकळत का होईना खूप परिणाम झाला. अशीच एक आठवण आहे, पुढच्याच वर्षीची. मी दुसरीत असतानाची. एकदा ते मला ढवळे प्रकाशनाच्या पुस्तकांच्या दुकानात घेऊन गेले. तुला हवी आहेत ती पुस्तकं घे, असं त्यांनी मला सांगितलं. त्या वयातदेखील मी २५-३० पुस्तकं निवडली. घरी नेऊन सगळी वाचली. तिथून मला वाचनाची गोडी लागली. नकळतपणे त्यांनी केलेला हा वाचनसंस्कार माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही. बाबा त्या वेळी शब्दरंजन स्पर्धेसाठी शब्दकोडी तयार करत आणि त्यात मराठी पुस्तकांमधली अवतरणं असत. ही अवतरणं वाचकांना सहज मिळणारी नसावीत यासाठी बाबा दुर्मीळ पुस्तकं धुंडाळत. त्यामुळे लहानपणापासूनच मला कितीतरी दुर्मीळ पुस्तकंही वाचायला मिळाली. ती तेव्हा किती समजली माहीत नाही, पण पुस्तक हाताला लागलं की ते वाचूनच संपवायचं ही सवय लागली ती तिथूनच. बाबा खूपदा निर्णयसागरच्या प्रेसमध्ये जात. त्यामुळे छपाईचं मशीन, छपाई खिळे, रंग हे सगळं बघत, ऐकतच मी मोठा झालो. त्यांचा एक विशेष गुण म्हणजे कामासाठी ते ज्यांच्या ज्यांच्याकडे जात तिकडे त्यांच्याबरोबर कधी कधी मलाही घेऊन जात. बाबांमुळे साहित्य, पत्रकारिता, नाटक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतली अनेक मोठी माणसं आमच्या घरी येत. त्यामुळे त्या काळातल्या मोठय़ा माणसांना मला अगदी लहानपणीच भेटता आलं. या सगळ्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा हे खरं तर एक प्रकारचं शिक्षणच होतं. त्या काळात मला जे शिकायला मिळालं ते कुणालाही, कधीही कुठल्याही विद्यापीठात शिकायला मिळालं नसेल. मला नेहमी वाटतं की वातावरणातच मी खऱ्या अर्थाने घडलो.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites