LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

06 March 2014

ठिणगी विझू देऊ नका..

ठिणगी विझू देऊ नका..
प्रा. सुरेश नाखरे, लोकसत्ता, सोमवार, १७ फेब्रुवारी २०१४
जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थांमध्ये तसेच विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांशी हितगुज करण्यासाठी बोलावल्या गेलेल्या मान्यवरांच्या भाषणांचा निवडक अंश या मासिक सदरातून देत आहोत -
चेतन भगत हे प्रथितयश भारतीय लेखक असून त्यांची गाजलेली इंग्रजी पुस्तके म्हणजे फाइव्ह पॉइंट समवन, वन नाइट अ‍ॅट कॉल सेंटर, थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ, टू स्टेट्स, रिव्होल्यूशन २०२० आणि व्हॉट यंग इंडिया वाँट्स. त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारीत चित्रपटही गाजले आहेत. एक स्तंभलेखक व वक्ता म्हणूनही ते सुपरिचित आहेत. चेतन भगत यांनी सिम्बॉयसिस (इंडिया) या संस्थेच्या २००८ सालच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतपर समारंभात केलेल्या उत्कृष्ट भाषणाचा हा भावानुवाद..
आजचा दिवस तुमचा आहे. आपल्या घरातले समाधानाचे (काहींचे बाबतीत असमाधानाचे) आयुष्य मागे ठेवून काही तरी बनण्यासाठी तुम्ही इथे प्रवेश घेतला आहात. मला खात्री आहे की, तुम्ही आज खूप उत्तेजित झालेले असणार. माणसाच्या जीवनात काही दिवस असे असतात, जेव्हा तो अतीव आनंदात व उत्साहात असतो. कॉलेजमधला पहिला दिवस हा त्यातला एक. आज जेव्हा तुम्ही कॉलेजला येण्याची तयारी करत होता तेव्हा तुमच्या पोटात जरा सुखद झिणझिण्या येत असणार. सभागृह कशाप्रकारे असेल, प्राध्यापक कसे असतील, माझे नवीन वर्गमित्र कोण असतील- खूप काही कुतूहल वाटलेले असणार. या उत्सुकतेला मी तुमच्यातली एक ठिणगी किंवा चमक असे म्हणतो, जी तुम्हाला खऱ्या अर्थाने जिवंतपणा जाणवून देते. मी आज तुमच्याशी ही ठिणगी कायमची चमकत ठेवण्याबाबत बोलणार आहे. जरी सर्व काळ नाही जमले तरी बऱ्याचदा खूप आनंदी कसे राहाता येईल, याबाबत बोलणार आहे.
या ठिणग्या कुठून बरे उगम पावतात? मला असे वाटते की, आपल्या जन्माबरोबरच त्याही जन्माला येतात. मी तुमच्यासारखे विद्यार्थी पाहतो आणि आजही मला अशा ठिणग्या दिसून येतात.. पण जेव्हा मी वृद्ध माणसे पाहतो आणि तिथे अशा ठिणग्या मोठय़ा मुश्किलीने दिसून येतात. याचा अर्थ असा की जसजसे आपण मोठे होत जातो तसतशा या ठिणग्या विझू लागतात. ज्यांच्यातल्या ठिणग्या बऱ्याच प्रमाणात विझल्या आहेत, त्यांची आयुष्ये मंद, उदास, हेतुशून्य आणि कडवट अशी बनतात. आठवून बघा, 'जब वुई मेट'च्या पहिल्या अध्र्या भागातली करीना आणि तीच दुसऱ्या अध्र्या भागातली. असेच काहीसे ठिणगी विझली की होते. मग ही ठिणगी, ही चमक सांभाळायची कशी? 
कल्पना करा की, ही ठिणगी म्हणजे दिव्याची एक ज्योत आहे. पहिली गोष्ट संगोपनाची- ठिणगीला निरंतर इंधन पुरवण्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाऱ्या-वादळापासून तिचे रक्षण करण्याची.
संगोपन करण्यासाठी आपल्यासमोर नेहमी काही उद्दिष्टे बाळगा. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, त्यात सुधारणा करणे आणि संपूर्ण क्षमता प्राप्त करणे हा मानवी स्वभाव असतो. वास्तविक यश म्हणतात, ते हेच असते. आणि हे प्राप्त करणे तुम्हालाही शक्य आहे. ते मोजायला काही बाह्य साधन नसते- उदा. कंपनीने तुम्हाला दिलेले पगाराचे पॅकेज, एखादी विशेष कार किंवा घर.
आपल्यापैकी बहुतांश जण मध्यमवर्गातले आहेत. आपल्यासाठी भौतिक टप्पा/ प्राप्ती हे यश असते आणि ते बरोबरच आहे. जेव्हा तुम्ही मोठे होता, ज्यावेळी पैसा दर दिवशीच्या निवडी/ गरजा तुमच्यावर लादत असतो, त्यावेळी आर्थिक स्वातंत्र्य ही एक मोठी प्राप्ती असते.
पण हा काही जीवनहेतू असू शकत नाही. जर तो तसा असता तर श्रीयुत अंबानी आज कामावर आलेच नसते. शाहरुख खान घरीच थांबला असता आणि यापुढे कुठे नाचलाही नसता. स्टीव्ह जॉब्ज अधिकाधिक चांगला आय-फोन बनवण्यासाठी झगडला नसता, कारण त्याने तेव्हा पिक्सार ही आपली कंपनी अब्जावधी डॉलर्सना विकूनसुद्धा टाकली होती. मग ते तसे का बरे वागले? ते दर दिवशी काम का करीत राहिले? त्यात त्यांना आनंद मिळत होता, म्हणून ते काम करीत राहिले. त्यामुळे त्यांना जिवंत असल्यासारखे वाटत होते, म्हणून ते काम करत राहिले. आहे त्या पातळीपेक्षा चांगले होण्यातच त्यांना बरे वाटत होते. तुम्ही जास्त अभ्यास केलात तर तुमचा दर्जा उंचावेल. तुम्ही जर विविध व्यक्तींमध्ये मिसळलात तर मुलाखतींच्या वेळी तुम्हांला लाभ होईल. तुम्ही सराव केलात तर तुमचे क्रिकेट अजून चांगले होईल. तुम्हाला हे माहीत आहे की, तुम्ही सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही, पण तरीही सरावाने तुम्ही तुमचा स्तर उंचावू शकता. पुढचा स्तर गाठण्यासाठी झगडणे हे फार महत्त्वाचे आहे.
निसर्गाने गुणसूत्रांचे आणि परिस्थितिकीचे चित्र-विचित्र असे संच आरेखित केले आहेत, ज्यामध्ये आपण जन्माला आलो आहोत. ही बाब आपण सुखी होण्यासाठी स्वीकारली पाहिजे आणि निसर्गाच्या त्या आराखडय़ाला मानले पाहिजे. या गोष्टीला तुम्ही तयार आहात? या बाबतीत तुमची ध्येये-उद्दिष्टे तुम्हाला मदत करतील.
मला आणखी एक सांगायचे आहे, ते असे की, केवळ करिअर आणि शैक्षणिक उद्दिष्टे स्वत:समोर बाळगू नका. तुमची ध्येये-उद्दिष्टे अशी ठेवा की, तुमचे आयुष्य हे समतोल व यश यांनी युक्त असेल. 'समतोल' हा शब्द मी मुद्दाम 'यश' या शब्दाच्या आधी वापरला आहे. समतोल आयुष्य म्हणजे तुमचे स्वास्थ्य, संबंध, मानसिक शांती सारे काही चांगल्या स्थितीत असेल याची काळजी घेणे. विभक्त होण्याच्या दिवशी पदोन्नती मिळण्याला काही अर्थ नाही. तुमची पाठ दुखत असेल त्यावेळी कार चालवण्यात काही मजा नाही. तुमचे मन ताणतणाव यांनी व्यापलेले असेल तर शॉपिंग आनंददायी होणार नाही.
तुम्ही काही अवतरणे वाचली असतील- 'जीवन ही एक कठीण शर्यत आहे, मॅरेथॉन किंवा तत्सम'. नाही नाही, मी जे काही आत्तापर्यंत पाहिले आहे, त्यावरून 'जीवन ही शिशुवर्गाच्या शाळेतल्या शर्यतींपैकी एक आहे,' जिच्यामध्ये तुम्हांला गोटी असलेला चमचा तोंडात ठेवून धावायचे असते. गोटी जर खाली पडली तर शर्यतीत पहिला क्रमांक येऊनही फायदा नाही. तेच जीवनाचेही आहे, यात गोटी म्हणजे स्वास्थ्य आणि नातेसंबंध. जेव्हा तुमच्या जीवनात असा सुंदर संगम असेल तेव्हाच तुमच्या परिश्रमांना अर्थ राहील. अन्यथा, तुम्हाला यश मिळेल, पण ही ठिणगी, ही चमक, ही उल्हासित आणि जिवंत असल्याची जाणीव संपून जायला सुरुवात होईल.
या ठिणगीचे संगोपन करण्यासंदर्भातील आणखी एक गोष्ट! आयुष्य फार गंभीरतेने घेऊ नका. माझे एक योग-शिक्षक विद्यार्थ्यांना योगवर्गात हसायला भाग पाडायचे. एका विद्यार्थ्यांने तर विचारले की, हे विनोद योगाच्या सरावातून काहीतरी हिरावून घेत नाही का? ते शिक्षक म्हणाले, 'फार गंभीर बनू नका, प्रामाणिक असा'. हे वाक्य तेव्हापासून माझ्या कामाचे बोधवाक्य ठरले. मग ते माझे लेखन असो, माझा व्यवसाय असो, संबंध असो की माझे ध्येय असो. माझ्या लिखाणावर मला रोज हजारो प्रतिक्रिया येतात. त्यात ढीगभर स्तुती असते, तशी प्रखर टीकाही असते. हे सर्व मी जर गंभीरपणे घेतले तर मी लिहू कसा शकेन? किंवा मी जगू तरी कसा शकेन? आयुष्य फार गंभीरपणे घेऊ नये, कारण आपण सर्वच जण इथे (पृथ्वीवर) खरेच तात्पुरते असे आलो आहोत. आपण मर्यादित मुदतीच्या प्री-पेड कार्डप्रमाणे आहोत. आपण भाग्यवान असू तर पुढची ५० वर्षे जगू. आणि ५० वर्षे म्हणजे अडीच हजार शनिवार-रविवार. खरेच आपल्याला इतके कामात गुंतवून घेण्याची गरज आहे का? ठीक आहे, की काही क्लासेसना दांडी मारा, काही मुलाखतींमध्ये चुका करा, प्रेमात पडा. आपण माणसे आहोत, ठरावीक प्रणाली वापरलेली उपकरणे नाही.
मी तुम्हाला ठिणगी जोपासण्यासाठी तीन गोष्टी सांगितल्या - रास्त उद्दिष्टे, समतोलपणा आणि आयुष्य फार गंभीरपणे न घेणे. तथापि, जीवनात चार मोठी वादळे असतात, ज्यामुळे ती ज्योत पूर्णपणे विझण्याची भीती असते. त्यापासून संरक्षण करणे महत्त्वाचे. ती चार वादळे म्हणजे निराशा, असहायता, असमानता (अनफेअरनेस) आणि (हेतूचा) एकाकीपणा किंवा अलगत्व.
निराशा तेव्हा येते जेव्हा तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नाही, गोष्टी तुमच्या नियोजनाप्रमाणे घडत नाहीत किंवा जेव्हा तुम्हाला अपयश येते. अपयश हाताळणे फारच कठीण असते, पण जे त्यातून बाहेर पडतात ते मात्र अधिक कणखर होतात. या अपयशाने मला काय शिकवले? हा प्रश्न तुम्ही स्वत:ला अशावेळी विचारला पाहिजे. तुम्हांला दु:ख वाटेल. तुम्हाला सारे सोडून जावेसे वाटेल, जसे मला वाटले होते- जेव्हा नऊ प्रकाशकांनी माझे पहिले पुस्तक प्रकाशित करण्यास नकार दिला होता. काही आयआयटीयन्स कमी ग्रेड्स मिळाल्याने स्वत:ला संपवून टाकतात--- किती मूर्खपणाचे आहे ते? पण अपयश हे तेवढी खोल जखम तुम्हाला करू शकते.
पण हे जीवन आहे. जर का आव्हानांना परतवून लावता आले तर ती आव्हाने म्हणून उरत नाहीत. आणि हेही लक्षात ठेवा की, जर तुम्हाला कशात अपयश आले तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या क्षमतेची परमावधी गाठली आहे, असा होतो. आणि तिथेच तर तुम्हांला असायचे आहे.
नराश्याचा चुलतभाऊ म्हणजे वैफल्य/असहायता. हे दुसरे वादळ. तुम्ही कधी असहाय झाला आहात का? जेव्हा सर्व गोष्टी ठप्प होतात, अडकतात तेव्हा असहायता येते. हे विशेषत: भारताशी संबंधित आहे. वाहतुकीच्या खोळंब्यापासून ते तुम्हाला योग्य असा जॉब मिळेपर्यंत, काही वेळा याला इतका प्रदीर्घ वेळ लागतो की ध्येय वा उद्दिष्ट योग्य निवडले आहे का, याचीच आपल्याला शंका यावी. पुस्तक लिहून झाल्यावर मी स्वत: बॉलीवूडसाठी लिखाण करण्याचे उद्दिष्ट ठरवले. मला वाटले होते की, त्यांना लेखकाची आवश्यकता आहे. मला नशीबवान म्हटले गेले खरे, पण तो सिनेमा प्रदर्शित व्हायला जवळ जवळ पाच वर्षे लागली.
असहायता उत्सुकतेला दुबळे बनवते आणि तुमच्या प्राथमिक ऊर्जेला नकारात्मकतेकडे वळवते. तुम्हांला एक कडवट व्यक्ती बनवते. मी याला कसा सामोरा गेलो? लागलेल्या वेळेचे वास्तव मूल्यमापन- सिनेमे पटकन बघून होतात, पण ते बनवायला प्रचंड वेळ लागतो. शेवटच्या निष्पत्तीकडे बघण्याऐवजी त्या प्रक्रियेत आनंद घेणे अशावेळी महत्त्वाचे ठरते. निदान मी स्क्रिप्ट म्हणजे बरोबर आराखडा बाळगून पटकथा कशी लिहायची, ते शिकत होतो. मला त्या काळात माझे तिसरे पुस्तक लिहायचे होते. सर्वात साधी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनातले सुखद वळण, मित्र, खाणे-पिणे, प्रवास या साऱ्या गोष्टी तुम्हांला तुमच्या असहायतेवर मात करायला उपयोगी पडतात. लक्षात ठेवा, कोणतीच गोष्ट फार गंभीरतेने घ्यायची नसते. असहायता ही गोष्ट तुम्ही काही तरी गंभीरपणे घेत आहात, याची निदर्शक असते.
असमानता (अनफेअरनेस) - सामोरे जायला ही सर्वात कठीण गोष्ट. पण दुर्दैवाने आपला देश असाच चालतो. लागेबांधे, श्रीमंत बाप, सुंदर चेहरे, कुळवंश असलेले लोक अशी असमानता  सहजपणे उभी करतात. केवळ सिनेक्षेत्रात नाही तर सगळीकडे. आणि काही वेळा केवळ नशीब असते. भारतात संधी इतक्या कमी आहेत की, ग्रह-नक्षत्रांचा योग आला तरच ती मिळणे शक्य आहे. एखादी गोष्ट कमी वेळात मिळणे ही गोष्ट गुणवत्ता आणि परिश्रम यांच्याशी जोडली असतेच, असे नाही. पण जरा अधिक वेळेने प्राप्त होणाऱ्या गोष्टींशी मात्र यांचा संबंध आहे, अखेर गोष्टी घडून येतातच. पण तरीही हे ओळखायला शिका की काही जण तुमच्यापेक्षा अधिक नशीबवान असणारच आहेत.
हेच बघा की, कॉलेजमध्ये जायची संधी मिळणे आणि हे इंग्रजीमध्ये केलेले भाषण समजणे याचा अर्थ सर्वसाधारण भारतीयांच्या तुलनेत तुम्ही भरपूर नशीबवान आहात, असाच होतो. आपल्याला जे काही मिळाले आहे, त्याबद्दल आपण कृतज्ञ राहूया आणि जे मिळाले नाही त्याचा स्वीकार करण्याची शक्ती संपादित करूया! मान्य आहे की, मला साहित्यिक प्रशंसा मिळाली नाही, मी ऐश्वर्या रायसारखा दिसत नाही. पण मला तिच्यापेक्षा सुंदर अशी दोन मुले आहेत ना! तेव्हा या असमानतेमुळे तुमच्यातली ठिणगी विझू देऊ नका.
शेवटचा मुद्दा जो तुमच्यातली ठिणगी विझवू शकतो तो म्हणजे अलगत्व किंवा वेगळेपणा. तम्ही जसजसे मोठे होऊ लागता तसे तुमच्या लक्षात येते की, तुम्ही एकमेव असे आहात, अद्वितीय आहात. जेव्हा तुम्ही लहान असता तेव्हा सर्वच लहान मुलांना आईस्क्रीम आणि स्पायडरमॅन आवडतातच. तुम्ही कॉलेजला जाण्याइतपत मोठे होता तेव्हादेखील तुम्ही इतर मित्रांप्रमाणेच असता. पण दहा एक वर्षांनंतर तुम्हाला तुम्ही एकमेवाद्वितीय असे वाटू लागता. तुम्हाला जे हवे आहे, तुमचा कशात विश्वास आहे, तुम्हाला कशाने काय वाटते हे इतरांपेक्षा, अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तींपेक्षा भिन्न असेल. यामुळे विरोधभावना निर्माण होऊ शकते, कारण तुमची उद्दिष्टे इतरांशी मिळतीजुळती असतेच, असे नाही. आणि त्यातली काही तुम्ही काळाच्या ओघात टाकूनही देता. कॉलेजमध्ये बास्केटबॉलमध्ये असलेले कर्णधार बऱ्याचदा त्यांना दुसरे मूल झाले की, बास्केटबॉल खेळणे थांबवतात. ते काही तरी थांबवतात, की जे त्यांना पूर्वी अतिप्रिय होते. आणि हे ते स्वत:च्या कुटुंबासाठी करतात. पण हे करताना त्यांच्यातली ती ठिणगी मात्र विझून जाते. कधीही अशी तडजोड करू नका. सर्वप्रथम स्वत:वर प्रेम करा, मग इतरांवर.

तेव्हा ध्यानात असू द्या. मी तुम्हांला गडगडणारी चार वादळे सांगितली- निराशा, असहायता, असमानता आणि अलगत्व. तुम्ही त्यांना टाळू शकत नाही, नेहमीच्या पावसाळ्याप्रमाणे अगदी ठरावीक मुदतीने ही वादळे तुमच्या जीवनात येतील. तुम्हाला तुमचे रेनकोट मात्र सज्ज ठेवावे लागतील, जेणे करून तुमच्यातली ही ठिणगी तुम्ही विझू देणार नाही.
मी तुमचे पुन्हा एकदा, तुमच्या जीवनातल्या सुंदर अशा वर्षांमध्ये प्रवेश घेताना, स्वागत करतो. जर मला कुणी मागील काळात जाण्याची एक संधी मिळवून दिली तर मी निश्चितपणे कॉलेजचीच निवड करीन. पण दहा वर्षांनंतरही तुमचे डोळे असेच आजच्यासारखे चमकत राहोत, अशी मी आशा बाळगतो. तुमच्यातली ही ठिणगी, ही चमक केवळ कॉलेजमध्येच नव्हे तर पुढचे अडीच हजार शनिवार-रविवार कायम जागृत ठेवाल, अशी आशा करतो. आणि तुम्हीच केवळ नाही, तर माझा संपूर्ण देश ही ठिणगी जिवंत ठेवो अशी अशा व्यक्त करतो, जी गोष्ट काळाच्या कोणत्याही क्षणापेक्षा आज अधिक गरजेची आहे. आणि हे सांगायला मला छान वाटते की, मी अशा अब्जावधी ठिणग्या असलेल्या देशातून आलो आहे.

25 February 2014

सामाजिक उद्योजकतेची पंचसुत्री

'बॉर्न टू विन' संस्थेची स्थापना जानेवारी २००८ मध्ये झाली. त्यानंतर केवळ सहा वर्षात आपले विविध प्रशिक्षणक्रम, सभा इत्यादीद्वारे संस्था एक लाख लोकापर्यंत पोचलेली आहे. या संख्येबरोबरच महत्वाची बाब अशी की संस्थेचा लक्ष्यवेध व “लक्ष्यवेध अॅडव्हान्स” कोर्स केल्यानंतर उद्योजकांच्या उद्योग करण्याच्या पध्दतीत आमुलाग्र बदल झालेला आहे, त्यांना अमाप यश मिळालेले आहे. आज संस्था इतकी मोठी झाली, त्यात सुरवातीला तिला काहीजणांकडून निरपेक्ष सहकार्य मिळाले. संस्थेचे प्रमुख अतुल राजोळी त्याचा कृतज्ञतापूवक उल्लेख करत असतात. असे सहकार्य संस्थेला मिळाले होते सेंट ॲन्जेलो प्रोफेशनल एज्यूकेशन या कंपनीचे सीएमडी श्री. ॲग्नेलोराजेश अथायडे यांच्याकडून. अथायडेंनी बॉर्न टू विनला फ्यूचर पाठशालाचे कोर्सेस त्यांच्या शाखांमध्ये सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. एका अगदी नवीन संस्थेवर त्यांनी विश्वास ठेवला. अथायडे सांगतात फक्त तीस सेकंदात मी समोरच्या व्यक्तीला ओळखतो. मला वाटते म्हणूनच अतुल राजोळी त्यांना प्रथम भेटले त्यावेळीही अथायडे यांनी लगेच अतुलमध्ये क्षमता आहे, धडाडी आहे ओळखले आणि प्लॅटफॉर्म दिला. आता १३ फेब्रुवारी २०१४ ला बॉर्न टू विनचा अठरावा लक्ष्यसिध्दी' सोहळा झाला आणि त्यासाठी ॲग्नेलोराजेश अथायडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांना निमंत्रित करण्यामागे अतुल यांचा दुहेरी हेतू होता एक, त्यांचे रोखठोक विचार ऐकायला मिळावेत आणि दोन, त्यांच्या मौलिक चिंतनाचा लाभ सर्वांना मिळावा.
  लक्ष्यसिध्दी सोहळा कार्यक्रमात यावेळेस सुरवातीला “सामाजिक उद्योजकता, जागतिकिकरण आणि भारत” या विषयाच्या अनुषंगाने अथायडे यांनी चर्चा केली. ते म्हणाले, भारतीयांचे सरासरी वय चाळीस आहे आणि हे मनुष्यबळ ही आपली ताकद आहे. जगात भारतीयांबद्दल भीती व आदर आहे, आपली अर्थव्यवस्था मजबूत होत आहे, येणारा काळ भारताचा आहे. देशाची प्रगती उद्योजकांमार्फतच होत असते, म्हणून उद्योजकांनी त्यांच्या उद्योगात प्रगती करावी व देशहित साधावे. बॉर्न टू विनच्या कोर्सला प्रवेश घेऊन इथे जमलेल्या उद्योजकांनी पहिले पाऊल उचललेले आहे. सचिन तेंडुलकर इतका महान खेळाडू आहे, पण त्याला कोच होता, तसा कोच प्रत्येकाला आवश्यक असतो. बॉर्न टू विनही एक उत्तम कोच आहे, ही संस्था हिंमत देते, जे इथे मिळते ते दुसरीकडे मिळत नाही. उद्योजकांनी छोटे ध्येय समोर ठेऊ नये तर मोठे ठेवावे आणि त्याचसह ग्लोबल विचार करावा. कृषी, पायाभूत सुविधा, आरोग्य अशा क्षेत्रात उद्योजकांना वाव आहे. कोणताही उद्योग सुरू करताना त्याची ब्ल्यू प्रिंट तयार हवी, तसेच एका वर्षात काय करायचे ते पन्नास वर्षात काय करायचे ते वारसदार कोण इथपर्यंतचा प्लॅन तयार हवा. माझा उद्योग छोटी नदी आहे ती पुढे कोणत्या सागराला जाउन मिळणार माहीत हवे. देशात वीज, पाणी यांची कमतरता आहे, रस्ते नाहीत, त्यामुळे हा एक उद्योग होऊ शकतो. अशा आव्हानांकडे संधी म्हणून बघा. येणार्‍या दिवसात कोणीही एकटा काम करू शकणार नाही, कोलॅबरेशन करा. प्रामाणिकपणा ही एक अपरिहार्य बाब झालेली आहे. त्याचा कधीही विसर पडू देऊ नका.
देशात १९५० ते ९० या दशकात ज्यांच्याकडे ताकद होती ते यशस्वी उद्योजक झाले, नंतर ज्ञानाधारित उद्योग यशस्वी झाले. आता सामाजिक उद्योजकता ज्यांच्याकडे आहे ते यशस्वी होतील. जे शार्प असतील, ज्यांच्याकडे नेतृत्वगुण असतील व उद्योगातून मिळालेली संपत्ती समाजाला परत करण्याची दानत ज्यांच्याकडे असेल ते यशस्वी होतील. सामाजिक उद्योजकता या निकषात बसणारे उद्योग कोणते?
पाच निकष आहेत:
१. उद्योग करण्याचा उद्देश काय?
    फक्त पैसे कमवणे हा उद्देश नको.
२. समाजातील कोणती समस्या तुम्ही दूर कराल?
    गावाच्या समस्या दूर करणे हा उद्योग होऊ शकतो. त्यातही नफा आहे.
३. ग्राहकाला तुम्ही काय वचन देत आहात, जे पूर्ण करणार आहात?
    याचा अर्थ जे पूर्ण करता येईल असेच वचन द्या.
४. पुरावा: ते वचन पूर्ण करत आहात याचा पुरावा देता आला पाहिजे.
५. माणसे: माणसे-कर्मचारी यांना पारखून निवडा. आपल्या विचारांशी मेळ साधणारी माणसे काळजीपूर्वक निवडा. त्यांची क्षमता व ज्ञान याही आधी त्यांचे चारित्र्य पारखा.
              यानंतर अतुल राजोळी यांनी श्री. ॲग्नेलोराजेश अथायडे यांची मुलाखत घेतली. अतुल सुरवातीलाच त्यांना म्हणाले यशस्वी उद्योजक होण्यासाठी ध्येय हवे, जिद्द, मेहनत हवी, असे मोघम नको, नेमके बोलू या. पहिला प्रश्न होता, तुमचा जन्म एका सामान्य कुटुबांत झाला, मग उद्योजकतेचे बाळकडू कसे मिळाले? अथायडे म्हणाले आर्थिक दुर्बलता हीच ताकद होती. आई दक्षिणी हिंदू, वडील ख्रिश्चन, दोघांच्या घरून विवाहाला विरोध. आई-वडील गोरेगावला उन्नत नगरमध्ये रहात होते, बरे सुरू होते, ॲग्नेलोराजेश आठवीत असताना ते घर सोडावे लागले, मालवणीला १८० चौरस फुटाच्या घरात जावे लागले. हा फार मोठा सांस्कृतिक धक्का होता. सोळा घरांत मिळून एक टॉयलेट, एक नळ, तिथली भांडणे. पण आई- वडिलांनी शाळा गोरेगावचीच ठेवली हे फार उत्तम झाले. तेव्हाच ॲग्नेलोराजेश यांनी ठरवले परिस्थितीला शरण जायचे नाही, तिच्यावर काबू मिळवायचा. १९८८ साली, आठवीत असताना त्यांनी घरी मदत म्हणून बिंदिया बनवण्याचे काम सुरू केले. दहावीत असताना एम एम मिठाईवालाच्या मालकास इंग्लिश शिकवणे सुरू केले, त्याचे दरमहा ३५० रुपये मिळायचे, तेव्हा ती फार मोठी रक्कम होती. दारोदार जाऊन कपडे विकले. ते म्हणतात कामाबाबत शरम नको, कोणतेही काम करा ते मनापासून आणि उत्तम करा, ते निकृष्ट दर्जाचे केले तर त्याची शरम वाटायला हवी. शिकत रहा, चोवीस तास शिकत रहा हाही त्यांचा मंत्र. नंतर त्यांनी मालाडमधील दालमिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे पंजाबी, मारवाडी, गुजराथी, सिंधी समाजाचे विद्यार्थी होते, उद्योजकतेचे आपोआप संस्कार झाले. देशात संगणकक्षेत्राला भविष्य आहे त्यांना दिसले. पदवीनंतर त्यांनी याच क्षेत्रात जायचे ठरवले. १९९३ साली मुंबईत दंगे झाले. मालवणी त्यासाठी कुप्रसिध्द, पण त्याच सुमारास व्यवसाय सुरू केला. एका मित्राने २२,००० रुपये दिले, एक पीसी घेतला, डेटा प्रोसेसिंगचे काम सुरू केले. काम वाढले तसे एका पीसीचे आठ पीसी झाले. पण हर्षद मेहता घोटाळा उघडकिला आला आणि काम बंद पडले. आता या पीसींचे करायचे काय, त्याचा उपयोग व्हावा म्हणून कॉम्प्युटर कोर्स सुरू केले. मोठ्या कंपन्या ज्या कोर्सची १२,००० रुपये फी घेत तो १,५०० रुपयात देऊ केला. याही वेळेस ल्युपिन फार्माचे सतीश दिवेकर यांचे सहाय्य मिळाले. कॉम्प्युटर कोर्सचा व्यवसाय सुरू केल्यावर रितसर सेंट ॲन्जेलो कॉम्प्युटर इन्स्टिट्युट स्थापन केली.
             अतुल यांचा पुढील प्रश्न होता, सुरवातीची आव्हाने काय होती? ॲग्नेलोराजेश म्हणाले, कर्ज मिळणार नाही की कोणी पैसे देणार नाही हे कळून चुकले होते. १९९४ मध्ये सहयोग पतपेढीने मदतीचा हात पुढे केला, कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना कोर्ससाठी कर्ज देऊन. हे विद्यार्थी गरीबवर्गातील होते, त्यांच्यासाठी ही फार मोठी सोय होती. कोर्स तीन महिन्यांचा, पण कर्ज फेडायची सवलत होती बारा महिन्यात. एकानेही कर्ज बुडवले नाही, हे ते अभिमानाने सांगतात. आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग केल्यामुळे दहा लाख रुपयांची उलाढाल साध्य करता आली. समुद्र किनारी जोरात हवा येते, भिंत बांधू नका तर पवनचक्की उभारा, हे त्यांचे उद्गार!
           व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी काही युक्त्या वापरल्या. पेपर, टिव्हिवर जाहिरात परवडणारी नव्हती. एका माणसाकडे रंगाचा डबा दिला, त्याला जागोजागी भिंतीवर संस्थेच्या जाहिराती रंगवायला सांगितले. कोणी रागावला तर त्याची माफी मागायची, त्याची भिंत व्हाईटवॉश करुन दयायची, पण असे थोडेच असायचे. अशारितीने स्वस्तात जाहिराती झाल्या. तीन-चार वर्षांनी महानगरपालिकेला जाग आली, त्यांनी केसेस करणे सुरू केले, पण तोपर्यंत जम बसायला मदत झाली होती. दुसरी युक्ती, एनआयआयटी, ॲपटेक या बड्या कंपन्या पेपरमध्ये पूर्ण पान जाहिरात देत त्यादिवशी सेंट ॲन्जेलोचा माणूस या कंपन्यांच्या दारात आपले पत्रक घेऊन उभे रहायचा. ज्यांना त्या कंपन्यांची फी परवडणारी नव्हती ते सेंट ॲन्ज्रलोच्या कोर्सला प्रवेश घ्यायचे. पण १९९७ पर्यंत चार वर्षात संस्थेचे फक्त ७-८ सेंटर सुरू झाले होते. ॲग्नेलोराजेश त्याबाबत समाधानी नव्हते. त्यांनी फ्रॅंचायझी देणे सुरू केले. ते वीस टक्के रॉयल्टी घ्यायचे, गुंतवणूक फ्रॅंचायझी उद्योजकाची, जागा त्याची, पण त्याला सेंट ॲन्जेलो नावाचा फायदाही व्हायचा, कोर्सचे तयार मॉडेल मिळायचे. यापध्दतीने चांगली वाढ झाली. अनेक ठिकाणी सेंट ॲन्जेलो नाव दिसायला लागले. ‘जितना दिखोगे, उतना बिकोगे’ हा ॲग्नेलोराजेश यांचा यामागे विचार.
                कंपनीत योग्य माणसे निवडण्याबाबत ॲग्नेलोराजेश यांनी सखोल विचार केलेला आहे. एक नासका आंबा सगळी टोपली खराब करतो, तसेच एक वाईट माणूस इतरांना बिघडवतो. असा माणूस कंपनीत नको याबाबत ते दक्ष आहेत. पूर्वी ते स्वत: मुलाखती घ्यायचे. तुमच्यापेक्षा हुशार लोक कंपनीत घ्या, एकदा निवड झाली की त्यांना कंपनीच्या वाढीत पार्टनर बनवा, ते गुणाकार करतील. त्यांना ग्रोथ हवी असते, डेलिगेशन म्हणजे त्यांना फक्त जबाबदारी देणे नव्हे तर ॲथॉरिटीही देणे, स्वत:चे क्लोन तयार करा, ज्यांची मुल्ये तुमच्यासारखी असतील, कर्मचार्‍याने कंपनी सोडली तरी तो बाहेरून तिला सहाय्य करेल असे संबंध असू द्या, अशा अनेक बाबी ते सांगतात. त्यांचा एक स्पष्ट सल्ला आहे, तुमचा कर्मचारी स्पर्धकाच्या पेरोलवर नको, तुमच्या गोपनीय बाबी त्याने बाहेर सांगू नयेत यासाठी चांगली टीम बनवा. जर कंपनीसाठी व तुमच्यासाठी जीव देणारे कर्मचारी हवे असतील तर तुमचीही त्यांच्यासाठी जीव देण्याची तयारी हवी, तुम्ही नेहमी त्यांच्याबरोबर आहात हा विश्वास त्यांच्या ठायी हवा. जो प्रेशरखाली परफॉर्म करतो, तो घडतो, आपला त्याच्यावरील विश्वास हे त्याचे भांडवल. ॲग्नेलोराजेश कंपनीच्या वेगवान प्रगतीचे श्रेय कर्मचारी व ग्राहक यांच्याबरोबरच्या उत्कृष्ट नातेसंबंधाला देतात.
      उद्योजकाला भेटायला जाण्याआधी ते त्याचा रिसर्च करतात. एखाद्या व्यक्तीबरोबर व्यवहार करायचा असेल तर आधी त्याच्याबरोबर छोटा व्यवहार करा, त्याचे चरित्र कळेल, हाही त्यांचा सल्ला. तुम्हाला कोणी फसवणार नाही हे बघा. क्लासची फी असो किंवा त्यांचे इतर व्यवसाय, त्यांना ग्राहकांकडून आधी पैसे मिळतात, मग ते सेवा देतात! मुद्दल व नफा, दोन्ही ग्राहकांच्या ताब्यात असा उद्योग नको, असे ते म्हणतात. विद्यार्थीजनांना बारा महिन्यात कर्ज फेडायची सवलत याबाबतीतही हिशेबी जोखीम घेतली असे ते म्हणतात. आज त्यांचे हॉटेल्स आहेत, बांधकाम व्यवसाय आहे, खेळाची मैदाने बनवतात. शिक्षण हा आता त्यांच्यासाठी व्यवसाय नाही तर देवाचे काम आहे, पॅशन आहे. लोकांची गुणवत्ता वाढवून समाजाला योगदान करणे आहे.
     प्रतिकूल परिस्थितीतही सदैव उत्साही असण्याबाबत ते म्हणतात, विचारांची स्पष्टता हवी, मला काय हवे आहे ते मला माहीत आहे. आत्मविश्वास हवा. जगात नकारात्मक काहीच नाही. मालवणी इथे अठरा वर्षे काढली, पण ते सर्वात चांगले दिवस होते, आता आणखी किती खाली जाऊ शकतो? निर्भय बना. स्पर्धेबाबत ते म्हणतात, मला स्पर्धा आवडते, जिथे इतरांचे क्लास आहेत तिथेच मी सेंट ॲन्जेलोचे क्लासेस सुरू केले, मी वेगळा आहे, मला दाखवून द्यायचे होते. माझी फी कमी, माझे विद्यार्थ्यांबरोबर वैयक्तिक संबंध, मग मला चिंता कशाला? स्पर्धकांचे बघून काही शिकता येत असेल तर ते घ्या, स्पर्धेमुळे त्या उद्योगक्षेत्राची वाढ होते.
                समाजसेवा करणे अगदी आवश्यक आहे, असे ते केवळ सांगत नाहीत तर दरवर्षी मोतीबिंदूच्या एक हजार शस्त्रक्रिया करण्यासाठी ते मदत करतात. आदिवासी शाळा, मुलींच्या तंत्रशिक्षणासाठी मदत असे त्यांचे काही उपक्रम आहेत. दान करा, पण सांगू नका अशी शिकवण असते, पण ते म्हणतात, काय दान केले ते अवश्य सांगा, कारण त्यामुळे समाजात दातृत्वगुण वाढेल. एक विशेष म्हणजे तोटा झाला तरी मदत करा असे ते सांगतात. पुढील व्हिजनबाबत ते म्हणतात, मला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनायचे नाही, तर सर्वात आंनदी व्यक्ती व्हायचे आहे, लोकांचे जीवन उज्ज्वल करा, त्यातून पैसा मिळेल, ते कमावलेले पैसे इतरांकडे गेले पाहिजेत, खर्च करा. लोकहितकेंद्री जीवन हा ॲग्नेलोराजेश यांचा मूलमंत्र आहे. शेवटच्या दिवशी ट्रॅफिक जाम झाला पाहिजे या भावनिक नोटवर त्यांच्या मुलाखतीची सांगता झाली.
अश्या प्रकारे हा सोहळा अत्यंत जोशात आणि जल्लोषात साजरा झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण बॉर्न टू विन परिवार आपला मन:पूर्वक आभारी आहे.
धन्यवाद.

01 February 2014

अठरावा लक्ष्यसिद्धी सोहळा: ‘सामाजिक उद्योजकता, जागतिकीकरण आणि भारत’

अठरावा लक्ष्यसिद्धी सोहळा: सामाजिक उद्योजकताजागतिकीकरण आणि भारत
नमस्कार मित्रांनो !
बॉर्न टू विन च्या परिवारास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि २०१४ ची दणदणीत सुरुवात द सक्सेस ब्लू प्रिंट या कार्यक्रमाने झाली.आपल्या सर्वांच्या उदंड प्रतिसादाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला. मित्रांनो १९ जानेवारी ला बॉर्न टू विन ने आपल्या अस्तित्वाची यशस्वी ६ वर्षे पूर्ण करून धमाक्यात ७ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
द सक्सेस ब्लू प्रिंट


आपणा सर्वास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि लक्ष्यवेधची १८ वि बॅच तिच्या शेवटच्या टप्प्यात आहेसर्व बॅचेस प्रमाणे या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी देखील जबरदस्त झाली आहे. आणि या सर्वांचा कौतुक सोहळा म्हणजेच अठरावा लक्ष्यसिध्दी सोहळा व स्नेहमेळावा... येत्या १३ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजतामाटुंगा (प.) येथील यशवंत नाट्यमंदीर येथे पार पडणार आहे. दर ३ महिन्यांनी होणाऱ्या या सोहळ्याची आतुरतेने सर्वच लक्ष्यवेधचे आजी-माजी प्रशिक्षणार्थी वाट पाहत असतात. अशा या  आपल्या लक्ष्यवेधच्या कार्यक्रमाला बॉर्न टू विनचे आजी-माजी प्रशिक्षणार्थी आपल्या स्नेहींबरोबर उपस्थित राहतील व जबरदस्त सकारात्मक उर्जा अनुभवतील यात काहीच शंका नाही. हा एक खुप छान असा क्षण असणार आहे जिथे त्यांना आपले सर्व सहप्रशिक्षणार्थी भेटतीलचत्याच बरोबर नवीन ओळखी आणि मित्र देखील बनतील! हि एक संधी असते ती एनर्जीतो अनुभव पुन्हा अनुभवण्याची. तसेच या बॅचच्या प्रशिक्षाणार्थ्यांची यशोगाथा जाणून घेण्याची.

नेहमीप्रमाणेच सर्वांच्या आकर्षणाचा भाग म्हणजे लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक! नेहमीप्रमाणेच या लक्ष्यसिद्धी सोहळ्याला देखील एक दिग्गज व्यक्तिमत्व लाभलं आहे. लक्ष्यसिद्धी सोहळ्याच्या प्रवासातलं अजून एक सोनेरी पान म्हणजे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. St Angelo’s Professional Education Institution for Technology & Management चे Chief Managing Director श्री. अ‍ॅग्नेलोराजेश अथायडे.
त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर ते एक मल्टी-डायमेन्शनल असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी विविध व्यवसायक्षेत्रात आघाडी घेतली आहे. ते कन्सट्रक्शन तसेच हॉटेल व हॉस्पिट्यालिटी व्यवसायात देखील आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा विषय असणार आहे.. सामाजिक उद्योजकताजागतिकीकरण आणि भारत.


सध्या जागतिकीकरण म्हणजेच ग्लोबलायझेशन झालेलं आहे. त्यामुळे आज वेग-वेगळ्या देशांमध्ये सीमा राहिल्या नाहित. त्याचाच परिणाम वेग-वेगळ्या व्यवसायांवर देखील होत चालला आहे. आज भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य आहे व भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहिलं जातंय. या जागतिकीकरणाबरोबरच सामाजिक उद्योजकतेला अनुसरून कोणकोणत्या नवीन संधी भारतात आहेत व पुढे या कश्या वाढत जाणार आहेत आणि या संध्याकडे उद्योजकांनी किवां सर्वसामान्य व्यक्तीने कश्याप्रकारे बघितलं पाहिजेत्यांचा दृष्टीकोन कसा असला पाहिजेआणि या संधीचा आपल्या प्रगतीसाठी कसा वापर करू शकतोत्याच बरोबर सामाजिक बांधिलकी असलेले व्यवसाय कोणतेआणि ते कसे करावेतयाबद्दल देखील मार्गदर्शन आपल्याला या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे.


श्री. अ‍ॅग्नेलोराजेश अथायडे, आणि सेंट अ‍ॅन्जेलोज कम्प्युटर एज्युकेशन यांच्याविषयी थोडेसे:

  • St. Angelo’s Computer ltd. An ISO 9001:2008 Certified Company is one of the leading IT group in Mumbai, India. St. Angelo’s was Established in the year 1993 & today has grown up to be one of the largest IT training organizations in Mumbai.
  • सेंट अ‍ॅन्जेलोज कम्प्युटर एज्युकेशन  हि एकमेव संस्था आहे जीला  Bombay Stock Exchange  व Ahmedabad Stock Exchange कडून पब्लिक इशु काढण्याची मान्यता मिळाली आहे.
  • आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन घडवलं आहे. आणि यांचे विद्यार्थी आतापर्यंत अमेरिकाचायनाहॉंग़-कॉंगन्यूझीलंडऑस्ट्रेलिया आणि सिंगापोर येथे उच्च शिक्षणासाठी गेले आहेत.
  • उद्योजकांना सामाजिक उद्योजकतेत येण्यासाठी नेहमीच प्रेरित करणे हा ध्यास आहे. शिकाकमवा आणि परतफेड करा या संकल्पनेतून सामाजिक उद्योजकतेला ते पाठींबा देत असतात.
  • माजी मुख्यमंत्री कै. श्री. विलासराव देशमुख यांनी सेंट अ‍ॅन्जेलोज व अथायडे यांना हजारो गरजू विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन सामाजिक उद्योजकतेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरीबद्दल खास सन्मानित केले आहे.
  • यांच्या कामाची दखल आत्तापर्यंत टाइम्स ऑफ इंडियाइंडियन एक्स्प्रेस, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, नवभारत, मिड-डे. इकॉनॉमिक टाइम्स तसेच स्टार टीव्हीझी टीव्हीइ टीव्ही, झी २४ तासस्टार माझासाम टीव्ही या सारख्या मिडिया ने घेतली आहे.  
  • मित्रांनोआपण या कार्यक्रमाला का उपस्थित असले पाहिजे हे आणखी नव्याने सांगायची गरज नक्कीच नाही... आपण आपल्या संपुर्ण कुटुंबासह या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल अशी आशा करतो.

अठरावा लक्ष्यसिध्दी सोहळा:
विषय: 'सामाजिक उद्योजकताजागतिकीकरण आणि भारत'
दिनांक: १३ फेब्रुवारी २०१
वेळः संध्याकाळी ६ वाजता
स्थळः यशवंत नाट्यमंदिर, स्टार सिटी सिनेमा जवळ, माटुंगा रोड (प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८७६६६४२६६५४९६१९४६५६८९


25 January 2014

स्टे हंग्री, स्टे फुलिश!

स्टे हंग्री, स्टे फुलिश!
प्रा. सुरेश नाखरे, सोमवार, २० जानेवारी २०१४
जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थांमध्ये तसेच विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांशी हितगुज करण्यासाठी बोलावल्या गेलेल्या मान्यवरांच्या भाषणांचा निवडक अंश या मासिक सदरातून देत आहोत
'जगातील उत्कृष्ट विद्यापीठांत गणल्या गेलेल्या या विद्यापीठाने आयोजित केलेल्या पदवीदान समारंभात तुमच्याबरोबर असण्याने माझा सन्मानच झाला आहे. मी कधीच पदवी प्राप्त करू शकलो नाही. खरे सांगितलेच पाहिजे की कॉलेजच्या पदवीदान समारंभात इतके निकट यायची ही माझी पहिलीच वेळ आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगणार आहे. बस्स. फक्त तीन गोष्टी.
पहिली गोष्ट ही बिंदू-जोडणीसंबंधी आहे (Connecting the Dots):
मी रीड कॉलेजमधून पहिल्या सहा महिन्यांनंतर काढला गेलो. पण पूर्ण काढून टाकण्याआधी पुढचे जवळपास १८ महिने मी आतच राहिलो. मला का बरे काढून टाकले गेले?
त्याची सुरुवात मी जन्मण्याआधी झाली. माझी जन्मदात्री आई ही एक तरुण, अविवाहित अशी पदवीची विद्यार्थीनी होती (कुमारी माता). आणि तिने मला दत्तक देण्याचे आधीच निश्चित केले होते. तिला खूप तीव्रतेने वाटत होते की, मला कोणा पदवीधारक जोडप्याने दत्तक घ्यावे. त्यामुळे तिने एका वकील व त्याच्या पत्नीला माझा जन्म होताच दत्तक देण्याचे ठरवले होते. पण प्रत्यक्षात मी जेव्हा जन्मास आलो तेव्हा त्या जोडप्याने शेवटच्या क्षणी सांगितले की, त्यांना वस्तुत: मुलगी हवी होती. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील माझ्या पालकांना मध्यरात्री दूरध्वनी केला गेला. 'आमच्याकडे अनपेक्षितरीत्या एका मुलाचा जन्म झाला आहे. तुम्हाला तो हवाय का?' अशी विचारणा झाली. 'अर्थात हवाय!',त्यांनी उत्तर दिले. माझ्या जन्मदात्री आईला नंतर समजले की माझ्या दत्तक आईने कॉलेजमधून कधीच पदवी प्राप्त केलेली नव्हती आणि वडिलांनी साधी माध्यमिक शाळाही उत्तीर्ण केलेली नव्हती. त्यामुळे तिने दत्तक कागदपत्रांवर सही करण्यास नकार दिला. पण मला भविष्यात कॉलेजला पाठवू असे आश्वासन माझ्या पालकांनी दिल्यानंतर ती अखेर तयार झाली.
आणि १७ वर्षांनतर मी कॉलेजमध्ये दाखल झालो. स्टॅनफोर्डसारख्या अत्यंत खर्चीक असणाऱ्या एका कॉलेजची मी निवड केली. माझ्या कष्टकरी पालकांची सर्व शिल्लक कॉलेजची फी भरण्यात खर्ची पडत असे. सहा महिन्यांनंतर माझ्या लक्षात आले की, हे काही खरे नाही. माझ्या जीवनात मला नेमके काय करायचे आहे, त्याची मला काहीच कल्पना करता येईना, व याबाबतीत कॉलेजचा मला काय उपयोग होणार आहे, हेही कळेना. तरीही मी मात्र माझ्या पालकांनी आयुष्यभर साचवलेली मिळकत खर्च करत होतो. म्हणून मी बाहेर पडायचे ठरवले. मला विश्वास होता की, यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल. त्या वेळी तात्पुरती भीती वाटली होती, पण आता मागे वळून बघताना असे वाटते की, तो निर्णय हा मी आत्तापर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयांमधला सर्वोत्कृष्ट निर्णय होता. बाहेर पडताक्षणी मी वर्गात जाणे बंद केले, आणि मला ज्यातून आनंद मिळेल तिकडे जायला सुरुवात केली.
हे सारे तितकेसे अद्भुत वा सुखावह नव्हते. मला झोपायला जागा नव्हती, त्यामुळे मी मित्रांच्या खोलीत जमिनीवर झोपत असे. कोक बाटल्या परत करून अनामत रकमेचे ५ सेंट मिळवून मी माझे अन्न विकत घ्यायचो. दर रविवारी रात्रीचे उत्तम जेवण मिळावे, म्हणून मी ७ मैल पायी चालत हरे कृष्ण मंदिरात जायचो. मला ते जेवण खूप आवडायचे. माझी जिज्ञासा व आंतरिक इच्छा यांच्या मागे जाताना ज्या सगळ्या अडथळ्यांतून, अडचणीतून ठेचकाळत मला जावे लागले त्या अंतिमत: अमूल्य ठरल्या. वानगीसाठी मी एकच उदाहरण देतो.
त्या काळी देशात सर्वात उत्तम असे अक्षर-सुलेखन (Calligraphy)  रीड कॉलेजमध्ये शिकवले जायचे. कॉलेजच्या संपूर्ण परिसरात प्रत्येक पोस्टर, प्रत्येक ड्रॉवरवरचे लेबल हे अत्यंत सुबक हस्ताक्षरात लिहिलेले असायचे. माझ्या नेहमीच्या वर्गातून मी बाहेर पडल्याने मला त्या वर्गात यापुढे जायचे कारण नव्हते. त्यामुळे मी ठरवले की, हा सुलेखनाचा वर्ग लावायचा आणि जे शिकता येईल ते शिकून घ्यायचे. मी सेरीफ आणि सॅन सेरीफ हे टाइपफेसेस शिकून घेतले, वेगवेगळ्या शब्द-समुच्चयांमधील रिक्त जागा (स्पेसेस) समजावून घेतल्या, कोणती गोष्ट उत्कृष्ट छपाई देऊ शकते, हे जाणून घेतले. हे सर्व सुंदर, ऐतिहासिक व कलेच्या दृष्टीने सूक्ष्म असे होते, जे विज्ञान पकडू शकत नव्हते आणि मला ते फारच आकर्षक वाटले.
यातले काहीतरी माझ्या भावी आयुष्यात प्रत्यक्षात उपयोगी पडेल अशी कुठलीच आशा मला त्या वेळी वाटली नव्हती. पण नंतर १० वर्षांनी आम्ही जेव्हा पहिला मॅकिंटॉश संगणकाचा आराखडा तयार करत होतो, त्या वेळी हे सारे मला उपयोगी पडले. आणि आम्ही ते मॅकमध्ये प्रत्यक्ष वापरलेही. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला संगणक होता. जर मी ते कॉलेजमधले पहिले वर्ष ही गोष्ट शिकण्यात घालवले नसते तर मॅकमध्ये विविध टायपोफेसेस किंवा योग्य प्रमाणात अंतर राखलेले फॉन्ट्स कधीच घालता आले नसते. आणि मला जर पहिल्या वर्षी ड्रॉप लागला नसता तर मी सुलेखनाचा वर्ग कधीच लावू शकलो नसतो, आणि मग पर्सनल कॉम्प्युटरला अशी सुंदर टायपोग्राफी कधी मिळालीच नसती. अर्थात कॉलेजमध्ये असताना भविष्यातल्या या बिंदू-जोडणीचा विचार करणे मला अशक्यच होते. पण १० वर्षांनी मागे वळून पाहताना ही जोडणी स्पष्टपणे प्रतीत झाली, हे सत्य.
तेव्हा, तुम्हीसुद्धा भविष्याचा विचार करीत बिंदू-जोडणी करू शकणार नाही; पण मागे वळून पाहताना ती अवश्य करू शकाल. म्हणून तुमची त्या बिंदूंवर श्रद्धा हवी की, भविष्यात त्यांना परस्परांना तुम्ही जोडू शकाल. मात्र तुमच्यातील धैर्य, नियती, जीवन, कर्म यातील कशावर तरी तुमची श्रद्धा हवी. या दृष्टिकोनाने मला आयुष्यात कधीच अपयश दिले नाही आणि केवळ यामुळेच माझ्या जीवनात हा वेगळेपणा राहिला गेला.
माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम व हानी यासंबंधीची (Love and Loss):
मी नशीबवान होतो, कारण मला सुरुवातीच्या जीवनात जे जे आवडत होते, ते ते मिळत गेले.
मी २० वर्षांचा असताना वॉझ आणि मी मिळून माझ्या आईवडिलांच्या गॅरेजमध्ये अ‍ॅपल कंपनी सुरू केली. आम्ही खूप कष्ट घेतले आणि दोघांनीच गॅरेजमध्ये सुरू केलेली ही कंपनी १० वर्षांत २ अब्ज डॉलर्स आणि ४ हजार कर्मचारी यांनी युक्त झाली. एक वर्षांपूर्वी आम्ही आमची पहिली निर्मिती - मॅकिंटॉश संगणक - बाजारात आणली, आणि त्या वेळी माझे वय होते ३०. आणि नेमकी त्याच वेळी माझी अ‍ॅपलमधून हकालपट्टी झाली. तुम्हीच सुरू केलेल्या कंपनीतून तुम्हालाच कसे काढले जाऊ शकते? त्याचे असे झाले, अ‍ॅपल वाढू लागली तशी आम्ही एकाला अ‍ॅपलमध्ये नियुक्त केले. मला वाटले होते की, तो अत्यंत बुद्धिमान असल्याने माझ्याबरोबर कंपनी चालवू शकतो. पहिले वर्ष तसे चांगले गेलेही. पण त्यानंतर मात्र भविष्याबद्दलचे आमचे दृष्टिकोन फारच भिन्न होऊ लागले आणि प्रसंगवशात आम्ही तोटय़ात गेलो. त्या वेळी संचालक मंडळाने त्याची बाजू घेतली. त्यामुळे वयाच्या ३० व्या वर्षी मला बाहेर पडावे लागले. आणि तेही जाहीररीत्या. माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदूच नाहीसा झाला. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
काही महिने मला काही कळेना, की काय करावे? आधीच्या उद्योजक पिढीला आपण खाली ढकलून दिले आहे, असे मला वाटू लागले, जणू काही माझ्या हातात सोपवलेला झेंडा मी खाली टाकून दिला. डेव्हिड पॅकार्ड आणि बॉब नुईस यांना मी भेटलो व इतक्या कठोर शिक्षेबाबत क्षमाही मागितली. मी एक जाहीर पराभूत व्यक्ती होतो. आणि त्या प्रदेशातून (व्हॅली) पळून जावे असेही मला वाटून गेले. पण हळूहळू मी सावरलो. माझ्या लक्षात आले की मी जे काही करत होतो, ते आजही मला आवडते आहे. अ‍ॅपलमधल्या विपरीत घटना ही आवड अंशानेही बदलू शकलेल्या नाहीत. मला काढून टाकले, तरीही ती आवड कायमच राहिली होती. आणि त्यामुळे पुन्हा एकदा सुरुवात करायचा मी निश्चय केला.
त्या वेळी मला कळले नाही, पण नंतर हे सिद्ध झाले की, अ‍ॅपलमधून झालेली हकालपट्टी ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट ठरली. यशस्वी असण्याचे जड ओझे दूर झाले व त्याची जागा नवशिक्याच्या हलकेपणाने घेतली, कारण त्याला प्रत्येक बाबतीत कशाचीच खात्री नसते ना.
पुढच्या पाच वर्षांत मी नेक्स्ट (NeXT) नावाची एक कंपनी सुरू केली, पिक्सार नावाची दुसरी कंपनी काढली आणि मी एका अद्भुत अशा स्त्रीच्या प्रेमात पडलो, जी माझी पुढे पत्नी झाली. पिक्सारने पुढे संगणकाचा वापर करून जगातील पहिली अ‍ॅनिमेशन फिल्म बनवली, तिचे नाव 'टॉय स्टोरी'. आज ही कंपनी जगातील सर्वात यशस्वी स्टुडिओ बनली आहे. विशेष कलाटणी देणारी घटना म्हणजे पुढे अ‍ॅपलने नेक्स्ट कंपनी विकत घेतली व मी अ‍ॅपलमध्ये परत आलो. मी जे तंत्रज्ञान नेक्स्टमध्ये विकसित केले होते ते आता अ‍ॅपलच्या सध्याच्या नवजीवनाच्या हृदयस्थानी आहे. आणि लॉरेन्स आणि मी आमच्या संसारात मजेत आहोत.
मला पक्की खात्री आहे की अ‍ॅपलने मला काढून टाकले नसते तर यातली कोणतीही गोष्ट घडली नसती. हे तसे जरा भयंकर असे औषध होते, पण ते रुग्णासाठी आवश्यक होते. कधीतरी आयुष्य तुमच्या डोक्यावर वीट फेकून मारते. पण श्रद्धा-विश्वास सोडू नका. माझी खात्री आहे की, मी जे काही केले ते आवडीने / प्रेमाने केले. तुम्हांला तुमची आवड कशात आहे, ते शोधलेच पाहिजे. हे तुमच्या कामाच्या बाबतीत आणि तुमच्या प्रेमपात्राबाबतदेखील खरे आहे. तुमचे काम हे तुमच्या जीवनातील मोठा भाग व्यापून टाकते आणि खरे समाधान मिळवायचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या आवडीचे व श्रद्धेचे काम करीत राहणे. आणि असे श्रेष्ठ काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जे काम कराल त्या कामावर प्रेम करणे. जर ते तुम्हाला अजून सापडले नसेल तर ते तुम्ही शोधायला लागा. स्वस्थ बसू नका. हृदयाशी निगडित अशा इतर सर्व गोष्टींप्रमाणे तुम्हाला ते जेव्हा सापडेल तेव्हा ते लगेच माहीत पडेल. आणि जसजशी वर्षे उलटतील तसतसे ते नाते इतर महान नात्यांप्रमाणे दृढ होत जाईल. तेव्हा ते काम मिळेपर्यंत शोधत राहा. स्वस्थ बसू नका.
माझी तिसरी गोष्ट आहे ती मृत्यूसंबंधी (Death):
मी जेव्हा १७ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वाचनात एक वाक्य आले ते काहीसे असे, 'जर प्रत्येक दिवस हा तुमचा अखेरचा दिवस आहे, असे जगू लागलात तर एक दिवस तुम्ही निश्चितपणे खरे ठराल'. या वाक्याचा माझ्यावर खोल परिणाम झाला आणि गेली ३३ वर्षे- प्रत्येक सकाळी आरशासमोर उभे राहून मी मलाच विचारतो की, 'जर आज माझा अखेरचा दिवस असेल तर मला जे आज करायचे आहे ते आज करता येईल का?' आणि जेव्हा सलग अनेक दिवस उत्तर नकारार्थी मिळायचे, तेव्हा मला हे कळायचे की मला माझ्यात काहीतरी बदल करणे गरजेचे आहे.
आपण लवकरच मरणार आहोत हे स्मरण, मला जीवनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन ठरले. कारण सर्व बाह्य अपेक्षा, सर्व अभिमान, अडचणी वा अपयशाची सर्व प्रकारची भीती, इ. गोष्टी मृत्यूच्या समोर गळून पडतात. मृत्यूचे स्मरण हे तुम्ही काहीतरी गमावणार आहात, अशा विचारांच्या सापळ्यात न अडकण्याचा एक प्रभावी मार्ग आहे, हे मला ठाऊक झाले आहे. तुम्ही आधीच मुक्त झालेले असता. तुमच्या हृदयाला न अनुसरायला तुम्हाला काहीच कारण नसते.
एक वर्षांपूर्वी मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. सकाळी साडेसात वाजता माझे स्कॅनिंग झाले आणि स्वादुपिंडावर गाठ असल्याचे स्पष्ट दिसून आले. मला त्या वेळी स्वादुपिंड म्हणजे काय तेही माहीत नव्हते. डॉक्टरांनी मला सांगितले की, साधारण कधीही बरा न होण्यातला हा कॅन्सर आहे आणि मी जास्तीतजास्त तीन ते सहा महिने जगण्याची आशा करू शकतो. डॉक्टरांनी मला घरी जायला सांगितले आणि व्यावहारिक निरवानिरव करायला सांगितली, त्यात डॉक्टरांचा संकेत होता की मी मरणाच्या तयारीला लागावे. याचा अर्थ होता की माझ्या मुलांना पुढच्या १० वर्षांत जे सर्व काही सांगता आले असते ते काही महिन्यांतच मला सांगायला पाहिजे आहे. त्याचा अर्थ होता की, सारे काही ठप्प झाले आहे, याचा स्वीकार करावयाचा आहे, जेणेकरून हे कुटुंबालाही सोपे जाईल. थोडक्यात सर्वांना तुम्हाला अंतिम निरोप द्यायचा आहे.
तो पूर्ण दिवस मी त्या निदानाच्या सहवासात काढला. त्या संध्याकाळी माझी बायोप्सी झाली ज्यात त्यांनी माझ्या घशातून एक एन्डोस्कोप घातला. पोटातून तो आतडय़ात गेला. तिथून माझ्या स्वादुपिंडात एक सुई टोचली आणि त्या गाठीतून काही पेशी काढल्या गेल्या. मला भूल देण्यात आली होती. पण माझी पत्नी तिथे होती. तिने मला नंतर सांगितले की, जेव्हा डॉक्टरांनी सूक्ष्मदर्शकाखाली त्या पेशी बघितल्या तेव्हा ते अक्षरश: रडले, कारण त्यांच्या लक्षात आले की हा कॅन्सर स्वादुपिंडाच्या दुर्मिळ अशा कॅन्सरपैकी होता की, जो शस्त्रक्रियेद्वारे बरा होऊ शकत होता. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि आता मी एकदम उत्तम आहे.
या वेळी मी मृत्यूच्या अगदी समीप होतो. आणि ही जवळीक पुढची काही दशके माझ्याजवळ टिकली. यातून बाहेर आल्यानंतर मी हे तुम्हाला आता थोड्याफार निश्चिततेने सांगू शकतो की मृत्यू ही उपयोगी, पण शुद्ध अशी एक बौद्धिक संकल्पना आहे.
मृत्यू कुणालाच नको असतो. ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा असते त्यांनासुद्धा तिथे जाण्यासाठी मरण येणे नको असते. आणि तरीही आपणा सर्वांसाठी मृत्यू हेच अंतिम गंतव्यस्थान आहे. यातून कोणीही सुटलेला नाही. आणि दुसरे असे की मृत्यू हा जीवनातला एकमेव सुंदर असा शोध आहे. हा जीवनातील परिवर्तन-प्रतिनिधी आहे (Change Agent) जुने निकालात काढून नव्याला जागा देण्याचे काम तो करतो. आज आत्ता तुम्ही नवीन आहात, पण कालांतराने तुम्ही जुने होणार आहात आणि निकाली निघणार आहात. माझ्या या सत्यवक्तेपणाबद्दल क्षमा करा, पण हे पूर्णसत्य आहे.
तुमचा वेळ मर्यादित आहे, तेव्हा दुसऱ्याचे जीवन जगण्यात तो वाया घालवू नका. इतरांच्या वैचारिक निष्कर्षांच्या सापळ्यात सापडू नका. इतरांच्या मतांच्या कोलाहलात तुमचा आतला आवाज बुडू देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे हृदय व तुमचे अंतरज्ञान काय सांगते, त्याचेच अनुसरण करा. यांनाच हे पूर्ण माहीत असते की, तुम्हाला नेमके काय व्हायचे आहे. बाकी सर्व काही दुय्यम आहे.
मी जेव्हा तरुण होतो तेव्हा एक छान प्रकाशन होते, ज्याचे नाव होते 'दी होल वर्ल्ड कॅटलॉग'  (The Whole World Catalog). आमच्या पिढीचे ते बायबल होते. इथून जवळच असणाऱ्या मेन्लो पार्क येथील स्टेवार्ट ब्रँड याने ते सुरू केले, आणि आपला काव्यात्मक स्पर्श देऊन त्याला जिवंतपणाही आणला. ही गोष्ट साधारण १९६० च्या दशकाच्या अखेरीची होती; जेव्हा पर्सनल संगणक आणि डेस्कटॉप संगणक याद्वारे छपाई होत नव्हती. तेव्हा सर्वत्र टाइपराइटर्स, कात्र्या व पोलराइड कॅमेरे यांचा वापर होत असे. म्हणजे गुगलची पुस्तकी आवृत्ती असावी, अशासारखे ते असायचे. (गुगल त्यानंतर ३५ वर्षांनी अस्तित्वात आले.) ते आदर्श होते आणि योग्य साधने व महान कल्पना यांनी ते ओतप्रोत भरलेले असे.
स्टेवार्ट व त्याच्या चमूने 'दी होल वर्ल्ड कॅटलॉग'चे बरेच अंक काढले. आणि १९७० च्या मध्यात त्यांनी एक शेवटचा अंक काढला. त्या वेळी मी तुमच्या वयाचा होतो. त्या अंकाच्या मुलपृष्ठावर एक फोटो होता, विषय होता ग्रामीण भागातली एक सकाळ. तुम्ही पदभ्रमण वगैरे करत असाल तर तुम्हीही पाहिली असेल अशी सकाळ. त्या फोटोच्या खाली एक वाक्य होते 'भुकेले राहा. मूर्ख राहा.' (Stay Hungry. Stay Foolish) तो त्यांचा अंतिम संदेश होता- स्टे हंग्री, स्टे फुलिश. आणि मी तो संदेश कायम लक्षात ठेवला. आणि तुम्ही पदवीधारक होताना तुम्हीही तो संदेश लक्षात ठेवावा व आचरणात आणावा, अशी अपेक्षा करतो.
स्टे हंग्री, स्टे फुलिश. (भुकेले राहा. मूर्ख राहा.)

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites